अशोक चक्र , धम्मचक्र व धम्मचक्र प्रवर्तन सुत्त परस्परसंबंध

मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
१) अशोक चक्राचे काय महत्व आहे?
२) अशोक चक्रातील २४ आरेंचा खरा अर्थ काय आहे?
३) धम्मचक्र काय आहे?
४) अशोक चक्रचा धम्मचक्राशी , धम्मचक्राचा धम्मचक्रप्रवर्तन सुत्तशी काय संबंध आहे?
चला , थोडं जाणून घेऊया …..
भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन व पुनीत झालेल्या विविध ऐतिहासिक धम्म स्थळांचा अभ्यास करीत असताना बौद्ध धम्मातील विविध चिन्हे व प्रतीकांचा अभ्यास करणे ,तेवढेच महत्वाचे आहे. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बौद्ध संस्कृतीमध्ये विविध चिन्हे व प्रतिकांची निर्मिती झाली . सम्राट अशोकानी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर धम्म प्रचार व प्रसार सोबत या चिन्हांचा व प्रतीकांचा पण प्रचार झाला . स्तूप , चैत्य , हत्ती , घोडा , सिंह , कमळ , बोधिवृक्ष ,पदचिन्ह, भिक्षापात्र , धम्मचक्र , इत्यादी चिन्ह व प्रतिकांच्या माध्यमातून बौद्ध धम्म तत्वज्ञान वा भगवान बुद्धांच्या जीवनातील एखादा प्रसंग प्रदर्शित केला जात असे .
बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर सम्राट अशोकानी सारनाथला , ज्याला धम्मचक्र प्रवर्तन भूमी म्हणतात , भेट दिली. या स्थळाची पूजा केली . या स्मरणार्थ तथा या भूमीचे धार्मिक महत्व जाणून अशोकानी चार सिंह असलेला एक स्तंभ निर्माण केला . ज्याला आज आपण ” अशोक स्तंभ ” म्हणतो . अशोक स्तंभ भारत देशाची राजमुद्रा आहे.
हा स्तंभ अशोकानी निर्माण केला.म्हणून त्याला अशोक स्तंभ म्हटले जाते .हा अशोक स्तंभ एका उंच अश्या दगडी पिल्लर वर निर्माण केला गेला.आज त्याची उंची अंदाजे ७ फूट आहे .त्यावर कमळाचे फुल उलटे केल्यावर जसा आकार बनतो त्या आकाराचे शिल्प तयार केले आहे .त्यावर गोल हर्निका बनवून त्यामध्ये चार प्राणी धावत्या अवस्थेत दिसतात.सिंह , घोडा , हत्ती , बैल हे चार प्राणी आणि प्रेत्येक दोन प्राण्यांच्या मध्ये एक २४ आरेंचा चक्र आहे . त्या २४ आरेंच्या चक्राला "धम्मचक्र" असे म्हणतात.हे चक्र अशोकानी निर्माण केले म्हणून आपण त्याला व्यावहारिक भाषेत अशोक चक्र म्हणतो . पण खऱ्या अर्थने ते धम्मचक्र आहे.
त्यावर आपल्याला चार सिंह चार दिशेने उभे असल्याचे दिसते.हे चार ही सिंह चार दिशेने गर्जना करीत आहे .मूळ स्तंभात या चार सिंहाच्या वर एक ३२ आरेंचे चक्र बनविल्या गेले होते. ते आज ही सारनाथच्या म्युजियम मध्ये आपण पाहू शकतो.अश्या प्रकारे हा स्तंभ अर्थात अशोक स्तंभ आपल्या बौद्ध धम्माचे चिन्ह आहे . ते धम्मचक्राचे प्रतीक आहे.ते धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचे प्रदर्शक आहे. एक बौद्ध म्हणू , अभ्यासक म्हणून या अशोक स्तंभमागील तत्वज्ञान समजून घेणे महत्वाचे आहे.
अशोक चक्र :-
२४ आरेंच्या चक्राला अशोक चक्र असे म्हणतात. पण मूलतः ते धम्मचक्र आहे.अशोकानी निर्माण केले म्हणून त्याला अशोक चक्र म्हटले जाते . धम्मचक्र या शब्दात दोन शब्द आहेत – धम्म आणि चक्र । धम्म म्हणजे बुद्धांचा उपदेश आणि चक्र म्हणजे चाक . आता कुणी म्हणते ते २४ तासांचे प्रतीक आहे . ते पूर्णपणे चुकीचे आहे . कारण अशोकाच्या काळात २४ तास , १२ तास अशी काही पद्धती नव्हती . २४ आरे आणि २४ तास हे फक्त एक योगायोग आहे . काही ठिकाणी , ह्या चक्रात सत्य , अहिंसा , प्रेम , मैत्री , मानवता इत्यादी २४ शब्द लिहून त्याला प्रदर्शित करतात. परंतु ते पूर्णपणे चुकीचे आहे . ते २४ तत्व मानवी जीवनात महत्वाचे आहे पण त्यांचा ह्या चक्राशी बिल्कुल संबंध नाही.
काही ठिकणी असे सांगितले जाते – बुद्धांचे ९ गुण , धम्माचे ६ गुण व संघाचे ९ गुण असे एकूण २४ गुण आहेत . त्यामुळे ह्या चक्रात २४ आरे आहेत. तसे पाहता हे सत्य पण आहे.परंतु जर हे धम्मचक्र आहे तर याचा सम्बन्ध धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताशी आहे. जेव्हा धम्मचक्राचा उपदेश दिला गेला , तेव्हा संघाची निर्मिती झाली नव्हती . धम्मचक्र प्रवर्तन सुत्ताचा उपदेंश सारनाथ ला दिला गेला .आणि तिथेच अशोकाने ह्या स्तंभाची निर्मिती केली.त्यामुळे अभ्यासक मंडळींनी याचा सखोल विचार करावा .
धम्मचक्राचा संबंध धमचक्रप्रवर्तन सुत्ताशी आहे .इतर काशाशीही नाही . त्यामुळे धम्मचक्रातील २४आरे समजून घ्यायचे असतील तर प्रथम आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त वाचावे लागेल. त्याचा अभ्यास करावा लागेल .
धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात , भगवान बुद्धांनी चार आर्यसत्याचा उपदेश केला . आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला .ह्या चारसत्यांना बुद्धांनी स्पष्ट केले आहे . …
दुःख आर्यसत्य –
१) जाती पी दुःखा २) जरा पी दुःखा ३)ब्याधी पी दुःखो ४) मरणम पी दुःखं ५) अप्पीयेही संपयोगो दुःखो ६ )पियेही विप्पयोगो दुःखो ७)यंपीचेन्न न लाभती तं पी दुकखं ८) संखीतेन पंचोपादान खंदा दुःखा अर्थात ५ उपदान स्कंध
७+ ५ = १२
२) दुःख समुदाय आर्यसत्य :- दुःखाचे कारण
१) काम तन्हा २ ) भव तन्हा ३)विभव तन्हा
= ३
३) दुःख निरोध आर्यसत्य – अर्थात निब्बान प्राप्त करणे होय
= १
४ ) दुःख निरोध गामीनी पटीपदा :- आर्य अष्टांगिक मार्ग
१) सम्मा दिट्टी २) सम्मा संकप्पो ३)सम्मा वाचा ४)सम्मा कम्म ५ ) सम्मा आजीओ ६) सम्मा सती ७) सम्मा वायमो ८) सम्मा समाधी
= ८
धम्म चक्र प्रवर्तन सुत्तात चार आर्यसत्यांचा उप्पदेश केला आहे . ह्या चार आर्यसत्यांना वरील प्रमाणे २४ प्रकारे स्पष्ट केले आहे . १२ + ३ + १+ ८ = २४
अश्याप्रकारे चार आर्य सत्याचे प्रतीक असेलेले , धम्म चक्र प्रवर्तन सुत्ताचे प्रतीक असलेलं ” चक्र ” अशोकानी सारनाथ येथे निर्माण केले . आणि इथूनच सिंह गर्जनेप्रमाणे धम्मचक्राचा उपदेश चारही दिशेने दूर दूर पर्यंत पसरला करिता चार सिंह निर्माण केले . अश्याप्रकारे हा अशोक स्तंभ अर्थात धम्मचक्र आपल्या बौद्ध धम्माचे चिन्ह आहे .प्रतीक आहे.ती देशाची राजमुद्रा आहे .
आपण किती पुण्यवान आहोत की आपण अश्या देशात जन्म घेतला ज्या देशात बुद्धांचा जन्म झाला . ज्या देशाची राजमुद्रा अशोक चक्र आहे . श्रीलंका , थायलँड असे अनेक बौद्ध देशांच्या ध्वजावर पण नाही असे धम्मचक्र आपल्या भारत देशाच्या ध्वजावर आहे .
स्वाभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा ! स्वाभिमान आहे मला मी बौद्ध असल्याचा !आणि स्वाभिमान आहे मला मी बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक असल्याचा !
जय बुद्ध ! जय भीम ! जय भारत !
संकलन – भंतेजी धम्मानंद, छ. संभाजी नगर
प्रसारक : मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत