बावीस प्रतिज्ञा

भदंत विमलकीर्ती गुणसिरी
प्रास्ताविक
तथागत गौतम बुद्धांचा उपदेश ऐकल्यानंतर माणसाची त्याबद्दल खात्री पटत असे आणि अत्यंत श्रद्धेने तो तथागत बुद्ध, त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ यांना शरण जात असे. वंदन करून तो तथागत बुद्धांना विनंती करीत असे की,मी जिवंत असेपर्यंत एक तर भिकू म्हणून स्वीकार करावा किंवा उपासक म्हणून स्वीकार करावा. त्यानंतर तो त्रिशरणांसह भिकू जीवनाच्या दहा शिलांचा स्वीकार करून एक तर भिकू बनत असे किंवा त्रिशरणांसह पंचशीलांचा स्वीकार करून उपासक बनत असे. महिलांचे बाबतही असेच घडत असे. बुद्ध धम्मात प्रवेश करण्याच्या अशा दोन प्रकारच्या धम्मदीक्षा होत्या. त्यामध्ये भिकू बनताना गृहत्याग करून शिरोमुंडन आणि चिवरासारखी खास वस्त्रे परिधान करावी लागत असल्याने त्या दीक्षाविधीचा खास पद्धत चिरंतर चालत राहिली. परंतु उपासक बनताना केवळ त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्याचाच विधी असल्याने, आणि बौद्ध परिवारात मुलाबाळांना ते संस्कार लहानपणापासून मिळत असल्यामुळे उपासक दीक्षाविधीचे महत्व एक रूढी बनवून हळू हळू कमी होत गेले आणि पुढे अक्षरश लोक पावले. तरीही अबौद्ध माणसाला त्रिशरणांसह पंचशील घेऊन बौद्ध बनण्याचा विधी चालूच राहिला. धम्मदीक्षेचे महत्त्व फक्त गृहस्थ बौद्धसमाजात कमी झाले. याचे कारण इतकेच की बौद्ध परिवारात जन्म झाल्याने गृहसंस्कारातून रूढ झालेली धम्मदीक्षा आपोआपच मिळत गेली आणि तिचे महत्व लोप पावले. जेव्हा भारतात पुन्हा धर्माचे पुनरुजीवन करण्याची वेळ आली, तेव्हा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध बनण्याची ही पारंपरिक रूढी कमजोर वाटली. भारतासारख्या जातीव्यवस्थेने बरबटलेल्या आणि जन्माने मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या रूढी परंपरा प्रचलित असलेल्या देशात तशाच प्रकारची जन्मावर आधारित रूढी परंपरा संपूर्णपणे निरुपयोगी ठरणार होती. याचे कारण की रुढी परंपरेमुळे लाभणाऱ्या गोष्टी प्रति माणसाची भावनिक बांधिलकी निर्माण होत नसते आणि म्हणून तिचे गंभीरपणे पालन करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नसते. इतकेच नव्हे, तर त्या रुढी परंपरेतील बरे वाईट जाणण्याची सुद्धा त्याला गरज वाटत नसते. म्हणून त्या रूढी परंपरेकडे माणूस केले तर केले नाही तर नाही अशा बेफिकीरीने पहात असतो. जन्माने लाभणाऱ्या जीवनपद्धतीविषयी माणूस असा बेजबाबदार आणि बेफिकीर बनत असतो.म्हणून बुद्धाने जन्मजात जीवनपद्धतीचा निषेध केला आणि कर्मजात जीवन पद्धतीचा पुरस्कार केला. म्हणून कळत्या वयात जबाबदारीच्या जाणिवेने त्रिशरणांसह पंचशीलांची धम्मदीक्षा घ्यावीच लागते. हे धम्मदीक्षेचे मर्म बाबासाहेबांनी अचूकपणे जाणले होते आणि म्हणून त्यांनी पारंपारिक रूढीमध्ये 22 प्रतिज्ञांची भर घालून भारतीयांसाठी एक नव्या प्रकारची धम्मदीक्षा निर्माण केली. ती हिंदू धर्मातून बुद्ध धम्मात धर्मांतर करण्यासाठी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती बौद्ध परिवारातील मुलाबाळांसाठीसुद्धा महत्वाची आहे. याचे कारण बुद्धाच्या मूळ शिकवणीनुसार कर्मानेच माणूस घडतो, हे सत्य कधीही दुय्यम करू नये. भारतात माणसाला जन्माने धर्म आणि जात चिटकविण्याची रूढी परंपरा असल्याने या देशातील अत्यंत भयानक समजली जाणारी जातीभेदाची विषमता नष्ट होऊ शकत नाही.
बाबासाहेबांना तर ती नष्ट करून समतेवर आधारित बुद्ध धम्माची स्थापना करायची होती. त्यासाठी माणसाची खरे खोटे तपासण्याची आणि खाऱ्याप्रती जबाबदार राहण्याची प्रवृत्ती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी बुद्धधम्मदीक्षेची रुढीग्रस्तता मोडून मूळ बुद्ध शिकवणीप्रमाणे ती जबाबदारीची कर्मनिष्ठा म्हणून जोपासणे आवश्यक आहे. म्हणून धम्मदीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध मानू नये, हा त्यांचा आग्रह होता. म्हणून त्यांनी प्रचलित केलेल्या 22 प्रतिज्ञांसहच्या धम्मदीक्षेतेचे महत्व लक्षात घेणे हे प्रत्येक भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. 22 प्रतिज्ञाबद्दल अनेकांच्या मनात फार मोठे गैरसमज आहेत. हिंदी समाजाला तर त्यांचा फार राग आहे. 22 प्रतिज्ञांचा संदर्भरहित एकांगी प्रचार करण्याचे सतत प्रयत्न होत राहिले आहेत. त्यामुळे समाजात विरोधकाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा परंतु अध्यापिक बौद्ध बनण्यास तयार नसणारा फार मोठा वर्ग, ज्याला प्रामुख्याने अन्य मागासवर्गीय म्हटले जाते, या 22 प्रतिज्ञांच्या आक्रमक प्रचारामुळे बिचकून जातो आणि बुद्ध धम्मा जवळ येण्याची इच्छा असली तरी त्यापासून चार हात दूर राहतो, असा अनेकांचा अनुभव आहे. बुद्ध धम्माच्या स्वीकारामुळे बौद्ध समाज अधिक नीतिमान, धृतीमान, गतिमान आणि संघटित दृष्ट्या सामर्थ्यवान झाल्याचे चित्र कोठेच दिसत नसल्यामुळे सर्वसाधारणपणे बहुजनांमध्ये निर्माण झालेली बुद्ध धम्माची ओढच मुळी कमजोर पडत चाललेली दिसते आहे. मराठा समाजाने धर्मांतराचा विचार राबवितांना सरळ सरळ बुद्धाचा धम्म स्वीकारण्या ऐवजी नव्या शिवधर्माची स्थापना केली, हे त्याचे एक ताजे उदाहरण आहे. त्यामुळे बुद्ध धम्माकडे आकर्षित झालेल्यांची ओढ खच्ची होऊन बहुजनांच्या होऊ पाहणाऱ्या धर्मांतराची धार कमी झालेली आहे.
त्यातूनही बहुजन समाजात आज जी काही बुद्ध धम्माच्या स्वीकाराची भाषा बोलली जाते ती अधिकांशपणे राजकीय दृष्टीने केली जाणारी भाषा असून त्यात एकंदरीत माणसाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण सुधारणेचा विचार गौण असल्याचे दिसते आहे. यापूर्वी भटक्या विमुक्त जातीचे मोठ्या गाजावाजात सार्वजनिक धर्मांतर घडून आले होते. त्या बौद्धांचे पुढे काय झाले याचा काही कोणाला थांगपत्ता नाही. तेही नाम के वास्ते बौद्ध बनून गप्प बसल्यासारखे दिसत आहेत. अन्यथा सध्याच्या बौद्ध समाजात त्यांचा वावर थोडाफार तरी वाढलेला दिसला असता. बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचारच जेथे बौद्ध झालेल्या समाजाने नीटपणे जाणला आणि जोपासला नाही, तेथे इतरांच्या संभ्रमाबद्दल बोलायची काही सोय नाही. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता बाबासाहेब आंबेडकरप्रणित 22 प्रतिज्ञांसह धम्मदीक्षेचे मर्म पुन्हा एकदा लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””’
विचार प्रसारक बाळासाहेब ननावरे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत