12th Fail चित्रपटाची समीक्षा…! (सुदामाच्या पोह्यानंतर… सुदामाची युपीएससी..!)

सिद्धार्थ शिनगारे
छत्रपती संभाजीनगर
1) साधी स्टोरी आहे, गरीब ब्राह्मण परिवार दाखवला आहे, नंतर शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संघर्ष आणि सक्सेस. अशी सिम्पल स्टोरी या चित्रपटाची दाखवली आहे.
2) हा चित्रपट ‘मनोज शर्मा’ नावाच्या गरीब ब्राह्मण मुलाचा संघर्ष आणि यश दाखवते. या गरीब विद्यार्थ्यांचे आजोबा मिल्ट्री मध्ये सुभेदार होते, वडील सरकारी नोकरीला असतात, वडील हायकोर्टात केस सुद्धा लढतात. विद्यार्थी चार वर्षे दिल्लीमध्ये राहून अभ्यास करतो, एवढे ते गरीब असतात. या चित्रपटा संदर्भात मेनस्ट्रीम मीडियामध्ये खूप लिहिलं जात आहे. एक गरीब विद्यार्थी, संघर्ष करून यूपीएससी परीक्षेत यश मिळवतो आणि IPS बनतो. गरीब ब्राह्मणाचा संघर्ष चित्रपटात असल्यामुळे मुख्य मीडिया या चित्रपटाची स्तुती करत आहे.
3) अशाच प्रकारचे यश जर मनोज कांबळे, मनोज खरात, मनोज शिंदे, मनोज शिनगारे यांनी मिळवले असते तर यांच्या जीवनावर चित्रपट बनवला असता का?, यांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या असत्या का? प्रत्येक ब्राह्मणाला ब्राह्मण कुटुंबात जन्मल्यामुळे काही विशेष अधिकार मिळालेले आहेत. जे त्यांच्या यशामध्ये असतात.
4) चित्रपटांमध्ये तीन सीन मध्ये चप्पल मारताना दाखवली आहे. ऐक, मनोज शर्मा वर ग्रंथालयातील ग्रंथपाल पैशाच्या चोरीचा आरोप लावतो, तेव्हा मनोज शर्मा त्याच्यावर चप्पल उगारतो. दोन, मनोज शर्माचे वडील सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये एका अधिकाऱ्याला चपलाने मारतात. तीन, मनोज शर्मा चा भाऊ आमदाराच्या चमच्याला चपलाने मारताना दाखवले आहे. एखादा कांबळे किंवा खरात किंवा थोरात किंवा शिंदे गावामध्ये आमदाराच्या माणसाला चपलाने मारू शकतो का? आणि मारल्यानंतर आमदार शांत बसेल का? हा ब्राह्मणाला मिळालेला विशेष अधिकारच म्हणावा लागेल.
5) चित्रपटात एका सीन मध्ये मनोज शर्माच्या वडिलांचे सस्पेन्शन लेटर घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यावर मनोज शर्मा चा भाऊ बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. कारण मनोज शर्माच्या घरी बंदूक आहे, त्याचे आजोबा मिल्ट्री मध्ये सुभेदार होते, त्यामुळे त्यांच्या घरात बंदूक असते. हे फक्त शर्माच्या घरातच होऊ शकते. जर असे कृत्य खालच्या जातीतील लोकांनी केले असते तर, गोळी झाडण्याच्या आरोपांमध्ये बहुजन समाजातील कोणत्याही व्यक्तीला जेलमध्ये टाकले असते.
6) एका सीन मध्ये मनोज शर्मा आणि त्याच्या भावाला पोलीस अटक करतात. तेव्हा पोलीस कस्टडीमध्ये मनोज शर्माला त्याचा भाऊ म्हणतो, ‘जा घरातून बंदूक घेऊन ये’, आणि आश्चर्य म्हणजे पोलीस मनोज शर्माला जाऊ देतात, आणि म्हणतात बंदूक घेऊन ये,… एवढे उदार पोलीस स्टेशन मी पहिल्यांदाच बघत होतो. आरोपीला पोलीस स्टेशन मधून घरी पाठवत आहेत, जा बंदूक घेऊन ये आणि आम्हाला मार… भारतात असे पोलीस स्टेशन आहेत का?, मनोज शर्मा पळत जाऊन DySP ला घेऊन येतो, आणि DySP त्या दोघांची सुटका करतो. सामान्य लोकांच्या जीवनात असा किस्सा कधीच घडत नसतो. जसा मनोज शर्माच्या जीवनात घडला. DySP झोपेतून उठून एखाद्यावर अन्याय झालाय म्हणून पोलीस स्टेशनला जाऊन न्याय करतात. अशा घटना कल्पनेतच ठीक आहेत.
7) जेव्हा मनोज शर्मा चंबलघाटीतील गावातून ग्वालियर ला येतो, तेव्हा त्याचे पैशासकट सर्वसामान चोरीला जाते. रेल्वे स्टेशन वरील हॉटेल मालक त्याला फुकट जेवण खाऊ घालतो. तिथे पांडे नावाचा एक स्पर्धा परीक्षा करणारा मुलगा त्याला भेटतो, पांडे शर्माला घेऊन दिल्लीला येतो, त्याची राहण्या- खाण्याची व्यवस्था करतो. पांडे ने असे का केले असेल? काय एखादा मनोज कांबळे किंवा गायसमुद्रे किंवा सोनवणे किंवा इंगळे आडनावाच्या पोराला पांडेने मदत केली असती का?, त्याला त्याच्या रूममध्ये राहू दिले असते का? मला वाटते नाही.
8) मनोज शर्मा दिल्लीमध्ये गौरी भैय्याला भेटतो. हा गौरी भैय्या ओबीसी दाखवला आहे. त्याच्या सहाव्या अटेम्प्ट मध्ये मुलाखत मध्ये तो फेल होतो, असे दाखवले आहे. नंतर गौरी भैय्या तिथे चहाचे दुकान सुरू करतो. यूपीएससीचा सहा वर्षे अभ्यास केल्यानंतर, दोन-तीन वेळेस मेन्स दिल्यानंतर, एक वेळेस मुलाखत दिल्यानंतर, कोणता विद्यार्थी चहाची टपरी सुरू करतो?.. तो कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या केंद्रावर शिकवू शकतो. तसे न दाखवता डायरेक्ट चहा विकताना दाखवले आहे. कारण गौरी भैय्या ओबीसी आहे.
9) मनोज शर्माचा यूपीएससीच्या मुलाखतीचा सीन अजब गजब वाटतो. त्याला विचारतात बारावीला तु का फेल झाल होतास? तेव्हा मनोज शर्मा सरळ उत्तर देतो की, ‘तेव्हा आमच्या शाळेमध्ये कॉपी करू दिली नव्हती.’ हे उत्तर ऐकून मुलाखत कमिटीचा प्रमुख त्याला बाहेर काढतो. दोन मिनिटानंतर परत बोलावतात. यूपीएससीच्या मुलाखत टीम मध्ये सहसा ब्राह्मण आणि उच्चवर्णीयच असतात. कांबळे, खरात, थोरात, शिंदे, इंगळे अशा आडनावाच्या मुलांना यूपीएससी मुलाखत कमिटी परत बोलावून मुलाखत घेईल का? शर्मा नावामुळे त्याला हा विशेष अधिकार मिळाला असावा.
10) एससी एसटी च्या मुलांना आरक्षण असल्यामुळे युपीएससीला सिलेक्ट करावेच लागते. त्यामुळे यूपीएससीतील उच्च जातीय अधिकाऱ्यांनी ऐक शक्कल लढवली आहे, ते काय करतात? SC/ST च्या त्याच विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात जे age रिलॅक्सेशन चा फायदा घेत आहेत, अर्थात ज्यांचे वय 33, 34, 35 आहेत, अशाच एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात. जेणेकरून, जरी त्यांचे प्रमोशन झाले तरी ते सचिवालयापर्यंत पोहोचले नाही पाहिजेत. त्या उलट ब्राह्मण आणि उच्च जातींच्या पोरांना 21 व्या वर्षी किंवा 22 व्या वर्षी किंवा 23 व्या वर्षी सिलेक्ट करतात. जेणेकरून प्रमोशन घेऊन ते सचिवालयापर्यंत जातील. UPSC ही सर्वात जास्त जातीयवाद करणारी संस्था आहे.
11) मनोज शर्मा ब्राह्मण असल्यामुळे त्याला खूप सारे फायदे झाले. यात मनोजची चूक नाही, भारतीय समाज व्यवस्थाच तशी आहे. शर्मा, पांडे, कुलकर्णी, देशपांडे, त्रिवेदी, दुवेदी, चतुर्वेदी.. हे गरीब असले तरी सामाजिक फायदा मात्र यांना मिळतो. परंतु बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना असा कोणताही फायदा मिळत नाही.
12) चित्रपट चांगला बनवला आहे. लव स्टोरी पण चांगली आहे. सर्व कलाकार सुद्धा उच्च जातीतूनच घेतले आहेत. उच्च जातीच्या लोकांनी चित्रपट बनवला आहे. उच्च जातीचे लोक चित्रपटाची तारीफ करत आहेत. परंतु माझ्या नजरेतून मी चित्रपटाची समीक्षा केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत