३ ऑक्टोबर १९५७ नागपूर येथील दीक्षाभूमीधर घोषित करण्यात आलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कोणता ?

अशोककुमार उमरे
३० सप्टेंबर १९५६ ला बाबासाहेबांनी स्थापन केलेला आणि बाबासाहेबांच्या नंतर ३ ऑक्टोबर १९५७ नागपूर येथील दीक्षाभूमीधर घोषित करण्यात आलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष कोणता ? १९५७ नंतर निवडणूक आयोगाकडून मान्यता पावलेला आणि १९६४ च्या भुमीहीनाच्या सत्याग्रहाची साऱ्या जगाने दखल घेतलेला रिपब्लिकन पक्ष कोणता? संविधानाच्या अज्ञानामुळे १९७१ हा पक्ष बळकावल्याच्या स्थितीत आणण्यासाठी संविधानानुसार कोणी एक नेताच जबाबदार असतो की मुळ वैचारिक पक्ष संघटनेला सोडून गेलेल्या लोकांची काहीच जबाबदारी नसते का? चुकीच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या आपमतलबी नेत्यांना संविधानानुसार बहुमताने धडा शिकविण्याऐवजी जे पळून गेले असे कार्यकर्ते जबाबदार नाहीत का? संविधानाची अंमलबजावणी केली असती तर ज्याच्या नावाने पक्ष मुरवला म्हणून बोटे मोडता त्यांचे अस्तित्व तरी राहिले असते का? संविधानानुसार बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चालयायचा असेल तर वेगवेगळ्या दुकानदाऱ्या थाटण्याची काय आवश्यकता आहे? संविधानानुसार पक्षाचे बहुमत आपल्याकडे वळविता येत नाही याची खात्री झालेले अघोरी महत्वकांक्षी आणि प्रतिबाबासाहेब बनण्याची इच्छा असलेल्याच्या बाबासाहेबांच्या नांवाने भावनिक करणाऱ्या दुकानदाऱ्या नाही तर काय आहे?
लोकशाही संविधानानुसार कोणी कितीही मोठा आपमतलबी, तानाशाह, जुमलेबाज नेता असो किंवा आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करत असला तरी त्यांच्याकडे बहुमत आहे या सबबीखाली त्याला देश नावाच्या संघटनेचा प्रमुख नेता मानतोच की नाही? तो आपमतलबी, तानाशाह, जुमलेबाज आणि आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करतो म्हणून कोणी देश नावाचे संघटन सोडून थोडेच पळून जात असतो?
किंवा एका मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या चुकीच्या नेत्यांसाठी संपूर्ण देश नावाच्या संघटनेला वेठीस धरून कोणी फुटीरतावादाला खतपाणी घालत आपला सवतासुभा सुद्धा उभा करीत तर नाही ना? कारण देशात संविधान हे सर्वश्रेष्ठ असून संविधानानुसार बहुमताने देश चालावा म्हणून आपण फार गंभीरतेने प्रयत्न करत असतो.
कोणी स्वार्थी आपमतलबी नेता शीर्षस्थानी आला असेल तर त्याला संपूर्ण ताकद पणाला लावून अशा नेत्यांना काढून योग्य कार्यकर्त्यांला त्यांच्या जागी बसविण्याचा पुर्ण प्रयत्न करत असतो. पुन्हा आपणाला योग्य न वाटणारा नेता बहुमताने प्रमुख नेता बनला म्हणून त्याला कंटाळून पळून जात नाही. पुन्हा लोकशाही संविधानानुसार बहुमतासाठी प्रयत्न करत असतो. कारण आपला लोकशाही संविधानावर प्रगाढ विश्वास आहे.
हाच प्रयत्न आपण एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी मोठ्या परिश्रमाने निर्माण केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्ष संघटनेसाठी का करत नाहीत? वेगवेगळ्या समांतर पक्ष संघटना ह्या संपूर्ण समाजाला अदखलपात्र, लाचार आणि कमजोर करणाऱ्या आणि फुटीरतावादाला खतपाणी घालत नाही का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात पक्षांतर्गत लोकशाही संविधानानुसार बहुमताने आपला योग्य नेता निवडून बाबासाहेबांच्या पक्षाचा शकट पुढे दामटण्यासाठी आम्ही का प्रयास करू नये?
अशोककुमार उमरे
8698842402
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत