महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

संघर्षशील माणसाची ‘घुसमट’

डॉ. त्र्यंबक दूनबळे
अनिल भालेराव यांचा ‘घुसमट’ हा दुसरा कथा संग्रह.त्यांच्या मातेरं या कथा संग्रहानं वाचकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुमारे दहा काव्यसंग्रह, दोन कादंबऱ्या आणि दोन ललित लेखन करणाऱ्या या लेखकानं, या कथा संग्रहातून येथील सर्व सामान्य माणसाची घुसमट अतिशय संवेदनशीलपणे मांडली आहे.
या कथांचे अंतरंग अतिशय संक्षिप्त मनोगतातून स्पष्ट उलगडतं. त्यात लेखक म्हणतो, समाज माध्यमामुळं जग जवळ आलं.पण जवळच्या माणसाशी विसंवाद वाढला.जागतिकीकरण,खाजगीकरण आणि उदारीकरणाने देशाचा विकास झाला आहे,असा फक्त भास निर्माण झाला आहे. हातात आधुनिक साधने असूनही आपली मानसिकता बुरसटलेलीच आहे.एकीकडे सर्व संपती मुठभर भांडवलदारांच्या हातात एकवटत आहे.तर दुसरीकडे विविध मागास समूह आणि विशेष करून जाती व्यवस्थेमुळं भरडलेले भटके, विमुक्त आदिवासी, अन्नासारख्या मुलभूत गरजा भागवू शकत नाही,अशी स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली जमिनी गेल्याने शेतकरी समूह देशोधडीला लागला आहे.तर विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरणाऱ्यांची उघड हत्या होत आहे.भारतीय मन पारंपारिक मानसिकतेतून बाहेर पडायाला तयार नाही, असेच चित्र आहे. अशा वेळी वर्ग विहीन, जातीविहीन, विकासवादी स्वप्न पाहणाऱ्या माणसाची मोठी घुसमट होत आहे. या कथा त्या घुसमट झालेल्या माणसाच्या कथा व्यथा आहेत.
या कथा संग्रहात एकूण बारा कथा आहेत.मांडणी आशय विषय व व्यक्तिरेखा आणि मानवी संबंधातील विविध आडवे उभे ताणतणाव लेखकानं अतिशय उत्तमरीत्या मांडले आहेत. त्याचे एक उत्तम चित्रण उभं केलं आहे.कोणतेही ओढून ताणून किंवा शब्दाचे फुलोरे न फुलविता त्या व्यक्तिरेखा, पात्रं वाचकाच्या भेटीला येतात. समाजात नेमके काय घडतं याचे उत्तम निरीक्षण, मानवी दु;खाची जाणीव व कणव आणि येथील अदखल माणसाची दखल, ही या कथांची काही वैशिष्ट आहेत.भाषा साधी सोपी, सरळ, प्रसंगानुरूप, योग्य व वापरातील शब्द आणि प्रतिमा या कथातील व्यक्तिरेखन अधिक बोलके व नेमके करतात. मसन जोगी कथेतील आजही गावशीव, घरदार नसलेला आणि पोटासाठी गावातील लोक जे देतील ते शिळेपाकं व उष्टं अन्नावर आणि स्मशनातील प्रेतावरील कपडे, किडूक मिडूक यावर जगणारा, खोटे नाटे आरोप होऊन मार खाणारा उध्वस्त समाज आपल्या अवती भोवती अजून आहे याची जाणीव करून देतो.त्यातील मसनजोगी जग्गू, त्याची पत्नी झिल्ला, गावकऱ्याच्या मारहाणीत रक्त बंबाळ होतात. त्यांचे पाल जाळून टाकलं जाते.ते दोघं आणि त्याची पोरं रक्त बंबाळ होवून उभा संसार जळताना पाहतात.काही करू शकत नाही. ही कथा वाचताना आणण्भाऊ साठे यांच्या स्मशानातील सोनं या कथेची आठवण होते.तर तर संगीत शिक्षक सिद्धार्थ आणि सुरांच्या प्रेमात पडलेली विशाखा यांच्या नात्यातील गुंतागुत उलगडणारी ओढ ही कथा वाचकाच्या मनात घर करते.लिव्ह इन रिलेशन शिप, बैल आणि मंगळसूत्र या संग्रहातील काही वेगळ्या धाटणीच्या कथा. आपल्या अवती भोवती वावरणारी मानसं घेऊन चितारलेल्या कथा. लिव्ह इन रिलेशन शिप,या कथेत आदित्य आणि रजनी हे दोघे, लिव्ह इन रिलेशनमध्ये अस्मिता कदम या महिलेकडे राहतात.ते पेइंग गेस्ट म्हणून राहत असले तरी अस्मिता त्यांना मायेची उब देते. ती पैसापेक्षा त्यांना मदत करण्याचे काम करते. आदित्य आपले स्वतःचे घर घेण्याचे खूप प्रयत्न करतो. पण तो खाजगी नोकरीत असल्याने त्याला कर्ज मिळत नाही. तेव्हा रजनी त्याला सोडून आपल्या कंपनीतील बॉस बरोबर राहण्याचा निर्णय घेते.तर मंगळसुत्र कथेत आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला अडचणीत मदत करण्यासाठी कोणतीही चौकशी न करता आपले गळ्यातील मंगळसूत्र काढून देणारी विशाखा, नाते संबंध कसे बदलतात याचे सुरेख चित्रण करतात.
केवळ माणसंच नव्हे तर सोबत करणारे प्राणी देखील कसे रंग बदलतात याचे चित्रण बैल कथेत वासुदेव आणि बगळ्याने दाखवून दिले आहे.मालक बदलताच बगळ्या बैल वासुदेवला धक्का देतो, हे फारच सुरेखपणे या कथेत वाचायाला मिळते.तर गणपतीची वर्गणी हे वास्तव कथन सामाजिक समस्यांचे वेगळे दर्शन घडविते.
सोपी व सरळ भाषा, बोली भाषा व संवादाचा प्रभावी वापर, तळातील माणसाविषयीची सामाजिक संवेदना,निरीक्षणातून टिपलेली वक्ती चित्रणे या कथनाची वैशिस्टे आहेत. सुंदर मुखपृष्ट, नेटकी बांधणी असलेला हा संग्रह हातात घेताच वाचकाच्या मनात भरतो. ….
डॉ. त्र्यंबक दूनबळे -9096723894

कथासंग्रह -घुसमट
लेखक -अनिल भालेराव
पृष्टे -140
किंमत -120
प्रकाशन -अदिती प्रकाशन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!