देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

द्रोह विद्रोह आणि साहित्य

द्रोह म्हणजे एखाद्याचा केलेला विश्वासघात .
जाणूनबुजून आणि ठरवून एखादाचा काटा काढणे .
कुरापती करणे . त्रास देणे इत्यादी .

विद्रोह म्हणजे द्रोह (कपट / कारस्थान ) नव्हे .
विद्रोह हा एखाद्या विचारधारेचा विरोध करण्यासाठी केला जातो .
विद्रोह हा क्रांती , बंड आणि उठाव करण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जातो. विद्रोहाने इंकिलाब किंवा एकाच वेळेस सगळी सत्ता उलथून टाकता येते . ते अन्याय्य व्यवस्थेविरुद्धचे आंदोलन असते . यामध्ये व्यक्ती महात्म्य नसून समाजाच्या (समष्टीच्या ) भल्यासाठी कार्य केले जाते .

Revolution म्हणजे क्रांती .
‘A fundamental change in Political Organization. ‘
(Merriam-Webster Dictionary)
म्हणजेच सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक , राजकीय क्षेत्रात घडवून आणलेल्या सकारात्मक बदलास क्रांती म्हणतात . पुष्यमित्र शुंगाने घडवून आणलेल्या बदलास प्रतिक्रांती ( Anti Revolution) म्हणतात , हे ध्यानात घेतले पाहिजे .

विद्रोही साहित्याचा मराठीत प्रवेश झाला आणि भल्याभल्यांची भंबेरी उडाली . अभिजनांच्या सवाष्ण आणि सोवळ्या मराठीला धक्का बसला .
तसाही अभिजन x बहुजन हा वाद नवा नाही .
अभिजनांनी बहुजनांच्या साहित्याला अस्पृश्य मानले .
त्या साहित्याला ग्राम्य / अशीष्ट म्हणून हीनवले . म्हणून महात्मा फुल्यांनी मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहिले .

मराठी साहित्यात बहुजनांचे साहित्य कुठे बसले ? अण्णा भाऊ साठे यांच्या कथा – कादंबऱ्यांची जेथे दखल घेतली गेली नाही . अभिजन विमर्शकांनी मराठी कथा – कादंबरी इतिहासात त्यांची नोंद जाणूनबुजून घेणे टाळले . मात्र , तेथे ते मराठी साहित्यातील मॅक्झिम गोर्की ठरले , हे लक्षात घेतले पाहिजे . तसेच आज महात्मा फुल्यांच्या साहित्याचा विविधांगी अभ्यास होत आहे ; विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा नव्हे !

विद्रोह हे साहित्यमूल्य आहे , हे अलीकडे अभिजन मंडळी मान्य करू लागले आहेत . आणि ‘विद्रोही साहित्य ‘ मराठी साहित्याचे केंद्रस्थान ठरू लागल्याने, विद्रोहयुक्त लिखाण कशासाठी ? किंवा विद्रोही साहित्याचा सवतासुभा करून काय साधणार ? विद्रोह हे साहित्यमूल्य आहे, हेच बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे किंवा अज्ञानामुळे-
विद्रोह कित्ती दिवस आळवीत बसणार?
असे अनेक प्रश्न निर्माण करत आहेत . त्यांना हे उत्तर आहे की , अभिजन साहित्याचे तेच तेच रडगाणे ऐकून ऐकून कान किटून आणि विटून गेले आहेत . तरीही त्यांनी त्यांचे हजारो वर्षांपासूनचे तुणतुणे वाजविणे सोडले नाही . तर इतक्यातच ( जेमतेम ४०-५० वर्षांत ) विद्रोही साहित्याला विरोध करावा ; ह्याचे नवल वाटते . मात्र , काही हौशी विद्वान त्यांच्या हातातील बाहुले बनून काम करताना दिसतात तेव्हा आम्हांस वाईट वाटते .

काही महाभागांनी नवा जावईशोध लावला . तो असा-
‘समाज सुधारकांचा मराठी साहित्यावर प्रभाव असल्यामुळे मराठी साहित्याची नैसर्गिकता नष्ट झाली आहे . ‘
म्हणजेच अलीकडचे मराठी साहित्य हे निकृष्ट आणि नि:सत्त्व झाले आहे . असे त्यांना म्हणायचे आहे .
ह्याचा अर्थ असा समजायचा काय, महात्मा फुले , शाहू महाराज , सयाजीराव गायकवाड , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने आणि प्रभावाने मराठी साहित्य आपले नैसर्गिकत्व विसरले . असे असेल तर अभिजनांची ही खेळी बहुजन / सर्वहारा वर्गाने वेळीच समजून घेतली पाहिजे . अन्यथा , मराठी साहित्यात मोठा अनर्थ घडण्याचा धोका टाळता येणार नाही .

  • डॉ० भूषण रामटेके

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!