जेष्ठ पौर्णिमा

उज्वला गणवीर
नागपूर
२१/०६/२०२४
जेष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत जेठ्ठमासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जून महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना घडल्यात.
१ पहिले उपासक तपुस्स आणि भल्लीक यांची धम्मदीक्षा.
२ जेष्ठ उपासिका सुजातास धम्मदीक्षा.
३ संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत बोधिवृक्ष लावला.
४ भिक्खू महेंद्र यांचे निर्वाण.
१ पहिले उपासक तपुस्स आणि भल्लीक यांची धम्मदीक्षा
भगवंतास ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर एक महिना बोधिवृक्षाखाली राहिले आणि पाचव्या आठवड्यात ते गोथर्डच्या पर्वताकडे गेले आणि एक आठवडा तेथे वास्तव्य केले. नंतर मुचलिंद नावाच्या पर्वताकडे आपला मोर्चा वळवला. तेथील राजयतन वृक्षाखाली एक आठवडा वास्तव्य केले. पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या दिशेने येतांना दोन गृहस्थ दिसले. ते दिन गृहस्थ म्हणजे तपुस्स आणि भल्लीक हे दोन बंधू होते. ते दोन बंधू व्यापारी होते. ते पाच गाड्यावर माल लादून त्या रस्त्याने जात होते. व्यापारी बंधूंना भगवंत दिसताच त्यांना वंदन करून त्यांच्या जवळ असलेल्या मध व पोळ्या दिल्या व खाद्यपदार्थ स्वीकारण्याची विनंती केली. भगवंतांनी त्यांची भेट स्वीकारली. आपली भेट स्वीकारल्याचे पाहून त्या व्यापाऱ्यांनी भगवंतास वंदन केले आणि आम्ही आपणास शरण आलो आहोत. आपले अनुयायी म्हणून धम्माचे सर्व नियम आम्ही पाळू व आम्हास सदधम्माची दिक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना केली. तेव्हा भगवंतांनी त्यांना उपासक या नावाने संबोधले व त्यांना धम्मात प्रवेश दिला. त्यावेळी संघ नावाची संस्था अस्तित्वात नव्हती.
भगवान बुद्धाच्या उपासनेचे काही तरी साधन असावे म्हणून अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवंतांनी त्यांचे आठ केस जटा स्मृतिचिन्ह म्हणून दिले. हेच भगवंताचे स्मृतिचिन्ह समजून आपल्या गावात त्यांवर एक विहार उभारून त्यात त्यांची स्थापना केली व नित्यनेमाने त्यांची वंदना करू लागले. ज्या दिवशी ह्या दोन व्यापारी बंधूना सदधम्माची शिकवण देऊन उपासक म्हणून दीक्षित केले तो दिवस जेष्ठ पौर्णिमा होय.
२ जेष्ठ उपासिका सुजातास धम्मदिक्षा
बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तेव्हा त्यांना सुजाताने चैत्र पौर्णिमेला अर्पण केलेल्या खीर ची आठवण झाली आणि सुजाताला दिलेल्या वचनाची (सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे.) आठवण झाली. त्या वचनपूर्ती साठी सुजताचा शोध घेतला. सुजताच्या पतीस, व तिचा पुत्र यश यास सदधम्माची दिक्षा दिली. सुजाताचे वाराणसीत एकमेव कुटुंब होते की ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दिक्षा ग्रहण केली. सुजाता विषयी भगवंत म्हणाले की “भिक्खुंनो! माझ्या उपसिकांमध्ये प्रथम येणाऱ्या मदगते सुजाता सर्वश्रेष्ठ आहे.” सहपरिवार सुजातास दीक्षित केलेला दिवस होता जेष्ठ पौर्णिमेचा.
३ संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत बोधिवृक्ष लावला
सम्राट अशोकांनी जेव्हा त्यांकगे धम्मगुरु महास्थाविर मोग्गलीपुत्त तिस्स यांना विचारणा केली की ” मला धम्माचा दायाद बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल ?तेव्हा भन्ते म्हणाले “जो कोणी आपला स्वतःचा मुलगा मुलगी धम्मास दान देतो त्यांना धम्मामध्ये प्रवज्जीत करून भिक्खू बनवितो तोच दायक आणि दायाद या दोन्ही उपाधीसाठी पत्र बनतो.” तेव्हा सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना प्रवज्जा धारण करणार का? अशी विचारणा केली तेव्हा दोघांनीही उत्तर दिले की, “आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवज्जीत होऊ, प्रवज्जा ग्रहण केल्याने आमचे व आपलेही कल्याण होईल असे आम्हाला वाटते.” यानुसार आपल्या पित्याच्या इच्छेखातर महेंद्र आणि संघमित्रा यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवज्जा घेतली. त्यावेळी महेंद्र कज वय २० वर्षे तर संघमित्राचे वय १८ वर्षे होते.
महापती महेंद्र यास प्रवज्जीत होऊन बारा वर्षे झाल्यानंतर त्यांच्या उपाध्यायाने (मोग्गलीपुत्त तिस्स)ब आणि संघाने त्यांना लंकाद्वीप मध्ये जाऊन बौद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून स्थविर उपाध्यायांना वंदन करून सोबत चार स्थविर घेऊन धम्माचा प्रचार व प्रसारासाठी लंकाद्वीप गाठले. तो दिवस होता जेष्ठ पौर्णिमेचा. पुढे काही वर्षांनी भिक्खूनी माता संघमित्राशी बोधिवृक्षाच्या फांदीसह स्थविर महेंद्र यांनी श्रीलंकेस बोलवून घेतले.
संघमित्रा अनेक श्रामनेरीसोबत घेऊन लंकेत दाखल झाली व तेथे भिक्खूनी संघ स्थापन केला.
महामती महेंद्र आणि भिक्खूनी माता संघमित्रा लंका द्विपातील अनुराधापूर येथे जम्बुद्वीपातून आणलेली बोधिवृक्षाच्या एक शाखा लावली.
तो दिवस होता जेष्ठ पौर्णिमेचा.
४ भिक्खू महेंद्र यांचे निर्वाण.
बौद्ध धम्माचे विरोधक आणि धर्मांध आक्रमकांनी चौदाव्या शतकापर्यंत भारतातून बौद्ध साहित्य नष्ट केले होते. अशा अवस्थेत महामहेंद्र यांनी श्रीलंकेत ते साहित्य सुरक्षित ठेवले. तसेच अडतीस वर्षे श्रीलंकेतन धम्मसेवा करून वयाच्या ८०व्या वर्षी महामहेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीलंकेच्या अनुराधापुरम त्यांचे निर्वाण झाले तो दिवस होता जेष्ठ पौर्णिमेचा.
जेष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना मंगल सदिच्छा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत