दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
दिवाळीमध्ये दिवे पेटवणाऱ्या अज्ञानी बौद्ध बांधवांनो, तुमच्या डोक्यातला अज्ञानाचा अंधकार कधी आणि केव्हा नष्ट होणार?

बौद्धाचारय- मिलिंद बनसोडे गुरुजी.
९०२२७०४२६९.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील दिवाळी हा हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण आपल्या काही बौद्ध सुशिक्षित परंतु, धम्म अज्ञानी बांधवांनी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला. दारासमोर रांगोळी काढली, घरावर लायटिंग केली, कोणी फटाके फोडले, फराळ बनवले,घरी लक्ष्मी पूजन केले. बहिणीने भावाला ओवाळते, नवीन कपडे खरेदी केले, जवळच्या नातेवाईक, मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळीला सेलिब्रेशन करून त्या आनंदमय क्षणाचे फोटो, शॉर्ट्स व्हिडिओ काढून स्वतःच्या ह्वाटस्अप स्टेटसवर, इन्स्टाग्राम व फेसबुकवर पोस्ट केले. आदत से मजबूर असल्याप्रमाणे असे धम्म अज्ञानी परिवार हिंदू धर्माच्या हीन संस्कृतीची जोपासना करून हिंदू धर्माला विनाकारण आणखी महत्व प्राप्त करून देतात. आपण त्यांना कितीही समजविण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यर्थ म्हणावे लागेल. अश्या लोकांना हे माहीत नाही की, तुम्ही जे कृत्य करता तो एक सामाजिक अपराध आहे. कारण तुम्ही जर या पूर्वाश्रमीच्या चालीरीती, परंपरा, रीतीरिवाज, सण, उत्सव साजरे करायचे सोडले नाही तर येणाऱ्या तुमच्या हजारो पिढ्या देखील तेच जुन्या धर्माचे संस्कार घेऊन अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत राहतील. त्यामुळे समाजात कधीही परिवर्तन होऊन अपेक्षित बदल होणार नाही. एकीकडे आपल्या बौद्ध समाजामधील तरुण तरुणी देश विदेशात शिकत आहेत. ही एक समाजाच्या दृष्टीने अभिमानाची व आनंदाची बाब आहे. समाजामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकर, अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर तरुण तरुणी मोठ्या हुद्द्यावर काम करताना दिसतात. परंतु, हिच तरुण पिढी धम्मापासून कोसो दूर आहे. केवळ बौद्ध पद्धतीने साक्षगंध, विवाह करण्यापुरताच या नवीन पिढीचा बौद्ध धम्माशी संबंध उरलेला आहे. किंवा एखादा आलिशान फ्लॅट खरेदी केल्यानंतर गृहप्रवेश करण्यासाठी बौद्ध पूजा आयोजित केली जाते. आजच्या नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या बौद्ध पिढीने हे लक्षात घेतले पाहिजे की, आपले आजचे भौतिक सुख म्हणजेच सर्वस्व हे केवळ बाबासाहेबांमुळेच आहे.
आजच्या तरुण पिढीला हे समजावून सांगण्याची गरज आहे की, बौद्धांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती ही कोण्या काल्पनिक देव देवतेमुळे झाली नाही. तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या असीम त्यागामुळे झाली आहे. त्यामुळे आपल्या बौद्ध तरुण मुलांना उच्च शिक्षण घेता येते. उच्च शिक्षण घेतल्याने चांगल्या पगाराची नोकरी मिळते. उत्पन्न चांगले असल्याने राहणीमान सुधारले. त्यामुळे महानगरांमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी करून राहता आले. जो महिन्याला चांगला पगार मिळतो तो सुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकारामुळेच मिळतो. कारण आपल्या जुन्या पूर्वाश्रमीच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे कोणत्याही शूद्र, अतिशूद्र व महिला वर्गाला संपत्ती कमविण्याचा अधिकार नव्हता. एवढे बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. परंतु, आजचे तरुण सांसारिक जीवन जगताना भौतिक सुखात इतके मग्न होतात की, आपण कोणामुळे इतके मोठे झालो याचाच त्यांना कायमचा विसर पडतो.
स्वतचे जन्मदाते आई वडील, नातेवाईक यांना दूर ठेऊन स्वतःच्या जगामध्ये रमतात. व मग त्यांना मनोमन वाटते की, आता आपण परिपूर्ण आहोत. आम्हाला कोणी काही शिकवण्याची मुळीच गरज नाही. तसेच या तरुण पिढीला वाटते की, बुद्ध विहारात जाण्याची आवश्यकता नाही. २२ प्रतिज्ञांची आता गरजच उरलेली नाही. किंवा पूर्वीप्रमाणे आता कोणी सामाजिक भेदभाव करीत नाही, त्यामुळे सर्वत्र सर्वधर्म समभाव या तत्त्वाने जीवन जगले पाहिजे. हिंदू धर्मीयांच्या सण/उत्सवाला जो उत्साह या तरुण युवक-युवतींमध्ये दिसतो, मग तोच उत्साह बौद्धांचे सण वर्षातील १२ पौर्णिमा, १४ एप्रिल, वैशाख पौर्णिमा, तीन महिन्यांचे वर्षावास, मंगल पर्व, धम्मचक्र प्रवर्तन दिवस, रमाई जयंती आदी मंगल सण उत्सवाला का दिसत नाही? किंबहुना हे बौद्धांचे सण/उत्सव नेमके का आणि कश्यारितीने साजरे करायचे असतात याविषयी कित्येक बौद्ध तरुण तरुणी अनभिज्ञ आहेत. जर खरेच हिंदू धर्म इतका चांगला होता, तर मग आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग का केला असेल? यावर प्रत्येकाने विचार करावा. व बुद्धाचा स्विकार का केला असावा. *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला नागपूरच्या दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबर १९५६ (अशोक विजयादशमी)च्या मंगल दिनी बुद्ध धम्माची दीक्षा देताना धम्म आचारसंहितेच्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांपैकी ७ प्रतिज्ञा म्हणजे 'मी बुद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. याच प्रतिज्ञांचे हे अज्ञानी बांधव एकप्रकारे सर्रास जाहीर उल्लंघन करतात. त्यांना आपले बौद्ध धम्मगुरु पूजनीय भिक्खू संघ, बौद्धाचार्य, धार्मिक अभ्यासू व्यक्ती, धम्म प्रचार प्रसार करणारे उपासक किंवा उपासिका किंवा एकूणच समाज काय म्हणेल याची मुळीच पर्वा नसते. अश्या लोकांना स्वतःच्या परिवाराचा आनंद महत्वाचा वाटतो. तर त्यांना बुद्धधम्म तत्वज्ञान गौण वाटते. स्वतःच्या परिवारामध्ये आनंद साजरा करणे हेच त्यांचे ध्येय असते.* दिवाळीचे पाच दिवस मनसोक्त आनंद त्यांना घ्यावासा वाटतो. त्यांना समाज परिवर्तनाची चिंता वाटत नसते. किंवा आपल्या या कृतीमुळे धम्म आचरण तत्व याची कशी विटंबना होते याविषयी ते फारसे गंभीर नसतात. अश्या लोकांनी आतातरी बदलण्याची आवश्यकता आहे. किती दिवस हा दुटप्पी खेळ करणार आहात तुम्ही? यावर बाबासाहेब असे म्हणतात की, ज्या प्रमाणे एखाद्या विवाहीत स्त्रीचा संसार मोडला व तिला पतीने सोडून दिले. दोघांनी परस्पर संमतीने कायदेशीर काडीमोड करून घेतला. मग तिने तिचा नवीन दुसरा संसार पुन्हा नव्याने थाटला तर पुन्हा ती स्त्री किंवा तो पूर्वजन्मातील जोडीदार यांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण देखील जुन्या पूर्वाश्रमीच्या हिंदू धर्माला सोडून आता जवळपास ६७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीही त्या धर्माच्या जुन्या चालीरीती, व्रतवैकल्ये, उपवास, सण, उत्सव, रुढी, परंपरा, देव देवता, तीर्थ स्थानी जाणे आदी. कधी थांबवणार आहोत ? बौद्ध असूनही दिवाळीमध्ये दिवे पेटवणाऱ्यांनो तुमच्या डोक्यातला अज्ञानाचा अंधकार कधी आणि केव्हा नष्ट करणार आहात? या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच तुमचे शोधावे. कारण तुम्हाला सर्व जागृत बौद्ध बांधव सर्व प्रकारे समजावून सांगतात. मात्र तुम्हाला तुमच्याच मर्जीप्रमाणे वागायचे असल्याने कोणाचे काही चालत नाही. व उलट तुम्हीच म्हणायचे की, आपला बौद्ध समाज अजून सुधरत नाही. परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा की लोक समाजपरिवर्न करण्याची जबाबदारी कोणत्याही केवळ एका व्यक्तीची नसते तर ती समूहाची असते.
यामध्ये तुमची देखील भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण आहे. कारण बुद्धधम्माचा प्रचार व प्रसार कार्यातील कसे लोक सर्वांत मोठा अडथळा आहे. असे सभजले पाहिजे. असे मला वाटते. तुमचे हे धम्म अज्ञान आतातरी दूर हौवो यासाठी हा खास लेखनप्रपंच !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत