महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ
महाराष्ट्राच्या सत्ता सिंहासनाकडे जाणारी वाट महायुतीसाठी बिकट

-अशोक सवाई.
महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा व जम्मू & काश्मीर या चारही राज्याच्या निवडणुका एकाच वेळी होतील असा राजकीय निरीक्षकांपासून सर्व सामान्य लोकांपर्यंत सर्वांचा कयास होता. पण तसे झाले नाही. 'राजा बोले दल हाले' या म्हणी प्रमाणे राजाच्या इशाऱ्यावरून प्याद्याने म्हणजे निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्याच्या निवडणूका पुढे ढकलल्या. त्या अजून किती पुढे ढकलल्या जाणार हे राजाच्या मर्जीवर अवलंबून आहे. होवू शकते २०२५ ही उजाडू शकते. वाटत होतं राजा अल्पमतात आल्यावर नरमाईत येईल पण तसं दिसत नाही. इकडे आपल्या महाराष्ट्रात निवडणूकीच्या तारखा जाहीर व्हायच्या आधीच निवडणूक ज्वर चढायला लागला. प्रत्येक पक्षाने आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ८३-८४ वर्षाचा शरद पवार नावाचा नवतरूण पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. या तरुणाची जिद्द आहे महायुतीला सत्तेच्या तख्तावरून खाली खेचण्याची. त्यांच्या ताफ्यात नव्याने सामिल झालेला वर्धेचा तडफदार तरूण नितेश कराळे मास्तर हा आपल्या वऱ्हाडी भाषणातून श्रोत्यांना हसवता हसवता सत्ता धाऱ्यांना असे काही मार्मिक चिमटे काढतो की, दस्तुरखुद्द शरद पवरानांही हसू आवरता येत नाही. ओरिजनल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे जवळ रॅली व सभेचे नियोजन तयार आहे. ते कधीही महाराष्ट्र दौऱ्यावर निघू शकतात. त्यांची एक निडर महिला शिलेदार सुषमा अंधारे आपला एक मोर्चा सांभाळून आहे. महाराष्ट्रातील कांग्रेस जवळ सद्ध्या तरी लोकांना आकर्षित करण्यासाठी खास चेहरा नसल्याने ते जास्तीत जास्त राहूल गांधीं, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे व सोबतीला अखिलेश यादव यांच्या रॅली व सभा आयोजित करण्याचे ठरवतील. कारण कांग्रेस मध्ये सद्ध्या राहूल गांधींना हुकमी एक्का मानला जातो. जर अखेरपर्यंत म्हणजे सत्ता स्थापने पर्यंत या तिघांचाही व्यवस्थित ताळमेळ जुळत राहिला तर सत्ता यांच्या गळ्यात माळ घालायला उत्सुक राहील.
काल परवा लोक पोल या संस्थेचा ओपिनियन पोल आला. तो सर्वे महाराष्ट्रात महायुतीला ११५ ते १२८ जागा देतो व मतांची टक्केवारी ३८ ते ४१% सांगतो. महा विकास आघाडीला १४१ ते १५४ जागा व टक्केवारी ४१ ते ४४% आणि उरल्या सुरल्यांना ५ ते १८ जागा व टक्केवारी १५ ते १८% राहील असा हा ओपिनियन पोल सांगतो. पण मला वाटते महायुती या सर्वेच्या खाली येवू शकते. माझ्या राजकीय अंदाजानुसार जर आजच्या तारखेत निवडणूका झाल्या तर संपूर्ण महायुती व त्यांचे पुरस्कृत उमेदवार (असल्यास) धरून ते डबल डिजीटच्या पुढे जाणार नाही. महायुतीमध्ये सवतासुभा असल्यामुळे त्यांचा सूज्ञ कोअर वोटर देखील नाराज होऊन तो काठावर जावून बसला आहे. नेमक्या निवडणूकीच्या दिवसी तो कोणत्या बाजूला झुकेल सांगता येत नाही. भाजपच्या उपद्व्यापी कारनाम्याने शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे पक्ष तोडल्यामुळे जनते मध्ये त्यांच्या बद्दलची सहानुभूती अजूनही कमी झाली नाही. शिवाय मराठा आरक्षण फॅक्टर आहेच. तसेच दीक्षा भूमीवर खोदकाम, पुण्यातील हीट ॲन्ड रन प्रकरण, बदलापूर कांड, महिलांची छेडछाड, महिला पत्रकारांचा अपमान, मराठी माणसाची अस्मिता असणारे छत्रपती राजे यांचा मालवण येथे पुतळा कोसळणे, त्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणे, तसेच नागपूरातील ताजे प्रकरण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्या दिवट्याने भर शहरात १३० च्या कि. मी. वेगाने आलीशान गाडी पळवून इतर गाड्यांना दिलेल्या धडका व त्यात काही गंभीर जखमी झालेले लोक हे सोशल मीडियावरील बातम्यांच्या रूपात समोर आले. तसेच राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांवर महायुती विषयी लोकांच्या मनात भयंकर रोष आहे. बुद्धवादी, विचारवंत वक्ते खुल्या मंचावर त्याविषयी खुलेपणाने बोलताना दिसतात. त्यामुळे सत्तेकडे जाणारी वाट महायुतीसाठी खूपच बिकट झाली आहे.
महायुतीत महायुतीचे कारभारी नाथाभाऊ (शिंदे वाले) दादाभाऊ (पवार वाले) देवाजी पंत (फडणवीस वाले) या तिघांचे तोंडे तीन दिशेला आहेत. या नाही त्या कारणाने त्यांच्या कुरबुरी सुरू असतात. आपसात त्यांचे पटत नाही. आज हे तिघेही एका मंचावर आले की एकमेकांना खोटे खोटे हात जोडताना खोटे खोटे हसताना दिसत असले तरी पुढे जागा वाटपा वरून त्यांच्यातील वाद स्प्रिंग सारखा उडून वर येईल. महायुतीच्या कारभाऱ्यांना वाटत आहे की निवडणूकीत 'लाडकी बहिण योजना' आपल्याला हात देईल. पण चित्र असे आहे, त्या योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिघांमध्ये सदर योजनेची खेचाखेची चालली आहे. त्यांच्या ओढाताणीत योजनेचा 'लाडकी' शब्द एकाकडे आला. 'बहिण' शब्द दुसऱ्याकडे गेला, अन् 'योजना' शब्द तिसऱ्याच्या हातात पडला. तिघांमध्ये ही योजना तुकड्यात वाटली गेली. आपापल्या पोस्टर वर तिघेही आपापली छबी झळकवत योजनेची जाहिरात करताना दिसतात. या योजनेद्वारे एक प्रकारे बहिणींना लाच देऊन त्यांची मते खरेदी करण्याच्या जाहिराती आहेत ह्या. हे कोणत्याही सूज्ञ मतदाराला कळल्या वाचून राहत नाही.
ज्यांच्यासाठी ही सदर योजना लागू केली. त्यांची मते जाणून घेतल्यावर स्पष्ट लक्षात येते की, त्या आयाबहिणींना या योजने पेक्षा जास्त महत्त्वाचे वाटते ते म्हणजे आपल्या मुलीबाळींची सुरक्षितता, त्यांचे माफक दरात शिक्षण, कुटुंबासाठी माफक दरात आरोग्य सेवा, स्वयंपाक घरातील बजेट हाताबाहेर न जाणे, पोरापोरींचे खाली असलेले हात उद्योगी लागून कमावते होणे, मूलभूत गरजा घरातील बजेटच्या परिपेक्ष्यात येणे, शहरात/गावात शांतता असणे व कुटुंबासोबत थोडसं का होईना सुखकारक जिवन जगणे बस. एवढ्याच माफक अपेक्षा आहेत विद्यमान मायबाप सरकार कडून या बिचाऱ्या बहिणींच्या. त्यामुळे विद्यमान त्रिमूर्ती सरकारने जरी 'लाडकी बहिण योजना' सुरू केली तरी या सरकारने बहिणींकडून मतांची फारसी अपेक्षा ठेवू नये असाच अर्थ वरील व्यक्त केलेल्या महिलांच्या मतांचा निघतो.
भाजपमध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या तीन तीन पिढ्या खपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर मिरवला, घरची भाकर खाऊन वेळप्रसंगी पदरमोड करून पक्षाचा प्रचार केला, खस्ता खाल्ल्या त्यांना सोडून गेले दहा वर्षांपासून बाहेरून आयात केलेल्या उमेदवाराला निवडणूकीचे तिकडे वाटप केलीत, त्यामुळे पक्षात टोकाचा असंतोष वाढला. नाउमेद होवून पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची त्याच्यावर पाळी येत आहे. भाजपची सत्तेची मस्ती, मस्ती च्या जोरावर इतरांना धमकावणे, सार्वजनिक ठिकाणी बेताल, बेखौप वक्तव्ये करणे, महिलांचा अपमान करणे या सर्वांमुळे महाराष्ट्रातच काय इतर राज्यातही भाजप सत्तेवर येण्याचा ग्राफ खाली खाली येत चालला आहे. त्यात ही दिल्ली दरबाराचा राजा व त्याचा वजीर (गुजरात लाॅबी, उत्तर भारतीय पत्रकार म्हणतात त्याप्रमाणे) जर महाराष्ट्रात प्रचाराला आले तर त्रिमूर्ती घटक पक्षांच्या उमेदवारांचे डिपाॅझीट सुद्धा जप्त होण्याची नौबत येवू शकते. अशी भीती घटक पक्षांना वाटत आहे. राजा/वजीर प्रचारात जेवढे शेंडा बुडूख सोडून बोलतील तेवढा त्याचा फायदा महा विकास आघाडीला मिळू शकतो. हे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुभवावरून महा विकास आघाडीच्या व महायुतीच्या सुद्धा लक्षात आले आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत इव्हीएम चा खेळ झाला होता. हे सोशल मीडियावरील बातम्यांमुळे आपणा सर्वांना माहित झाले. तसा खेळ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जर झाला नाही तर सत्तेच्या सिंहासनाकडे जाणारी वाट भाजपसाठी काटेरी आहे, दगडधोंड्याची आहे, बिकट आहे. अशा स्थितीत राज्यात हंग असेंब्ली यावी व त्यात काहीतरी जुगाड करून सत्तेकडे जाण्यासाठी एखादी छोटीशी भूस्की (लूप होल) मिळावी असे जर भाजपला वाटत असेल तर त्यात नवल नाही. किंवा संबंधित यंत्रणेमध्ये तशी सेटिंग होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. बघू या, नजीकच्या येणाऱ्या काळाचे काय म्हणणे आहे ते.
-अशोक सवाई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत