जागृत केव्हा होणारं…???

भास्कर भोजने.
ज्यांना भारतीय संविधान मान्य नाही.स्वातंत्र्य मान्य नाही, समाजातील बहूतेक वर्गाला गुलाम म्हणून वागविण्यात धन्यता वाटतेय…..!!
समता मान्य नाही. विषमता हवी.मुठभर लोकांना अमर्याद संधी आणि बहूजनांना संधीच मिळू नये म्हणून अनेक प्रकारची बंदी….!!
ज्यांना न्याय पसंत नाही. बहुजनांवर अन्याय, अत्याचार करण्यात मर्दांगी वाटतेय. स्त्रीला दासी म्हणून वागविण्याच्या विकृती मध्ये मर्दपणा वाटतोय…!!
ज्यांना बंधुभाव नको आहे. समाजाचे स्तरीकरण करुन जाती, पोटजाती निर्माण करुन प्रत्येकाच्या मनात द्वेष पेरणी करुन सतत दंगली करण्यात आनंद वाटतोय त्या मुठभर समुहाने संविधान संपवण्यासाठी थंड डोक्याने ७४ वर्षे नियोजन बद्ध रितीने काम केले आणि आज ते संवैधानिक तरतुदी संपवण्यात यशस्वी होतं आहेत….!!
राज्यघटनेत कुठचं ५०% आरक्षण असावे असे नमुद नाही. तरीही कोर्टाच्या तोंडून म्हणजेच आपल्या जातभाईच्या तोंडून ५०% च आरक्षण असावे असा निर्णय करुन घेतला…!!
४० वर्षे ओबीसी समुहाला आरक्षण दिलेच नाही.दिल्यानंतर कोर्टाच्या नावाखाली म्हणजेच आपल्या जातभाईच्या तोंडून ओबीसी आरक्षणाला क्रिमिलेअर ची अट घातली.आणि आता एस. सी. एस. टी. आरक्षणाला क्रिमिलेअर ची अट घातल्या जाईल. एस. सी. एस. टी आरक्षणात ऊपवर्गीकरण करुन वेगवेगळ्या जातीसाठी कोट्यात कोटा आरक्षित होईल…!!
सवर्ण मुठभर आहेत. तरीही ते बहुसंख्याक वर्गाचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेत असतील तर मग ओबीसी, एस. सी. एस. टी. बांधवांनो किती दिवस झोपायचे..?? किती दिवस मुर्खपणा करीत आपसात भांडायचे.??
किती दिवस एक दुसऱ्या चा दुस्वास करायचा.?? आणि मनुवादी सवर्णांच्या हिताचे होईल असे गबाळेपणाने वागायचे…??
तु ओबीसी आणि मी एस. सी. मग आपणं वेगवेगळे आहोत. तुझा धर्म वेगळा,माझा धर्म वेगळा. तुझी संस्कृती वेगळी माझी संस्कृती वेगळी. तुझी जात खालची,माझी जात वरची.ही हीन भावना जोपासणा-या मुर्ख माणसांचा दृष्टीकोन असा बनला की,
तुझ्या आरक्षणाशी माझा काहीच संबंध नाही. तुझ्या वर होणाऱ्या अन्यायाशी मला काय देणेघेणे.?? हा तुसडा भाव सवर्णांच्या पथ्यावर पडतो आहे. आणि म्हणून धुर्त सत्ताधारी सवर्ण तो तुम्हाला एक एकटा गाठून तुमचे हक्क आणि अधिकार काढून घेत आहे…!!
१९९२ ला ओबीसी समुहासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या आणि १९९४ ला क्रिमिलेअर लावले गेले. ७४% आरक्षणवादी समुह गाढ झोपी गेलेला. कुणीही विचारले नाही. आमची सांपत्तिक बाजू तपासता तशी खुल्या वर्गातील नोकरदारांची सांपत्तिक बाजूची तपासणी व्हायला पाहिजे….!!
२०२४ मध्ये आता एस. सी. आणि एस. टी. ला क्रिमिलेअर लावले जाईल. ओबीसी उदासिन राहिलं त्याला एस. सी. एस. टी. समुहाशी काय घेणेदेणे.??
ओबीसी ५२%
एस. सी. १५%
एस. टी. ७%
तुमची बेरीज ७४% आहे. आणि ३.५% समुह तुमचे हक्क आणि अधिकार हिसकावून घेत आहे. लोकशाही आहे आणि तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तरीही तुम्ही अक्कलशुन्य भावनेने वागतं आहात….!!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या हातात दिलेल्या मतधिकाराचे शस्त्र तुम्हाला चालवता येत नाही.तुम्ही सवर्णांचे गुलाम म्हणून राहण्यात धन्यता मानता. सवर्णांच्या राजकीय पक्षाचे गुणगान गाता. सवर्णांचे राजकीय पक्ष कोणते.? हेही तुम्ही गेल्या ७४ वर्षांत ओळखू शकले नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे…!!
स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारा आंबेडकरवादी आजही सवर्णांच्या राजकीय पक्षावर विसंबून संविधान वाचवण्याची परावलंबी भुमिका घेतो हे कमालीचे राजकीय अज्ञान नाही का.??
सांसदीय लोकशाहीला ७४वर्षे झाले आहेत आणि आम्ही ओबीसी, एस. सी. एस. टी. आपले हक्क आणि अधिकार शाबूत ठेवू शकलो नाही तर याला सवर्ण जबाबदार नाहीत तर आपले कमालीचे राजकीय अज्ञान आणि अमानवीय विकृत स्वभाव कारणीभूत असेल याची नोंद घ्यावी…!!
आज आरक्षण संपविले ऊद्या याच पद्धतीने संविधान संपविले जाणार आहे. तुमची झोप ऊघडेल तो दिवस भाग्याचा….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत