प्रतापसिंग हायस्कूल सातारा या ठिकाणी नेहमीप्रमाणे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन .

काल दि. ०७-डिसें.२०२३ रोजी सातारा येथे बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त युवा बौद्ध धम्म परिषद आणि समता सैनिक दल यांच्या वतीने आम्ही मानवंदना देण्यासाठी गेलो होतो. ऐतिहासिक प्रतापसिंग हायस्कूल सातारा या ठिकाणी नेहमीप्रमाणे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या मंचावरती सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी आणि वेगवेगळ्या शाळांमधून आलेले शिक्षक आणि लहान विद्यार्थी उपस्थित होते. तो संपूर्ण कार्यक्रम शासकीय थाटातला होता. शासकीय कार्यक्रम कसे असतात याबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. केवळ औपचारिकता हाच त्या कार्यक्रमाचा भाग होता हे प्रकर्षाने आम्हाला जाणवले. काही अधिकारी तिथे भाषण करण्यासाठी आले होते तर काही जण फक्त आणि फक्त उपस्थिती महत्त्वाची आहे म्हणून आले होते. त्यांना बाबासाहेबांच्या शाळा प्रवेश दिनाच्या कार्यक्रमाची कसलीही आस्था नव्हती हे अगदी प्रकर्षाने जाणवले. या वेळेला बऱ्याच अधिकाऱ्यांचे भाषणे झाली. त्यामध्ये केवळ प्रा. डॉ. केशव पवार यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावरज्ञअभ्यासपूर्ण भाषण केले बाकीच्या सर्व अधिकाऱ्यांनी पाट्या टाकायची कामं केली. भाषणामध्ये कमीत कमी जय भीम तरी म्हणाला हवे होते पण तसेही काही दिसून आले नाही. फक्त पाट्या टाकायचा कार्यक्रम झाला असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमामध्ये काही लहान मुला मुलींनी खूप सुंदर भाषणे केली.हा कार्यक्रम जवळपास दिडक तास चालला. या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यामधून खूप कमी बौद्ध बांधव उपस्थित होते किंबहुना नव्हतेच असे म्हणायला हरकत नाही. सातारा जिल्ह्यामध्ये एवढी बौद्धधम्मा प्रती बाबासाहेबांच्या प्रती अनास्था का आहे हा चिंतनाचा विषय बनू शकतो.केवळ ३०० ते ४००लोक उपस्थित होते. त्यामध्येही तो कार्यक्रम सरकारी आहे आणि त्या कार्यक्रमाला हजेरी लावणे सक्तीचे आहे याच्यामुळे आलेले बरेच शिक्षक होते हे प्रकर्षाने दिसून आले. दुसरी गोष्ट म्हणजे साताऱ्यामध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेब राहिले होते ते जे घर आहे ते घर आता शासनाचे राहिले नाही. त्या घराच्या बाबतीत घरमालक विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी केस होती. ती केस त्या घरमालकाने जिंकली आहे. ते घर आता त्या घरमालकाच्या वारसांचे झाले आहे. आम्हाला असे समजले की त्या घरमालकाला अपेक्षित असलेली रक्कम शासन देऊ शकले नाही किंवा शासनाची देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या घराचे राष्ट्रीय स्मारक होणे आता शक्य नाही. आम्ही ते घर शोधत शोधत गेलो. त्या घरातील एका तरुणाला विचारले की, “बाबासाहेबांचे राहते घर इथेच कुठेतरी आहे ते कुठे आहे?” तर त्या तरुणाने सांगितले की,” मला माहित नाही”. पण नंतर इतरांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की तेच घर आहे.शासनाची अनास्था आणि साताऱ्यातील समाज बांधवांचे उदासिनता याच्यामुळे बाबासाहेब जिथे राहिले होते ते घर राष्ट्रीय स्मारक होऊ शकले असते पण यांच्या अनास्थेमुळे ते झाले नाही असेच म्हणावे लागेल. सगळ्यात वाईट वाटलेली घटना म्हणजे माता भिमाईचे स्मारक जे अर्धवट आहे त्या स्मारकाबाबत. या स्मारकाच्या बाबतीत खूप काही करता येऊ शकते. पण सातार्यातील समाज उदासीन दिसतो आहे. सध्या ते स्मारक अर्धवट अवस्थेत आहे. त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते विहार आणि स्मारक अशा पद्धतीचे स्ट्रक्चर आहे. त्या ठिकाणी कॉलम उभे केले आहेत ते अर्धवट अवस्थेत आहेत. स्मारक श्रेयवादामुळे रखडले आहे. स्मारक रखडल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी त्या स्मारकाच्या कॉलमांच्या सळया कापून विकल्या आहेत हे आम्हाला दिसून आले. जेव्हा आम्ही तिथे सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करत होतो त्याच वेळेला त्या स्मारकाच्या बाजूला दोघे दारू पिणारे लोक बाजूला बसून दारू पीत होते.माता भिमाई यांचे ज्या ठिकाणी दहन झाले होते त्याच ठिकाणी माता भिमाईचे सध्याच्या स्थितीतले अर्धवट स्मारक आहे. हे स्मारक श्रेयवादामुळे रखडले आहे. सातारा जिल्ह्यातील धम्म बांधवांनी या विषयावरती आवाज उठवून ते स्मारक पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी असे आम्हाला वाटते. कायदेशीर बाबतीत जर काही अडचण आली तर त्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत. सातारा जिल्ह्यामधील बांधवांनी त्या स्मारकाचे काम पूर्ण करणे हे तिथल्या धम्म बांधवांचे कर्तव्य आहे. एकंदरीत कालचा बाबासाहेब शाळा प्रवेश दिन मानवंदना दौरा युवा बौद्ध धम्म परिषद आणि समता सैनिक दल महाराष्ट्र यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केलं होतं. यामध्ये गडहिंग्लज, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, माणगाव इत्यादी ठिकाणाहून अनेक धम्म बांधव आले होते. बाबासाहेबांच्या बालपणीच्या आठवणी सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही अस्पष्ट खुणावत आहेत. त्या आठवणी जपणे त्यांचे स्मारक तयार करणे ही जबाबदारी आपली नाही का? आपणच याबाबत पुढाकार घेऊन बाबासाहेबांना आणि त्यांच्या बालपणाला सर्व देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे असे मला वाटते. मार्शल. रमेश जाधव, कोल्हाफूर, *प्रचारक, समता सैनिक दल महाराष्ट्र.*
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत