देश-विदेशमुख्यपानवातावरण

निस्पृह विचारधारा..

काल जगाने एक विचित्र विरोधाभास पाहिला…असा विरोधाभास ज्याची इतिहास कायम नोंद ठेवेल. इराण मधील जवळपास दीड कोटी (इराणची एकूण लोकसंख्या नऊ कोटी आहे) जनतेने हस्ताक्षर करून मानवी साखळी उभी केली. ही साखळी त्यांच्यावर झालेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्ष अन्यायाविरुद्ध तयार केलेली होती.
ही साखळी गेली अनेक वर्ष वाळीत टाकलेल्या एका देशाने “मेक इन” नारा न देता खरोखरच स्वतःच्या देशात स्वतःच्या बुद्धी कौशल्य वापरून तयार केलेल्या देशासाठी होती.
भविष्यात जेव्हा कधी जगामध्ये युद्ध लढले जाईल तेव्हा इराणी जनतेने या युद्ध परिस्थितीत जी हिम्मत दाखवली ती वर्णन केल्याशिवाय कोणताही युद्ध वर्णन पूर्ण होणार नाही.
एका बाजूला सत्तेच्या उंच सिंहासनावरून दिली गेलेली धमकी…आणि दुसऱ्या बाजूला साध्या, निरपराध माणसांनी हातात हात घालून उभं केलेलं शांततेचं बळ.
Donald Trump यांनी इराण ला दिलेली कठोर चेतावणी ही फक्त राजकीय नव्हती…ती भीतीची, असुरक्षिततेची आणि युद्धाच्या सावलीची आठवण होती.
पण त्या धमकीला उत्तर देण्यासाठी टँक, मिसाईल किंवा बंदुका नाही आल्या…
उत्तर दिलं ते सामान्य लोकांनी. कडेवर लहान लहान बाळ घेऊन उभ्या राहिलेल्या महिलांनी. दोन पायावर उभे राहता येत नसलेल्या वयोवृद्ध इराणी नागरिकांनी.
रस्त्यावर उतरलेले ते लोक, कोणाचा राजकारणाशी संबंध नाही, कोणाची सत्ता नाही, कोणाकडे शस्त्र नाही…
पण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती “आम्हाला युद्ध नको. पण आमच्यावर युद्ध लादले आहे, तर मग आम्हाला संपूर्ण युद्ध संपवायला हवे.”
त्यांनी हातात हात घेतले… एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं… आणि एक मानवी साखळी तयार केली. ती साखळी फक्त माणसांची नव्हती…ती होती भावना, आशा आणि शांततेची एकत्र विणलेली जाळी. ज्यामध्ये मरणाच्या भीतीचा लवलेश नव्हता. जे काही करायचं होतं ते देशासाठी आणि देशाच्या मातीसाठी इतकीच भावना होती.
त्या प्रत्येक हातामागे एक कहाणी होती. कोणाचं घर, कोणाचं मूल, कोणाचं स्वप्न… त्या साखळीमध्ये उभा असलेला प्रत्येक व्यक्ती जणू सांगत होता,
“आमचं आयुष्य ट्रम्प सारख्या वेड लागलेल्या राजकीय खेळासाठी नाही.”
धमक्या देणं सोपं असतं…पण एखादी संस्कृती संपविणे सोपं नसतं. युद्ध म्हणजे फक्त लढाई नसते. युद्ध सैनिक करतात पण त्याचा परिणाम भोगतात ते नेहमी सामान्य लोक.
गोळ्या सुटतात तेव्हा आवाज राजकारण्यांच्या भाषणांचा नसतो… तो असतो आईच्या रडण्याचा…बापाच्या असहायतेचा…
आणि एका निष्पाप मुलाच्या तुटलेल्या स्वप्नांचा.
काल त्या मानवी साखळीने जगाला एक मोठा संदेश दिला, शक्ती ही नेहमी शस्त्रात नसते… ती एकतेत असते.
इराणी लोक कोणावर ओरडले नाहीत…त्यांनी कुणावर आरोप केले नाहीत…कोणाला शिव्या शाप दिले नाहीत की कोणाची संस्कृती नष्ट करण्याची धमकी सुद्धा दिली नाही.
ते फक्त शांत उभे राहिले…
पण त्यांची शांतता खूप काही बोलून गेली.
आजच्या या तणावपूर्ण जगात,
जिथे एक निर्णय हजारो जिवांवर परिणाम करू शकतो…
तिथे त्या साध्या लोकांनी दाखवून दिलं, मानवता अजून जिवंत आहे, देश प्रेम जिवंत आहे, आणि देशासाठीच सर्वोत्तम बलिदान देण्याची प्रवृत्ती सुद्धा जिवंत आहे.
आणि कदाचित…
म्हणूनच
जग वाचवण्याची ताकद अजूनही सामान्य माणसाच्या हातात आहे राजकारण्यांच्या नव्हे.
एक सामान्य भारतीय

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!