देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सत्याचा पालनवाला हा धन्य जोतिबा झाला |

अनिल भुसारी, तुमसर, जि. भंडारा

सत्याचा पालनावाला
हा धन्य जोतिबा झाला |
पतीतांचा पालनावाला
हा धन्य महात्मा झाला ||
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना उद्देशून वरील ज्या पंक्ती म्हटल्या आहेत, त्या महात्मा फुलेंच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या विचारांची दालनेच खुले करून देतात.
वि. द. घाटे नावाचा व्यक्ती महात्मा फुलेंच्या कार्याने प्रेरित होऊन त्यापूर्वी त्यांनी महात्मा फुले यांच्या संदर्भात केलेल्या अपमान जनक वक्तव्यांची माफी मागत म्हणतो, “नुसता मुजरा चालायचा नाही, तर फुलेंना लोटांगणच घातले पाहिजे.” यावरून एक लक्षात येते की, महात्मा फुलेच्या शत्रूंना सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याची दखल भविष्यकाळात घ्यावी लागली. आणि त्यांच्या कार्यापुढे नी विचारा पुढे त्यांना नतमस्तक व्हावं लागले. परंतु ज्या कुणबी, माळी, मराठा, ओबीसी समाजाकरता महात्मा फुलेंनी आपली संपूर्ण संपत्ती खर्च घालून आयुष्य वाहिले, त्या बहुजन समाजाला मात्र महात्मा फुलेंची प्रेरणा घ्यावी वाटली नाही. त्यांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या कार्याची आणि विचारांची दिशा ठरवावी वाटत नाही. खरं तर आज आमच्या बहुजनांची ही शोकांतिका आहे. त्यामुळेच आज आमचा बहुजन समाज विकासाच्या प्रवाहातून दूर फेकल्या गेला आहे.
दीडशे वर्षा आधी भारतातील बलाढ्य इंग्रजी सत्तेला न भिता इंग्रजांना उद्देशून ते म्हणतात, “इंग्रज सरकारच्या कारभारामुळे मेहनती, दिलगीर आणि चोरटे खुशाल बनले आहेत. नित्य नवे कर शेतकऱ्यांच्या बोडक्यावर बसवून त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करण्याचे धोरण असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. हे इंग्रज सरकार ऐशआरामी, उधळे आणि भेकड आहे,” स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ‘अमृत काळामध्ये’ आम्ही निवडून दिलेले सरकार सुद्धा आज जनतेवर दररोज नवनवे कर लादून महागाईचा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे इथल्या शेतकरी, बेरोजगार तरुणावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे इंग्रजांच्या काळातील धोरणे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांची धोरणे यांच्यात किंचितही फरक वाटत नाही. म्हणजे गोरे गेले आणि काळ्यांच्या गुलामगिरीत आपण जगत आहोत. शेतकरी आणि शुद्रादीशुद्रांच्या दैन्यावस्थेला कारणीभूत असणाऱ्या सर्वच व्यवस्थेविरुद्ध ते पेटून उठतात. त्यांच्या हल्ल्यामधून मनुवाद्यांप्रमाणेच इंग्रज सरकार सुद्धा सुटलेले नाही. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात, ….
सत्ता तुझी राणीबाई | हिंदुस्तानी जागृत नाही ||
जिकडे तिकडे ब्राह्मणशाही | डोळे उघडून पाहि ||
चहूकडे भटशाही | कुणब्याची दाद नाही ||
महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो संघर्ष केलेला आहे तो फक्त शुद्रादीशुद्रांच्या हक्क आणि अधिकारांसाठीच होता असे समजणे हा एक प्रकारे त्यांच्या सर्वंकष कार्यावर अन्याय केल्यासारखे होईल. फुलेंची भूमिका आणि संघर्ष हा सर्वंकष मानवतावादी होता. मानवी जीवनात जे – जे वाईट आणि रोगट असेल त्या विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले होते. जिवाच्या कराराने या युद्धामध्ये ते हयातभर लढले. त्यांनी सुरू केलेले हे युद्ध अजूनही संपलेले नाही. त्यांच्या मृत्यूच्या नंतर फुलेंच्या मावळ्यांची वाहतात झाल्याचे दृश्य दिसत आहे. अजून एका नव्या नेतृत्वाची बाबासाहेब आंबेडकर या फुलेंच्या शिष्याच्या रूपाने गरज आहे. महात्मा जोतिराव फुले यांना त्यांच्या जयंतीदिनी (११एप्रिल १८२७) विनम्र अभिवादन…

   अनिल भुसारी, तुमसर, जि. भंडारा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!