हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या वाढीतील तफावत..

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रकाशित केलेल्या लोकसंख्येच्या अहवालाची बातमी दै.लोकसत्तामध्ये १० मे २०२४ रोजी प्रसारित झाली.
दि.१२ मे २०२४ रोजी त्यावर भाष्य करणारा डॉ. निमिष साने, अभिजीत भोपळे यांचा लेख…
आधीच्या बातमीत असं म्हटलं होतं, की हिंदूंची लोकसंख्या १९५० ते २०१५ या काळात ७.८२ टक्क्यांनी घटली, तर मुस्लिमांची लोकसंख्या त्याच काळात ४३.१५ टक्क्यांनी वाढली.
वास्तविक, ही आकडेवारी लोकसंख्येसंबंधी नसून लोकसंख्येतील त्या त्या धर्माच्या वाट्याविषयी आहे. १९५१ च्या जनगणनेनुसार भारतात हिंदूंची संख्या साधारण ३०.४ कोटी होती, तर मुस्लिमांची संख्या साधारण ३.५ कोटी होती. २०११ मध्ये या संख्या अनुक्रमे ९६.६ कोटी आणि १७.२ कोटी होत्या. म्हणजे लोकसंख्या कुणाचीच घटलेली नाही, तर हिंदूंचा लोकसंख्येतील वाटा घटला आहे.
एकूण जन्माला येणारी मुले आणि ज्यांना मुलं होऊ शकतात अशा स्त्रियांची संख्या यांचं गुणोत्तर म्हणजे जननदर. थोडक्यात, एका स्त्रीमागे असणारी सरासरी अपत्यसंख्या त्यावरून कळते. हा जगभर वापरला जाणारा निकष आहे. हा दर दोन असला, की लोकसंख्या स्थिर राहते. दोनहून जास्त असेल तर वाढत जाते, दोनपेक्षा कमी असल्यास कमी होत जाते. देशातली धर्मानुसार जनन दराची आकडेवारी पाहिली, तर काय दिसतं? एका हिंदू स्त्रीला १९९२ मध्ये भारतात सरासरी ३.३ मुलं होत होती, तर एका मुस्लीम स्त्रीला सरासरी ४.४ मुलं होत होती. २०१५ मध्ये हे जनन दर अनुक्रमे २.१ आणि २.६ होते. २०१५ नंतरही हा कल तसाच राहिला असून २०१९-२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार हे जनन दर अनुक्रमे १.९४ आणि २.३६ होते. तात्पर्य, १९९२ ते २०२१ या काळात मुस्लीम समुदायातला जनन दर जास्त वेगाने म्हणजे ४६ टक्क्यांनी घटला, तर हिंदूंमधला जनन दर ४१ टक्क्यांनी घटला. हिंदू आणि मुस्लीम यांच्या जनन दरामध्ये १९९२ साली (४.४ – ३.३ =) १.१ चा फरक होता, तो आता (२.३६ – १.९४ =) ०.४२ वर आला आहे. भारतातील सर्वच धर्मांच्या जनन दरांत घट झाली आहे. परिणामी, सर्वच धर्मांच्या लोकसंख्यावाढीचा वेग मंदावला आहे. (स्रोत: प्यू रीसर्च सेंटर)
लोकसंख्या वाढीच्या वेगाचा संबंध धर्माशी किती आहे, हा प्रश्न जागतिक पातळीवर हान्स रॉसलिंग यांनी तपासला. त्यांचा व्हिडीओ ‘रिलिजन अँड बेबीज’ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यात त्यांनी दोन निष्कर्ष काढले आहेत – (१) जगाची लोकसंख्या एका काळानंतर स्थिर राहील आणि (२) लोकसंख्या वाढीच्या वेगाचा संबंध धर्माशी नसून शैक्षणिक-आर्थिक-सामाजिक मागासलेपणाशी आहे. स्त्रियांमधली निरक्षरता, कुटुंबनियोजन व गर्भनिरोधकांबद्दलचे अज्ञान याच्याशी त्याचा थेट संबंध आहे. हिंदूंमधला जननदर कमी होत असला, तरी हिंदूंमधल्या मागास राहिलेल्या समुदायांत तो सरासरीपेक्षा जास्त आहे याकडे राम पुनियानी यांनी त्यांच्या एका लेखात लक्ष वेधले आहे. जनन दराची राज्यवार आकडेवारी पाहिली, तर अनेक राज्यांत हा जनन दर दोनच्या जवळ गेला आहे. तुलनेने प्रगत राज्यांत हा दर दोनच्या खालीही आहे. त्याच वेळेस बिहारमध्ये हा दर सर्वाधिक (३.०) आहे. ही आकडेवारीही आर्थिक मागासलेपणाकडे निर्देश करणारी आहे.
शिक्षणाच्या संधी आणि दर्जा (खासकरून स्त्रियांसाठी) वाढवणे, लैंगिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, आरोग्यसेवा सर्वांकरता स्वस्तात (अगदी मोफतही) उपलब्ध असणे, आर्थिक-सामाजिक मागासलेपण दूर करणे, तसेच मूल हवे किंवा नको हे ठरवण्याची स्वायत्तता स्त्रियांना असणे हे गरजेचे आहे. त्याकरता आर्थिक-सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण आणि त्यानुसार मागास घटकांकरता न्याय्य धोरणांची निश्चिती आवश्यक आहे. धर्माधर्मांत नाहक तेढ निर्माण करणे नव्हे.
आपल्याकडे येणारी माहिती, आकडेवारी समजून घेणे, ती तपासून पाहणे, स्वत: इंटरनेटवर त्यासंबंधीची माहिती गोळा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यातूनच समाजात तेढ निर्माण करण्याचे खोडसाळ प्रयत्न हाणून पाडणे शक्य होईल.
संकलन – आर.के.जुमळे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत