दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा

बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा, अमावस्या व अष्टमीला उपोसथ व्रत केले जाते. दैनंदिन दिनचर्ये प्रमाणे सकाळी अंघोळीनंतर कुटुंबासह वंदना घ्यावी. भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करावा, पंचांग प्रणाम करावा.

बुद्धम् नमामि ! धम्म नमामि !! संघं नमामि !!!

म्हणून तीन वेळा वंदन करावे. त्यानंतर त्रिसरण, अष्टशील ग्रहण करावे.

अष्टशीलानुसार दुपारी १२ वाजण्याच्या आत भोजन करावे, रात्रीचे भोजन न करता फक्त फलाहार घ्यावा. या मंगल दिवशी धम्मप्रवचन ऐकणे, भिक्खूंना चीवरदान करणे, अन्नदान करणे, धम्मदान करणे अशा प्रकारचे सदाचरण करावे.

वैशाख पौर्णिमा जगभरातील बौद्धांचा महान मंगल दिन आहे. या पौर्णिमेला तीन मंगलमय घटना घडल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.

१) सिद्धार्थ गौतमाचा जन्म
वैशाख पौर्णिमेचे पहिले महत्व इ.स. पूर्व ५६३ ला कपिलवस्तु नगरीचा राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. तो दिवस म्हणजे वैशाख पौर्णिमा, ऋतू ग्रीष्म, वार शुक्रवार, नक्षत्र विशाखा अशा मंगल वेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला या मंगल प्रसंगाने ही पौर्णिमा पवित्र ठरली.

२) बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती
वैशाख पौर्णिमेचे दुसरे महत्व इ.स..पूर्व ५२८ ला सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केल्यानंतर वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली. तो दिवस बुधवार होता. वैशाख पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली म्हणून या दिनाला ” संबोधी दिन ” असे म्हणतात.

३) सिद्धार्थ गौतमाचे महापरिनिर्वाण
वैशाख पौर्णिमेचे तिसरे महत्व इ.स.पूर्व ४८३ ला सम्यक संबुध्द ४५ वर्षे पायी प्रवास करून मानवाच्या कल्याणाचा, हिताचा मार्ग आपल्या वाणीतून सांगून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. वयाच्या ८० व्या वर्षी बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वैशाखी पौर्णिमेला कुशीनगर येथील शाल वनात दोन शाल वृक्षांच्या मध्ये जगाला शांततेचा, सदाचाराचा, सद्गुणांचा मार्ग दाखवणारे महान मार्गदाते भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. तो दिवस होता मंगळवार.

बुद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्खू ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगबिरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात माजलेलं अवडंबर, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. लोकांमध्ये स्वर्ग आणि नर्क या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते विश्व गुरू होते.

तथागतांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी असल्याने वैशाखी पौर्णिमा जगभरातील बौद्ध ” महामंगल दिन ” म्हणून साजरा करतात.

सर्वाना वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!