महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

जग बदलणार हत्यार..!!


“पप्पा मला न्हाय शिकायचं मला शाळेत जायाची लाज वाटत्या. पोरांच्या चीडीवण्यान मला जित्यापणी मेल्यासारख वाटतंय”
सम्राटचा बाप त्याच शांतपणे ऐकून घेत होता.

शाळा हे विद्येच पवित्र मंदिर मानल जात. तिथं जात पात, धर्म प्रांत यांना थारा नसतो. तिथं फक्त मानवता अन् माणुसकी पेरली जाते. पण काही ठिकाणी जात धर्म, विषमतेचा नुसता डोंब उसळत असतो. अन् याच विषमतेच्या डोंबात सम्राट होरपळत होता.

सम्राट आठवीच्या वर्गात शिकत होता. तो शाळेत चांगला हुशार होता. त्याच शालेय जीवन अतिशय आनंदी आणि उत्साही चालल होत.
पण जसजसं वय वाढत होत. तसतसं शाळेतल्या पोरांच्या मानसिकतेत बदल होत होता.
जी पोर प्राथमिक शाळेत असताना एकमेकांच्या डब्यातल जेवण जेवत होते. जी पोर शाळेतला भात एका ताटात चौघजन मिळून खात होती. ती पोरं सम्राटशी आता तुटून वागत होती. त्याला सारखं टोचून बोलत होती. तू खालच्या जातीचा हायस. अन् तुमच्या जातीची मानस घाणेरडी असतेती जनावरांच मटण खातेती. अस म्हणत ती पोर त्याला चिडवत काय काय बहाद्दर तर त्याच्यासोबत त्याच्या बेंच वर पण बसत नव्हती. पण त्यातलीच दोन चार पोर चांगली पण होती. ती पोर सम्राटच्या सोबत होती.
पोर सतत सम्राटला चिडवत होती. त्याचा अपमान करत होती.
पण सम्राटला त्याचा नेमका गुन्हा काय हेच समजत नव्हत तो मनात विचार करत होता की “मी एवढा चांगला अन् स्वच्छ वागतोय रोज स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेले कपडे घालतोय. माझे केस नखे मी एकदम टापटीपित वागतोय. अन् ज्यांच्या नाकाचा शेंबूड निघत न्हाय. जे आठ आठ दिवस शाळेचे कपडे धोत नाहीत. एकाच शर्टावर आठ आठ दिवस राहतेती. ज्यांच्या अंगाचा वास मारतोय ती मला घानीरडा म्हणतेती.
सम्राटची मनस्थिती ढासळत होती. शाळेत हुशार असणाऱ्या सम्राटला शाळेची अन् शाळेतल्या पोरांची कीव येत होती.
एकदा शाळेच्या बाहेर सम्राटचा मित्र विजयचे वडील आले होते. अन् विजय वडिलांना भेटायला सम्राटला घेऊन गेला होता. विजयच्या वडिलांना विजयशी जे बोलायचं होत ते बोलून झाल्यावर जाता जाता विजयला एक ताकीद दिली ती ताकीद अशी होती की “मांगांच्या पोरांच्या नादाला लागायच न्हाय. ती पोर लय डांबरट असतेती. भांडण, लफडी, मारामाऱ्या करतेती.” विजय आपल्या बापाला गप्प करायचा प्रयत्न करत होता पण तो अजूनच जोमान बोलत होता. त्याच हे बोलण ऐकून सम्राट खाली मान घालून तिथून निघून गेला.
सम्राट ह्या सगळ्या गोष्टी असह्य झाल्याने शाळेच्या पाठीमागे दूरवर एक आंब्याच झाड होत त्या आंब्याखाली जाऊन रडत बसत होता. आपला नेमका गुन्हा काय. अन् हे लोक आपल्याशी अस का वागतात याचा त्याला ठाव लागत नव्हता.
तरीही रडकडत तो दिवस रेटीत होता.
एकदा शाळेत त्याच अन् एका पोरांचं भांडण झालं. अन् तेव्हा मात्र सम्राटच्या सहनशिलतेचा अंत झाला. त्यानं त्याला जातीवरून हिनवणाऱ्या एका पोराला दोन तीन झणझणीत कानाखाली लावल्या अन् रागान फुनफुनत त्यानं शाळच दप्तर घेतलं. अन् घराची वाट धरली.
सम्राटचे वडील त्याच वेळेत जेवायला घरी आले होते. त्यांनी सम्राटला मधूनच शाळेतन घरी का आलायस अस विचारल.
त्यावेळी आपल्या दाटलेल्या कंठातून सम्राट म्हणाला पप्पा आजपासन मी शाळेत जाणार न्हाय. सम्राटचे वडील म्हणाले कार काय झालंय? त्यावर सम्राटने त्यांना सविस्तर सगळ सांगितलं. त्यांनी ही सम्राटच बोलण शांतपणे ऐकून घेतलं. अन् त्याला शांत करत समजावणीच्या सुरात म्हणाले “हे बघ बाळा ह्या सगळ्यात ना तुझा दोष हाय ना माझा ह्यो आपल्या जातीवर लागलेला कलंक हाय. अन् त्यो तुला शिक्षणानचं पुसावा लागल. अरे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा देखील फार भयंकर छळ त्या काळातल्या जातीवादी लोकांनी केला. त्यांना फार त्रास दिला पण ते डगमगले नाहीत. ते शिकत राहिले लढत राहिले. अन् आज बघ या भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली. अन् जरा कुठतरी आपून माणसात आलो. आर आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यासनी तर या जातीवादी व्यवस्थेन शिकून दिलं न्हाय. पण आपल्या जिद्दिवर अन् कर्तृत्त्वावर त्यांनी आपल्या विचारांचा ठसा जगभर उमटवलाय.
तू शिक, संघर्ष कर, लढ अन् या जातीवादी व्यवस्थेला उलटून टाकायचं असेल तर शिक्षण हेच आपल हत्यार हाय.
सम्राट म्हणाला पप्पा बरोबर हाय तुमचं मी आता रडणार न्हाय फक्त लढणार.
दुसऱ्या दिवशी सम्राट पुन्हा शाळेत गेला. त्याच्यात फार मोठा बदल झाला होता. तो कुणाच्याही बोलण्याला मनावर घेत नव्हता. तो फक्त अभ्यास आणि शाळा याच्यातच दंग राहत होता. दिवसामागून दिवस जात होते. बघता बघता दोन वर्षे सरली अन् एसएससी ची परीक्षा जवळ आली. सम्राट दिवस रात्र अभ्यास करत होता. बघता बघता परीक्षा संपली पण आता फक्त निकालाची प्रतीक्षा होती. निकालाचा दिवस उजाडला वेळ कासव गतीने पुढे चालली होती. अखेर प्रतीक्षा संपली अन् निकाल आला. निकाल बघताच सम्राटच्या डोळ्यात पाणी आल. त्यानं लगेचच आपल्या बापाचे पाय धरले. त्याच्या बापानं त्याला कचकन मिठी मारली सम्राटच्या घरात आनंद आणि उत्साहाला भरती आली होती. ज्याच्या त्याच्या डोळ्यात पाणी होत. पण ते पाणी आनंदाच, विद्रोहाच अन् विजयाचं होत. सम्राटने बापाच्या मिठीतुन सुटल्यावर लगेचच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अन् साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला नतमस्तक झाला.
सम्राटने पेढ्याचा बॉक्स घेतला अन् सरळ विजयच्या घरी गेला. अन् विजयच्या बापाला पेढा देत म्हणाला काका मी शाळेत पहिल्या नंबरने पास झालो. त्यावर विजयचा बाप म्हणाला अरे वा अभिनंदन आर पर आमचं बेन एक विषय घालवून बसल. बरं तू कुणाच्यातला र मी तुला ओळखला न्हाय.
काका मी मांगवाड्यातला मांगाचा हाय.
सम्राटच्या या बोलण्यानं विजयच्या बापाची मान झुकली त्याच्या डोळ्यासमोर तो शाळेच्या बाहेर घडलेला प्रसंग उभा राहिला. अन् त्याला कुठतरी त्याची लाज वाटू लागली.

लेखक/कवी~सुरज साठे
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे
जन्मभूमी वाटेगाव
9370626619

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!