‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘

खरे तर डॉक्टर आंबेडकरांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ ह्या ग्रंथा अगोदर बुद्ध व त्यांच्या वाङ्मयावर, शिकवणुकीवर अनेक ग्रंथ उपलब्ध होते. त्या सर्वांची त्रिपिटकासह वाचन व समीक्षा डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या स्वतःच्या संकल्पित दृष्टिकोनातून केली व त्यांच्या उद्दिष्ट प्रमाणे कोणताच ग्रंथ त्रिपिटकासहित न्याय देऊ शकत नाही. हा निर्णय पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी ‘ दि बुद्ध अँड हिज् गॉस्पेल ‘ मध्ये काही दुरुस्त्या करून ‘दि बुद्ध अँड हिज धम्म ‘ ह्या नावाने छापला. डॉक्टर आंबेडकराची हे धडपड व तळमळ त्यांच्या अनुयायांनी प्रथम समजून घ्यावी व त्या अनुषंगाने वाटचाल करावी. परंतु जशी बुद्धानंतर भिक्खूंनी व राजे, धनिकांनी बुद्ध शिकवणुकीची वाट लावली तशीच डॉक्टर आंबेडकरानंतर बुद्धिजीवी, धनीक व उच्च स्थानी पोहोचलेला वर्ग वाट लावत आहे की काय अशी शंका येते. बुद्धाच्या क्रांतीला प्रतीक्रांतीत परिवर्तित करायचे षडयंत्र राबविणाऱ्या व्यवस्थेशी हात मिळवनी करताना, पद, प्रतिष्ठा, पैसा अशा आमिषांना बळी पडताना सावधगिरी बाळगावी. किंवा त्यावर शंका घ्यावी असे यांना का वाटत नाही? डॉक्टर आंबेडकरांनी ‘दि बुद्ध अँड हिजं धम्म ‘ समजून घेण्यासाठी ‘भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास ‘ व ‘बुद्ध आणि मार्क्स ‘ हे दोन ग्रंथ वाचायचा सल्ला का दिला आहे? हे आपल्याला समजले पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी मोठ्या परिश्रमाने दिलेल्या विचारांचा, चळवळीचा व कार्याचा वारसा नष्ट होणार नाही याविषयी जागरूक राहिले पाहिजे.
डॉक्टर आंबेडकरांनी धर्म स्वीकारताना खालील कसोट्या ठेवल्या होत्या.
१) ईश्वरापासून मुक्ती, २) वर्ण व्यवस्था व जातीभेदातून मुक्ती, ३) देव देवता, अनुष्ठान, तपतीर्थ, पूजा पाठ इत्यादी पासून मुक्ती, ४) स्वतंत्रता, समता व बंधुतेच्या सामाजिक मूल्यावर आधारित धर्म, ५) सामाजिक परिवर्तनास होकार, ६) वैज्ञानिक दृष्टिकोन. तरीही ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ‘ ग्रंथात चमत्कारी, चैतन्यवादी, दैववादी गोष्टी व उदाहरणे राहून गेलीत. डॉक्टर आंबेडकरांना हे माहीत होते की, त्यांचे अनुयायी निरक्षर, अज्ञानी व श्रद्धामध्ये अडकलेले आहेत; त्यांना ह्या गोष्टीमुळे धम्म समजणे अडचणीचेच नाही तर नकारार्थी प्रभाव टाकणारे होईल. तरीही २५०- ३०० ग्रंथाच्या वस्तुनिष्ठ, अध्ययनातून त्रिपिटकाच्या ताळमेळ न जुळणाऱ्या ७३ ग्रंथाच्या मांडणीतून, मूळ बुद्ध वचनांना व शिकवणुकीला प्रक्षिप्त केलेल्या ब्राह्मणी कृत साहित्यातून बुद्धाचे मूळ चरित्र, शिकवण व तत्वज्ञान सार स्वरूपात सुसंगतपणे एकत्रिकरण करणे किती कठीण काम आहे, याची कल्पनाच केलेली बरी. हे सर्व करताना मूळ बुद्ध व धम्म सुटू नये याची सर्कसही त्यांना करावी लागली. त्यात धर्माचा सामाजिक आशय तर लुप्तच झाला होता, तो जनतेसमोर मांडणेही नितांत गरजेचे होते. असे करतानाच ह्या गोष्टी चिकटून आल्या. त्यांना त्या राहू देणे आवश्यक वाटले. अन्यथा ग्रंथ एकदम रुक्ष वाटला असता, असे त्यांचे मत झाले. म्हणूनच ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘त्यात नवे काही आहे असा मी दावा करीत नाही. मी तर केवळ एक संग्रहक आहे.’ वरील अटी लक्षात घेऊन कामाच्या संकल्पना व विचार तेवढे स्वीकारावेत व आपल्या ध्येयाला मारक भाग; चैतन्यवादी व चमत्कारिक भाग सोडून द्यावा तरच आपण डॉक्टर आंबेडकरांच्या तळमळीला न्याय देऊ शकू. गरीब, दलित, कष्टकऱ्यांच्या उद्धारासाठी, व्यवस्था परिवर्तनासाठी बुद्ध धर्म कसा सहाय्यक ठरेल; पुन्हा एकदा , समताधिष्ठित, मानवतावादी, विज्ञानवादी, आदर्श समाज, नैतिक समाज निर्माण करणारी क्रांती कशी घडेल; अग्रक्रमाने हा विचार करावा लागेल. त्यावरच ह्या ग्रंथाची उपयोगीता अवलंबून आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत