निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मतदारांनी त्यांच्या प्रतिनिधींना निवडण्याच्या परीक्षेचा आधार काय?

जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशातील नागरिकांनी त्यांच्या प्रतिनिधींना निवडण्याच्या परीक्षेचा आधारच त्यांना माहीत नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. याचा अर्थ देशातील नागरिकांची अवस्था त्या विद्यार्थ्यांसारखी आहे, जे विद्यार्थी परीक्षा द्यायला तर गेले, परंतु त्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हेच माहीत नव्हते. तेव्हा त्यांनी काय अभ्यास केला असावा आणि ते काय परीक्षा देणार आहेत, हे आपण सहजच ओळखू शकतो. आपल्या देशातील नागरिकांची आज तशीच अवस्था झाली आहे. त्यासाठी, ज्या कुणाला वाटते की, नागरिकांनी चांगल्या सुज्ञ लोकांची आपले प्रतिनिधी म्हणून निवड केली पाहिजे, त्यांनी प्रथम नागरिकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडताना कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत याचा अभ्यासक्रमच ठरवला पाहिजे. जेणेकरून नागरिक आपले योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी सक्षम होतील. नागरिकांसाठी खालील प्रकारे अभ्यासक्रम ठरवता येऊ शकतो.
लोकशाही; – आपला देश हा लोकशाहीप्रधान देश असल्याचे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा लोकशाही काय असते याची जनतेला माहिती असली पाहिजे. लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत शासनव्यवस्था चालवली जाते. त्यासाठी जनतेने आपले चांगले प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. परंतु एका म्हणीप्रमाणे ‘लोकांना त्यांच्यासारखेच लोकप्रतिनिधी मिळतात’. म्हणजे लोकांना जर सुज्ञ प्रतिनिधी पाहिजे असतील, तर प्रथम लोकांना सुज्ञ व्हावे लागेल. त्यासाठी लोकांमध्ये समतेची भावना असणे गरजेचे आहे. कारण लोकांमध्येच जर असमानता असेल, तर त्या ठिकाणी लोकशाही ही केवळ नावापुरतीच लोकशाही असेल. काय भारतात समानता आहे? यावर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी घटना सादर करताना सरकारला इशारा दिला होता की, “२६ जानेवारी १९५० रोजी आपण एका विरोधाभासात्मक जीवनात प्रवेश करणार आहोत. एकीकडे, राजकीय क्षेत्रात समानता असेल, परंतु सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मात्र असमानता असेल. तेव्हा समाजात असलेली सामाजिक व आर्थिक विषमता शक्य तितक्या लवकर दूर करा, अन्यथा मी मोठा कष्टाने ज्यांच्यासाठी घटनेचा हा जो डोलारा उभा केला आहे, तीच लोक हा डोलारा उध्वस्त करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.” परंतु ज्यांच्या हातात शासनव्यवस्था सुपूर्त करण्यात आली होती, त्या लोकांनी समाजातील सामाजिक व आर्थिक विषमता दूर न करता ती आणखी कशी वाढेल याकडे लक्ष दिले. त्यामुळे लोकशाही देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या वर्गाचे समाजात श्रेष्ठ स्थान होते, त्याच ब्राह्मण वर्गातील आणि तेही एकाच कुटुंबातील व्यक्तींनी देशावर चार दशके राज्य केले. समाजात उच्च नीचतेची सामाजिक व्यवस्था कार्यरत असल्याचा तो एक दाखला मात्र होय. त्यासाठी येथील जनतेला उच्च नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेबद्दल शिक्षण देणे गरजेचे आहे.
उच्च नीचतेची सामाजिक व्यवस्था; – देशात उच्च नीचितेची सामाजिक व्यवस्था, खिळखिळी जरी झाली असली, तग धरून आहे. समाजात जोपर्यंत जातीव्यवस्था आहे, तोपर्यंत सदरील सामाजिक व्यवस्था टिकून राहील. कारण बहुजन समाजाच्या लोकांना या व्यवस्थेमध्ये पशु म्हणूनच वागवले जाते. कारण पशुमध्ये जसे गाय, बकरी, म्हैस, कुत्रा, वाघ जसे जातीचे प्रकार असतात, त्याच पद्धतीने समाजामध्ये, मंडल आयोगानुसार, केवळ ओबीसीमध्ये ६७४३ जाती दिसून येतात. दुसरीकडे जर बघितले, तर ब्राह्मण वर्गात जाती दिसून येत नाहीत. ब्राह्मण हे आपल्या नावांसमोर ना हिंदू लिहितात ना कुठली जात लिहितात. त्यामुळे समाजात तेच फक्त माणसं असल्याचे दर्शक होय, बाकी इतरांचा मात्र पशु म्हणूनच जगण्याचा अट्टाहास चालू आहे. म्हणून अस्तित्वात असलेल्या सामाजिक व्यवस्थेचे शिक्षण येथील नागरिकांना विशेषतः बहुजन समाजाला देणे गरजेचे आहे.
महात्मा फुले यांचे बहुजन समाजाला वरदान; – महात्मा फुले यांनी समाजाचे शेठजी भटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र असे दोन वर्ग करून भावा भावांना त्यांची ओळख करून देत त्यांच्या विरोधकांची सुद्धा ओळख करून दिली. त्यांनी ती एक सामाजिक क्रांतीच केली. त्यामुळे आज देशात आपले कोण व आपले विरोधी कोण आहेत या गोष्टीची शूद्र अतिशूद्र वर्गाला अर्थात बहुजन समाजाला जाणीव होऊ शकली. परंतु जो विरोधी वर्ग आहे, त्या वर्गाच्या हातातच देशाची शासनव्यवस्था असल्यामुळे ते बहुजन समाजाचा छळ करीत आहेत. विशेष म्हणजे लोकशाही देशात प्रबळ विरोधी पक्षाचे असणे गरजेचे समजले जाते. परंतु येथे शासन व विरोधीपक्ष ब्राह्मण बनिया वर्गाच्याच हातात आहेत. म्हणजे शासनात व विरोधीपक्षात एकाच वर्गाचे राज्य आहे.
लोकशाही देशात विचारसरणी महत्वाची आहे;- ज्या अर्थी, लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी राज्य चालवायचे आहे, त्याअर्थी लोकांच्या कल्याणासाठी एक विचारधारा महत्त्वाची असते. परंतु ज्या वर्गाची लोक शासनात व विरोधीपक्षात आहेत, त्यांच्याकडे कुठलाही मानवी कल्याणाचा विचार दिसून येत नाही. त्याउलट,
ते विषमता, गुलामी, भेदभाव व अन्याय या अविचारांचा पुरस्कार करतात. अशा सामाजिक व्यवस्थेत देशाचे नागरिक आणि विशेषतः बहुजन समाजाची लोक कोणत्या लोकांची आपले प्रतिनिधी म्हणून निवड करणार आहेत? म्हणून घटनेच्या प्रस्तावनेत समानता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय हा जो मानवीकल्याणाचा विचार नमूद केलेला आहे, तो विचार जनतेच्या अभ्यासक्रमात दिला गेला पाहिजे. त्याशिवाय कुठलीही निवड योग्य प्रकारे होऊ शकणार नाही. त्यासाठी जनतेला त्या विचारांची निकड आणि त्यापासून मानवी जीवनात होणारा लाभ याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे लागेल. परंतु इथे मात्र सत्ताधारी लोकांकडून वेळोवेळी वेगळीच व असत्यावर आधारित प्रात्यक्षिक करून दाखविले जातात.
आज निवडणुका म्हणजे एक खेळ झाला आहे;- एकदा बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर नेहरूंना म्हणाले होते की, “निवडणुका तुमच्यासाठी एक खेळ असू शकतात, परंतु निवडणुका माझ्यासाठी एक जीवन मरणाचा प्रश्न आहे”. आज निवडणुकांच्या माध्यमातून एक खेळ करण्यात येत आहे. खेळ या शब्दाचा वापर यासाठी केला आहे की, ब्राह्मण बनिया वर्ग आपल्या पक्षांच्या माध्यमातून सत्तेचे गाजर पुढे करून बहुजन समाजाच्या राजकीय महत्त्वकांक्षा असलेल्या लोकांना ते आपल्या तालावर नाचवत आहेत.
नव्या सामाजिक व्यवस्थेप्रमाणे निवडणुका घ्या; – आज देशात सतत निवडणुकासंबंधानेच बोलले जाते. परंतु त्यांचा बोलण्याचा उद्देश मात्र वेगळाच असतो. ते जेव्हा निवडणुकासंबंधाने बोलत असतात, तेव्हा ते येथील उच्च नीचतेची सामाजिक व्यवस्था पक्की करीत असतात. उच्च – नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेचा आधार म्हणजे येथील भावाभावांना (बहुजन समाज) हजारो जातीत विभागून ठेवत त्यांच्यात परस्परांमध्ये द्वेष भावना कशी तेवत ठेवता येईल हे बघणे होय. आणि निवडणुका हे त्यासाठी एक चांगलेच माध्यम होय. कारण निवडणुका लढण्यामागे जनतेची सेवा करणे हा हेतू मुळात नसतोच, तर निवडणुकांच्या माध्यमातून मला पद, पैसा व प्रतिष्ठा कशी मिळेल हा हेतू असतो. त्यामुळे निवडणुकांच्यासंबंधाने समाजात जो काही गैरसमज झाला आहे, तो प्रथम दूर करणे गरजेचे आहे. निवडणुकांच्यामाध्यमातून शासनात जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल, हा विचार समाजात कसा रुजवता येईल हे महत्त्वाचे आहे. परंतु त्यासाठी समाजात समानता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय हा विचार रुजवणे गरजेचे आहे. कारण त्याशिवाय बहुजन समाजाचे अन्न, वस्त्र व निवारा हे मूलभूतप्रश्न सुटणार नाहीत आणि जोपर्यंत बहुजन समाजाचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत, तोपर्यंत बहुजन समाजाला समृद्ध जीवन काय असते हे कळणार नाही. आणि समृद्ध जीवन कळाल्याशिवाय बहुजन समाजामध्ये सेवाभाव निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत समाजात सेवाभाव निर्माण होणार नाही, तोपर्यंत जनतेची खरोखर सेवा करण्यासाठी बहुजन समाजातील लोक पुढे येणार नाहीत. म्हणून जी उच्च- नीचतेची सामाजिक व्यवस्था आहे, ती निवडणुकांसाठी अयोग्य सामाजिक व्यवस्था आहे. आणि म्हणून, प्रथम ती सामाजिक व्यवस्था बदलणे हे केवळ गरजेचेच नसून अनिवार्य आहे. वरील सामाजिक व्यवस्था तशीच ठेवून किती जरी निवडणुका घेतल्या, तरी लोकांच्या विचार आचारात काही एक बदल होणार नाही. समाजात उच्च-नीच हा भेदभाव तसाच चालू राहील. समाजात जी गरिबी, बेरोजगारी आहे, त्यात काही एक बदल होणार नाही. समाजात जी परस्परांमध्ये द्वेष भावना आहे, ती काही कमी होणार नाही आणि निवडून आलेल्या सरकारचा समाजाला काडीमात्र फायदा होणार तर नाहीच, उलट बहुजन समाजाचा छळ मात्र केला जाईल. म्हणून उच्च नीचतेची सामाजिक व्यवस्था नष्ट करण्यासाठी बहुजन समाजाने मोहीम हाती घेतली पाहिजे, तसे झाले तर, निवडणुकीशिवाय सत्ता त्यांच्या चरणी लोळण घेईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!