११ मे १८८८ ; जोतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही उपाधी प्रदान !

स्त्रीशिक्षण, बहुजनांचे सामाजिक हक्क, वंचितांना मानवाधिकार, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय भेदाभेद अशा क्षेत्रात महान कार्य करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी ११ मे १८८८ रोजी देण्यात आली. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेलसरचे सुपुत्र रावबहादूर विठ्ठलराव वड्डेदार यांनी जोतिरावांना ‘महात्मा’ उपाधी दिली होती. जोतिबा फुले यांच्या वयाची ६० वर्षे व समाजकार्याची ४० वर्षे पूर्ण झाल्या बद्दल त्यांचे सहकारी रावबहादूर विठ्ठलराव वड्डेदार, नारायण मेघाजी लोखंडे यांनी जोतिरावांच्या कार्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्याचे ठरविले. वड्डेदार यांनी १८८८च्या मे मध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाड्यातील ‘मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था’ या संस्थेच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित केला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनाही वड्डेदार यांनी निमंत्रण दिले होते. जोतिरावांना हिदुस्थानचे ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ अशी पदवी द्यावी, असा निरोप सयाजीरावांनी वड्डेदार यांना पाठवला होता. “आपल्या उग्र तपस्येने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुषांना मानवाधिकार मिळवून देणारे, त्यांच्यात चेतना व जागृती निर्माण करणारे जोतिराव फुले खरे ‘महात्मा’ आहेत. त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी देणेच योग्य आहे” असे वड्डेदार यांनी सांगितले; तसेच जनतेच्या वतीने जोतिरावांना ‘महात्मा’ ही उपाधी प्रदान करत असल्याचे जाहीर केले. ”जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हजारो वर्षे ज्यांना अस्पृश्य मानले गेले. ज्यांना मानवाधिकारा पासून वंचित ठेवण्यात आले, त्यांच्यासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे” असे प्रतिपादन जोतिरावांनी त्या समारंभात केले होते. समाजसुधारक विठ्ठलराव वड्डेदार नि त्यांचे कुटुंबीय शिक्षण व व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले होते. वड्डेदार जोतिरावांच्या सत्यशोधक चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते होते. बहुजनांच्या शिक्षण, कामगार, सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कार्य केले. पुण्यात १८९५ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वड्डेदार यांनी शेतकर्याचा गवताचा २४ फुटी पुतळा उभारून आंदोलन केले होते. मुंबई महापालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी २३ वर्षे काम पाहिले होते. तसेच मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यातही मोलाची भूमिका बजावत राणीच्या बागेत ६० हजार नागरिकांचा शांतता मेळावा घेतला होता.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत