दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

आदरणीय डॉ. गंगाधर पानतावणे सरांचा आज जन्मदिवस. त्यांना जाऊन सहा वर्षे झाली. त्यांच्याशी केलेला हा भावपूर्ण पत्र संवाद.

अस्मितादर्श साहित्य चळवळीच्या माध्यमातून नव्या पिढीतील अनेक साहित्यिकांना घडवणारे मराठीतील सुप्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक

डॉ. अनंत राऊत
आदरणीय,
डॉ. गंगाधर पानतावणे सर,
सविनय प्रणाम

“सर, सर आपण कुठे आहात? कुठे आहात सर आपण?”
“……………………”
” सर, आपण माझ्या हाकेला प्रतिसाद का देत नाहीत? माझ्या, आणि कुणाच्याही हाकेला तात्काळ प्रतिसाद देणारे,भरभरून बोलणारे माझे सर आता बोलत का नाहीत? सर बोला ना कुठे आहात तुम्ही?”
मागे एका कार्यक्रमासाठी नांदेडला आलात. आपल्या अध्यक्षतेखालीच कार्यक्रम होता तो. पण लवकरच आपलं भाषण आटोपून आपण औरंगाबादला परतलात. मला आपल्याशी भेटायचं होतं. आपणाला बोलायचं होतं. मग मी आपणाला फोन केला. आपण तो चटकन उचललात.
“हॅलो सर कुठे आहात आपण? मला आपल्याशी भेटायचंय.”
आपण म्हणालात
” मी निघालो. परत औरंगाबादला निघालोय. “
“का हो सर इतक्या लवकर का निघालात?”
आपण काहीतरी काम असल्याचं सांगितलंत. खरं तर आपली प्रकृती बरी नसल्यामुळे आपण लवकर परत निघालात हे मला नंतर कळलं. यानंतर परत आपण नांदेडला कधीच येणार नाहीत असं मला त्यावेळी मुळीच वाटलं नव्हतं.
या आधी थोड्याच दिवसांपूर्वी आपलं फोनवरच बोलणं झालं होतं. आपण मला फोन केला होता आणि म्हणाला होता.
“‘अस्मितादर्श अर्धशतक पूर्ती’चा सोहळा लवकरच औरंगाबादमध्ये होतोय.त्यात तुम्हाला परिसंवादात बोलायचंय. आणि शक्य तेवढ्या लवकर एक लेखही लिहा.” आपला आदेश स्वीकारून मी कामाला लागलो होतो. अस्मितादर्श अर्धशतक पूर्ती विशेषांकाचं काम आपण जवळजवळ पूर्ण केलं होतं. अर्धशतक पूर्ती सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली होती. पत्रिका छापून झाल्या होत्या. मी अस्मितादर्श अर्धशतक पूर्ती सोहळ्यातील परिसंवादामध्ये बोलण्याची तयारी करत होतो. ‘अस्मितादर्श’ चा अर्धशतक पूर्ती सोहळा हा सुंदर असेल. महत्त्वपूर्ण असेल. साहित्य व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या पिढीतील मंडळींना नवनिर्मितीच्या प्रेरणा देणारा असेल. चला लवकरच आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचंय. असा विचार मी करत होतो. कार्यक्रमाची तारीख दोनच दिवसांवर आली. आणि मला प्रा.रविचंद्र हडसनकर सरांचा फोन आला. म्हणाले
“राऊत सर परवाचा औरंगाबादला होणारा अस्मितादर्शचा कार्यक्रम कॅन्सल झालाय बर का.”
“का हो सर काय झालं?”
“अहो सर पडलेत. त्यांची तब्येत ठीक नाही.”
“अरे!असं कसं झालं?” पण नंतर वाटलं, पडले असतील सर. असतील जरा आजारी. होतील लवकरच बरे. आणि जरा उशिराने का होईना होईल तो ‘अस्मितादर्श अर्धशतकपूर्ती’चा कार्यक्रम. मग काही दिवसांनी आपणाला महाराष्ट्र शासनाचा पद्मभूषण पुरस्कार घोषित झाला. आपलं अभिनंदन करावं म्हणून मी आपणास फोन केला.
“हॅलो सर…” फोन नेहमी आपणच उचलायचात पण यावेळी फोन आपण उचलला नव्हता. निवेदिता ताईंनी उचलला होता.
” हॅलो… सर आहेत ना? सरांचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता.”
” हो आहेत पण बाबांची तब्येत अजून ठीक नाही. थँक्यू.” निवेदिताताई अगदी हळू पण गंभीर आवाजात बोलल्या.
…. आणि तो कार्यक्रम आपल्या उपस्थितीत होऊच शकला नाही. हा अस्मितादर्शचा अर्धशतक पूर्तीचा कार्यक्रम आपल्या उपस्थितीत व्हायला हवा होता. ही एक फारच मोठी रुखरुख राहून गेली.
सर, अस्मितादर्शच्या माध्यमातून आपण किती सारं काम केलंत? भारत भूमीतल्या प्रज्ञा प्रतिभेच्या असंख्य अंकुरांना इथली मनुवादी व्यवस्था करपून टाकत होती. मनुवादी व्यवस्थेने शूद्र अतिशूद्र म्हणून लाथाडलेली
प्रज्ञाप्रतिभेची असंख्य बीजं आपण आपल्या सूक्ष्म दृष्टीनं हेरलीत. त्या बीजांना रुजण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिलीत. प्रज्ञाप्रतिभेच्या बीजांना रुजवलंत. त्यांना संस्कारांचं खतपाणी दिलंत. अंकुरांची रोपटी बनवलीत.रोपट्यांची झाडं बनवलीत. नव्या मूल्यविवेकी साहित्यिक झाडांचं लबलबतं नंदनवनच आपण फुलवलंत. मनूवादी व्यवस्था ज्यांना म्हणत होती की ‘तुम्हाला ज्ञानाच्या, साहित्याच्या व्यवहारात पाऊल टाकण्याची अक्कलच नाही.’ त्या व्यवस्थेच्या थोबाडावर सणसणीत चपराक मारत तुम्ही सांगितलं
“बघ आमचे हे प्रज्ञाप्रतिभेचे अंकुर. व्यक्त होण्याची जराशी संधी मिळताच हे कसं मानवी मूल्यांचं दैदिप्यमान साहित्यिक नंदनवन फुलवतायत.”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या
महासूर्यानं दिलेल्या मानव मुक्तीच्या लढ्याचं एक उत्तम असं वांग्मयीन फलित म्हणजे दलित जाणिवेचं क्रांतिकारी साहित्य. आपल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वानं या साहित्य प्रवाहाला अनेक अंगांनी फुलवलं. आपण म्हणजे वांग्मयीन ध्येयवादाचं मूर्तिमंत प्रतीक. कुणी ओतला हो सर आपल्या मनाच्या आणू अणूत हा उदात्त ध्येयवाद? बाबासाहेबांनी? बाबासाहेबांनी तर साऱ्यांच्याच मनात हा उदात्त ध्येयवाद पेरण्याचा प्रयत्न केला ना… पण सारेच कुठं आपल्यासारखे ध्येयवादी बनले? सर आधी तो आपल्या मनातच कुठतरी असावा लागतो. मगच तो फुलतो. तो मुळातच नसेल तर फुलणार तरी कुठून? बाबासाहेबांनी मिळवून दिलेले सारेच्या सारे लाभ घेणारे आणि फक्त किराणाखाऊ जीवन जगणारे मुर्दाड लोक आपल्या शिक्षण क्षेत्रात तरी का कमी आहेत का?
आपण महाविद्यालयात, विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक होता. महाविद्यालय नि विद्यापीठाच्या चार भिंतीच्या आत असलेल्य विद्यार्थ्यांना तर आपण उत्तम रीतीने शिकवलंच. पण तेवढ्या शिकवण्यानं आपलं समाधान मात्र झालं नाही. चार भिंतीच्या वर्गाबाहेरही ज्यांना शिकवलं पाहिजे, प्रबोधित केलं पाहिजे असे खूप मोठे लोक आहेत हे आपल्या प्रगल्भ मनानं जाणलं. आपल्या लेखणीचा आणि वाणीचा आपण प्रभावी असा वापर करत राहिलात आणि बाबासाहेबांनी दिलेली मानवतावादी मूल्यबीजं मनामनात पेरत राहिलात. ‘अस्मितादर्श’ला मनामनात मूल्यबीजं पेरण्याचं प्रभावी साधन बनवलंत. अस्मिता म्हणजे स्वत्वाचं, स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचं अस्तित्वभान, स्वाभिमान. इथल्या विषमतावादी वर्णजातिव्यवस्थेनं ज्यांचंअस्तित्वच नाकारलेलं होतं, दुर्लक्षित केलेलं होतं, व्यवस्थेनं ज्यांचे मानवी हक्क क्रूरपणे हिरावून घेतले होते, ज्यांना स्वतःच्या मेंदू व मनगटाचा विकास घडवून आणण्याची संधीच मिळू दिली नव्हती, ज्यांना हीन, दीन, दुबळं आणि लाचार बनवलं होतं, अशा असंख्य लोकांच्या अस्मितेला आपण उजागर करू पहात होता, त्यांच्या उज्ज्वल अशा अस्मितेचं दर्शन घडवू पाहात होता. किती कष्टलात सर आपण अस्मितादर्शसाठी. खरं तर हे अस्मितादर्शसाठी कष्ट करणं नव्हतं. तुम्ही बाबासाहेबांनी फिरवलेलं समाजक्रांतीचं चक्र गतिमान करण्यासाठी झटत होता. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कान्याकोपऱ्यातले
प्रज्ञाप्रतिभेची अंकुर वेचत होता. त्या अंकुरांना अस्मितादर्शच्या माध्यमातून प्रकाशात आणत होता. त्यासाठीचं सारंसारं बौद्धिक आणि शारीरिक कष्ट तर करत होताच; परंतु स्वतःची पदरमोडही करत होता. एक कसदार वाङ्मयीन अंक संपादित करणं आणि तो प्रसिद्ध करणं सोपं नसतं, त्यासाठी फार कष्ट करावे लागतात. अहो सर मी काही संविधान गौरव विशेषांक संपादित केले. वर्षाकाठी एक विशेषांक प्रसिद्ध करायला नाकीनऊ येत होते. आपण तर दर तीन महिन्याला अस्मितादर्शचा अंक प्रसिद्ध करत होता. त्यातले काही विशेषांकही असायचे. एका व्यक्तीने सलग पन्नास वर्षे अखंडितपणे एखादं वाङ्मयीन नियतकालिक चालवणं ही अत्यंत गौरवास्पद अशी गोष्ट आहे.एका वर्षाचे चार अंक धरले तर आपण आपल्या आयुष्यात जवळजवळ दोन हजार अंकांचं संपादन केलंय.आपण ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात दैदिप्यमान असा इतिहास घडवलात.

  मी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी असल्यामुळे १९८७-८८पासूनच आपल्याशी जोडला गेलो. आपलं धीरगंभीर असं कृतिशील व्यक्तिमत्त्व अनुभवत आलो. आपली व्याख्यानं ऐकत आलो. आपला भाषेकडं आणि  वाग्मयाकडं बघण्याचा दृष्टिकोन,त्यातली चिकित्सक दृष्टी नकळतपणे माझ्याही मनात रुजत गेली. डॉ. सूर्यबाबा... हा आपला ध्यास आणि श्वास होता. आपल्या सहवासात तोच माझादेखील ध्यास आणि श्वास बनला. अस्मितादर्श १९६८ पासून सुरू झालं. माझा जन्मच १९६५चा. आपण मला १९९२ साली एक लेखक म्हणून 'अस्मितादर्श'शी जोडून घेतलंत. माझी 'लाह्यरी' ही कथा १९९२ च्या वार्षिक अंकात प्रसिद्ध केलीत. 'लाह्यरी' या शीर्षकाचं आपण फार कौतुक केलंत.

”हे कथासंग्रहाला द्यावं असं शीर्षक आहे”असं आपण म्हणाला होता.१९९५ च्या वार्षिक अंकात आपण माझी ‘निळी बाग’ ही कथा प्रसिद्ध केलीत. पुढील काळात मी स्वतःला पीएचडीच्या आणि पुढे संविधान जागरणाच्या कामात गुंतवून घेतलं, त्यामुळं साहित्य निर्मितीकडं माझं जरा दुर्लक्षच झालं. मी वैचारिक लेखन अधिक करू लागलो.२००७ च्या वार्षिक अंकात ‘मराठी स्त्रीवादी साहित्य विकासाच्या अपेक्षित दिशा’ हा माझा लेख प्रसिद्ध केलात.२००९ च्या एमेजूच्या अंकात माझ्या ‘आनंताची अभंगवाणी’वरील प्रा. म.ई. तंगावार यांचा लेख प्रसिद्ध केलात.२०११ पासून मी जवळजवळ सलगपणे ‘अस्मितादर्श’ साठी लिहीत गेलो आणि आपण त्या लेखनाचं स्वागत करत गेलात. आपलं व्यक्तिमत्व हक्क नाकारलेल्या समूहातील प्रज्ञाप्रतिभावान व कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा आत्मीयतेने शोध घेणारं, त्या व्यक्तिमत्त्वाचं कर्तृत्व प्रकाशात आणण्यासाठी धडपडणारं होतं. मी नांदेडला रहात असल्यामुळं बाबासाहेबांच्या पक्षाचे खासदार म्हणून निवडून आलेले, कविता लिहिणारे हरिहरराव सोनुले यांच्यावर लेख लिहिण्याचा आपण मला आदेश दिलात. आपल्या आदेशानुसार मी त्यांच्या कुटुंबीयांना, इतरही कार्यकर्त्यांना भेटून हरिहरराव सोनुले यांच्या कर्तृत्वाचा शोध घेतला आणि ‘हरिहरराव सोनुले कर्तृत्व कवित्व व सिकत्व’ हा लेख लिहिला. आपण तो २०११च्या वार्षिक अंकात प्रसिद्ध केलात. पुढे ‘आंबेडकरवादी साहित्य व आदिवासी साहित्य काही विचार’ (वार्षिक२०१२), ‘विषमतावादी व्यवस्थेला ‘सुरुंग’ लावणारा कवी: त्र्यंबक सपकाळे’ (जाफेमा२०१४), ‘दलित साहित्यातील विद्रोहाची मूल्यनिष्ठा’ (वार्षिक२०१४) ‘दलित व ग्रामीण साहित्य: एकतेच्या दिशा'(जाफेमा२०१५), दलित आत्मकथनांचे समाजशास्त्रीय मूल्यमापन (वार्षिक२०१५), ‘आदिवासी कवितेतील वेदना व विद्रोहाचे स्वरूप’ (जाफेमा२०१६), ”बुद्ध आणि त्यांचा धम्म’मधील तत्त्वज्ञान व वांग्मयीन गुणवत्ता’…’ ‘अस्मितादर्श’ ने केलेल्या वैचारिक पेरणीचे स्वरूप’ (ऑनोडी२०१७) अशा माझ्या अनेक लेखांना आपण ‘अस्मितादर्श’मधून प्रसिद्धी दिलीत. माझ्यासारख्या अत्यंत सामान्य घरातून आलेल्या मुलाला आपण जसा व्यक्त होण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला तसाच इतरही असंख्य जणांना हा मंच उपलब्ध करून दिलात. त्यामुळे साहित्यिकांच्या अनेकविध पिढ्या घडल्या.
मध्यमवर्गीयांच्या मर्यादित डबक्यात अडकलेल्या मराठी साहित्य विश्वाला अनुभव विशाल बनवण्यासाठी आपण अविरतपणे झटलात. इथल्या सडक्या व्यवस्थेने ज्यांना ज्ञानाच्या अन् साहित्याच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याची बंदी घातली होती असे पूर्वास्पृश्य, भटके,आदिवासी अशा असंख्य जनांचे विदारक जीवनानुभव आपण ‘अस्मितादर्श’ मधून प्रसिद्ध केले. परंतु एवढं करूनच आपलं मन समाधानी झालं नाही. आपण मायाळू होता, वेगवेगळ्या समुहातल्या, स्तरातल्या माणसांना प्रेमगोफात गुंफण्याचा आपला छंद औरच होता. खरं म्हणजे आपण माणूसवेडे होता. या वेडापायीच आपण १९७४ साली औरंगाबाद इथं ‘अस्मितादर्श’चा पहिला लेखक मेळावा घेतला. आणि या मिळाल्याचं पुढे अस्मितादर्श साहित्य संमेलनात रूपांतर झालं. आजवर आपण अनेक साहित्य संमेलनं घडवून आणलीत. या संमेलनाच्या माध्यमातून आपण खेड्यापाड्यातल्या, वाडीतांड्यातल्या, पालातल्या प्रतिभेच्या अनेक अंकुरांना गोळा केलंत. त्यांच्यावर वांग्मयीन व सामाजिक जाणिवेचं प्रेमसिंचन केलंत अन् पुढे मीही एक संधीवान ठरलो.पुणे इथं राजाभाऊ ढाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनापासून आपण मला या संमेलनाशी जोडून घेतलंत. या संमेलनात आपण मला कथाकथन करायला लावलं होतं आपली दृष्टी चौफेर होती. नव्या पिढीतील तरुणांची गुणवत्ता हेरणारी होती. त्या गुणवत्तेचा विकास घडवून आणण्यासाठी धडपडणारी होती. म्हणूनच आपण साहित्याच्या क्षेत्रात काही करू पाहणाऱ्या नव्या नव्या तरुणांना ‘अस्मितादर्श’चा मंच उपलब्ध करून द्यायचात. आपण कोण काय करतंय हे अगदी बारकाईनं बघायचात. जो ज्या क्षेत्रात काम करतोय त्याचं कौतुक करायचात. त्या क्षेत्रातलं त्याचं काम अधिक प्रमाणात कसं फुलेल याची काळजी घ्यायचात. मी करत असलेल्या संविधान जागरणाच्या कामाची आपण चांगलीच दखल घेतलीत. पहिली दखल घेतलीत ती सांगली इथं झालेल्या अस्मितादर्श मेळाव्याच्यावेळी. ‘प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये’ या माझ्या संविधान मूल्यांची मांडणी करणाऱ्या वैचारी पुस्तकास आपण पुरस्कार देऊन गौरविलंत. पुढे मी अनेक संविधान गौरव महोत्सव आयोजित केले. संविधानासंदर्भात लेखनही केलं. आपलं माझ्या या साऱ्याच कामाकडं बारीक लक्ष होतं. अगदी अलीकडच्या काळात आपण जळगाव, लातूर इथं झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनामध्ये परिसंवादासाठी संविधानकेंद्री विषय ठेवले; आणि त्या परिसंवादांचं अध्यक्षपद आपण माझ्याकडं दिलंत. आपण मला दिलेली ही फार मोलाची संधी होती. मीही त्या संधीचं सोनं करण्याचाच प्रयत्न केला. अशा कितीतरी जणांना आपण संधी दिलेलीय सर अन् कितीतरी जणांना फुलवलेलंय. अस्मितादर्श साहित्य संमेलन हे काही नुसतीच जत्रा नसते. ते स्वतःला नुसतच मिरवून घेण्याचं ठिकाण नसतं. ते एक वांग्मयीन संस्कार करणारं संमेलन असतं. चिकित्सा संमेलन असतं. शोध संमेलन असतं. नव्या पिढ्यांच्या मनाची मशागत करणारं संमेलन असतं. कारण या संमेलनातला प्रत्येकच उपक्रम अत्यंत गंभीरपणाने राबवला जात असतो. उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन हे कार्यक्रम तर यामध्ये असतातच; पण याशिवाय शोधनिबंध वाचनाचा कार्यक्रमदेखील या संमेलनामध्ये असतो. एका लेखकाची प्रकट मुलाखत हा देखील महत्त्वपूर्ण असा कार्यक्रम असतो. या मुलाखतीच्या माध्यमातून रसिकांना लेखकाशी थेटपणाने संवाद साधता येतो. या संमेलनातली सर्वात महत्त्वाची खासियत ही होती की उदघाटन समारंभ झाल्यानंतर श्रोत्यांमध्ये बसून आपण सर्व कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकायचात. कुठे काही चुकत असेल तर तात्काळ लक्षात आणून द्यायचात. अगदी अलीकडं नांदेड इथं झालेल्या संमेलनात मी आयोजन समितीत असल्यामुळे एका परिसंवादाचं प्रास्ताविक करत होतो. माझं प्रास्ताविक थोडसं लांबलं तर आपण माझ्यावर फार रागावलात. उभे राहून मला माझं प्रास्तविक आवरतं घेण्यास सांगितलंत. आपला अधिकारच होता तो. आपण समोर बसलेले असायचात त्यामुळं सर्वांनाच धाक असायचा. आपण तयारी करूनच बोललं पाहिजे याची काळजी संमेलनात सहभागी झालेले वक्ते, साहित्यिक घ्यायचे.
….. आणि आता…. इथून पुढे होणाऱ्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात आपण स्वतः प्रत्यक्षात उपस्थित नसणार आहात. अस्मितादर्श साहित्य संमेलनात आपण उपस्थित नसणं ही कल्पनाच सहन होणारी नाहीये. आपल्या नसण्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झालीय सर, फार मोठी पोकळी. कशी भरून काढायची आता ही पोकळी? सांगा ना सर कशी भरून काढायची?
आपण अपार कष्ट करून असंख्य जणांना फुलवलंत, झुलवलंत, डुलवलंत. अन् प्रतिभेच्या इतर अंकुरांना फुलवण्यासाठी झटता झटता स्वतःचं बरच काही काम करायचं राहून गेलं असं नाही का वाटत सर तुम्हाला? आपण कविता लिहायचात, कथा लिहायचात, नाटक देखील लिहायचात. इतरांच्यामधले ललित लेखक फुलवता फुलवता तुमच्यातला कसदार असा ललित लेखक फुलायचा तसाच राहून गेला असं नाही का वाटत सर आपल्याला? मला सतत वाटत राहतं की,आपल्या सरांनी स्वतःच्या कथा, कवितांचं आणि नाटकांचं लेखनही सातत्यपूर्ण रीतीने सुरू ठेवायला हवं होतं. पण आपण समाजाचं प्रबोधन करण्यासाठी
‘मूल्यवेध’ घेत राहिलात, ‘विद्रोहाचं पेटलेलं पाणी’ समाजासमोर ठेवत राहिलात, ‘वादळाच्या वंशजां’चा शोध घेत राहिलात, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ‘मूकनायका’ला समाजासमोर ठेवत राहिलात. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा शोध घेत राहिलात. प्रबोधनाच्या नव्या नव्या दिशा देत राहिलात. लोकजागृतीसाठीची ‘हलगी वाजवत राहिलात. अनेक कवी, कथाकार, विचारवंत आणि कादंबरीकारांना प्रस्तावना देत राहिलात. या प्रस्तावनांचंच एक ‘चैत्य’ तयार झालं. दलित वैचारिक वांग्मयाचा शोध घेत राहिलात. विचार व साहित्याच्या क्षेत्रातील ‘लेणी’ समाजासमोर मांडत राहिलात. साहित्याच्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा शोध घेत राहिलात. संवाद साधत राहिलात. कर्तृत्ववान अशा ‘स्मृतीशेष’ मंडळींना त्यांच्या कर्तृत्वासह समाजासमोर मांडत राहिलात. दलित आत्मकथन, दलित कथा, विचारयुगाचे प्रणेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकचळवळींचे प्रणेते : महात्मा ज्योतीबा फुले, महारांचा सांस्कृतिक इतिहास, लोकरंग, स्त्री आत्मकथन, धर्मचर्चा, दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख अशा कितीतरी ग्रंथांचं संपादन करत राहिलात. शासकीय व गैरशासकीय संस्थांना वैचारिक दिशा देण्यासाठी अनेक विविध संस्थांवर पदाधिकारी आणि सदस्य म्हणून काम करत राहिलात.
‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’ आणि ‘वादळाचे वंशज’ ही आपल्या पुस्तकांची शीर्षकं मला फार आवडतात. सर आपणाला वादळाचं आणि विद्रोहाचं फार आकर्षण होतं. म्हणूनच तर आपण इथल्या शोषक स्वरूपाच्या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोहाचं रणशिंग फुंकणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वादळी विचारांचे पाईक झालात. विद्रोह म्हणजे नुसता संताप नसतो. नकार नसतो.विध्वंस नसतो. विद्रोह ही एक विवेकी कृती असते. कारुणिक मनाने केलेली कृती असते. व्यवस्थेच्या क्रूर पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या माणसांबद्दलच्या आत्मीयतेतून केलेली कृती असते. विद्रोही कृती मानवी समाजातील विकृतींना, अहंकाराला, क्रूरतेला, शोषकतेला उखडून काढत असते. नवी-नवी मानवी मूल्यांची बीजे पेरण्याच्या आड येणाऱ्या हरळी कुंद्याला व खुरट्या झुडुपांना मुळासकट उखडून काढत असते. अन् शोषणविरहित विषमताविरहित, भेदाभेदविरहित, स्वातंत्र्य,समता, न्याय, बंधुतावादी व मानवतावादी व्यवस्थेची प्रस्थापना करू पहात असते. या साऱ्याचं उत्तम असं भान आपणाला होतं. म्हणूनच आपण ‘अस्मितादर्श’च्या माध्यमातून, आपल्या अनेक ग्रंथांच्या माध्यमातून व व्याख्यानांच्यामाध्यमातून भारतीय समाजमनामध्ये मानवी मूल्यांची पेरणी करत होता.
औरंगाबादमधल्या मिलिंद महाविद्यालया समोरच्या आपल्या ‘श्रावस्ती’मध्ये येऊन आपली भेट घेणं आणि आपल्याशी संवाद साधणं हा एक माझ्यासाठी अन् माझ्यासारख्या असंख्य जणांसाठी अत्यंत आनंददायक असा अनुभव असायचा. अतिथ्यशीलता शिकावी ती आपल्याकडूनच. सर आपण फारच अतिथ्यशील होता. घरी येणाऱ्या कोणाचाही प्रसन्न मनाने स्वागत करणारे होता. ‘मी माझ्या कामात व्यस्त आहे आणि हा इथे कशाला टपकला?’ असला भाव आपल्या मनात कधीच येत नसावा असंच मला वाटतं. आपल्या घरी आल्याबरोबर आपण स्वतः वरच्या मजल्यावर जायचात आणि थोड्याच वेळात पाणी, चहा, बिस्कीट किंवा कधीकधी फराळासाठी काहीतरी घेऊन यायचात. माझ्यासारख्या आपल्या विद्यार्थ्यांशी पण अगदी मोकळेपणानं गप्पा मारत बसायचात. गप्पांमधले विषय साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक शैक्षणिक, वैचारिक तर असायचेच परंतु परस्परांच्या सुखदुःखाचे आणि स्नेहसंबंधांचेही असायचे. आपण कुणाबद्दलही त्याच्या पाठीमागे वाईट बोलत नसायचात. एखाद्या व्यक्तीशी मतभेद असले तरी त्याच्याशी माझे कसे स्नेहसंबंध होते हेच विस्ताराने स्पष्ट करायचात. अशा गप्पांच्यामध्ये आपल्या
बोलण्यातून मला बुद्धांनी सांगितलेल्या सम्यक वाचेचाच अनुभव यायचा. अगदी अलीकडं मी सायंकाळच्या वेळी आपल्या घरी आपणाला भेटण्यासाठी आलो, तर आपण हातामध्ये मोटारीचा पाईप घेऊन आपल्या बागेला पाणी टाकत होता. आपल्या अंगावर छटन आणि साधी विजार होती. आपणाला असं बागेला पाणी टाकताना बघून मला फार नवल वाटलं. काही वेळ बागेला पाणी टाकता टाकताच आपण माझ्याशी बोललात आणि लवकरच बागेला पाणी टाकणं थांबवून आपल्या बैठकीमध्ये आलात. व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या प्रतिभेच्या अंकुरांचं संस्कारसिंचन करून आपण मराठी मातीच्या जमिनीत एक सुंदर अशी साहित्यबाग फुलवलीत. पण ही साहित्य बाग आपण केवळ कलानंद देण्यासाठी फुलवली नव्हती. ती स्वांतसुखाय स्वरूपाची नव्हती, तर ती समग्र मानवी जीवनाचं मूल्यसिंचन करून त्याला सर्व अंगाने सुंदर, आनंदमय बनवू पाहणारी होती. आपण फुलवलेल्या या साहित्यबागेला फुललेल्या अवस्थेत ठेवण्यासाठी; आणि तिला आणखी नवी नवी पालवी फुटावी यासाठी आपण करत होता तसं संस्कारसिंचन आता कोण करेल सर?
सर, आपल्या घरी येणं जसं माझ्यासाठी आनंददायक होतं तसंच आपण माझ्या घरी येणं किंवा मी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येणं मला फार आनंददायक वाटायचं. आपण माझ्या नांदेडच्या घरी दोन वेळा आलात. एकदा माझ्या घराच्या वरच्या मजल्यांचं बांधकाम सुरू असताना आलात. माझ्या गल्लीतच मी घेतलेल्या किरायाच्या घरात येऊन मस्त गप्पा मारल्यात. माझ्या घराचं सुरू असलेलं बांधकाम आपणाला दाखवलं.
“सर वर जाऊन बघूत का?”
आपण म्हणालात “नको गुडघे दुखतात.”
मग मी आग्रह केला नाही.” सर मी माझ्या या घराच्या तिसऱ्या मजल्यावर खास बैठका, शिबिरं आणि छोटे कार्यक्रम घेण्यासाठी ऐंशीनव्वद माणसं बसतील एवढा हॉल बनवलाय.” असं मी आपणाला सांगितलं तेव्हा आपण फार आनंदित झालात. आपण माझं कौतुक केलंत. एकदा औरंगाबादमधील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात एकाच वेळी माझ्या आदरणीय गुरुजी, समाज सुधारकांची तुतारी, प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये, धर्म ते राष्ट्र धर्म अशा चार पुस्तकांचा प्रकाशन समारंभ झाला. प्रकाशन समारंभासाठी आपण प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होता. सोबत आदरणीय डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,आदरणीय प्रा.कौतिकराव ठाले पाटील हे उपस्थित होते. आपण या कार्यक्रमात फार अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. आपण माझी चारी पुस्तकं पूर्णपणे वाचलेली होती. या वयात देखील किती प्रचंड वाचन करतात सर? मला आश्चर्य वाटलं होतं. माझ्या पुस्तकांवर बोलता बोलता आपण कुठल्यातरी उणिवेवर बोट ठेवलंत. मी हसत हसत मध्येच काहीतरी बोललो तर आपण माझ्यावर फार रागावलात
“असं आत्मसमर्थन करायचं नाही.” असं म्हणालात. मी गप्प बसलो.
आपण माझ्या ‘अनंताची अभंगवाणी’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी नांदेडला आलात. औरंगाबादहून पहाटेच कारने निघून दहा साडेदहापर्यंत नांदेडला पोचला होता. मी म्हणालो
“सर जरा फ्रेश होऊन घ्या ना.”
तर आपण म्हणालात “मी फ्रेशचंय.”
सर आपलं सतत ताजंतवानं राहणं, सतत कार्यमग्न राहणं आमच्यासाठी फारच प्रेरणादायक होतं. आपल्यामध्ये कामाचा प्रचंड मोठा स्टॅमीना होता सर. आपलं व्यक्तिमत्त्व तरुण वर्गाला सतत काम करण्याची प्रेरणा देणारं होतं.
….. आणि तेच आता हरवलंय.
“कुठं आहात सर तुम्ही? कुठं आहात?”
“………………..”
मी आपल्या उत्तराची वाट बघतोय.
….. आ…णि …. आणि हा आवाज कुठून येतोय?
“मी अस्मितादर्शच्या प्रत्येक अंकाच्या पानापानात आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामनात आहे. मनामनात पेटलेल्या विद्रोहाच्या पाण्यात आहे. वादळाच्या वंशजात आहे. मी मूल्यवेध घेतो आहे. मी जागृतीसाठीची हलगी वाजवतो आहे. मी मूकनायकाचा संदेश मनामनात पेरतोच आहे. नवी-नवी लेणी खोदतोच आहे. प्रबोधनाच्या दिशा देतोच आहे. तू फक्त त्या दिशांनी चालत राहा….”
आपला
अनंत राऊत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!