सत्यशोधक परंपरेतील पाईक – राष्ट्रपिता महात्मा फुले. (जयंती विशेष,11 एप्रिल 2024 )

आपल्या देशात सत्यशोधक परंपरा चार्वाक पासून सुरू होते आणि पुढे तथागत बुद्ध आणि मग महात्मा फुले अशी आहे. सत्यशोधक परंपरेमुळे आपल्या देशात विज्ञानवादी दृष्टीकोन तयार व्हायला मोठी मदत झाली आहे. कारण पाश्चिमात्य विज्ञानवादी परंपरा आपल्या देशात आली म्हणून आज आपण जे मोठे वैचारिक परिवर्तन दिसत आहे त्याचे बीज यात आहे. अर्थात यासाठी मोठी किंमत सत्यशोधकांना चुकवावी लागली हा मोठा इतिहास आहे. प्रत्येक काळात या विज्ञानवादी लोकांना छळले आहे आणि आजसुद्धा छळले जात आहे. कारण जर संपूर्ण समाज विज्ञानवादी झाला तर तो सुधारणावादी होईल आणि मग विशिष्ट लोकांचे ( भट ) वर्चस्व बहुजन समाजावर राहणार नाही. एखादा कोणताही प्रश्न जर मनाला पडला तर त्याच्या मुळाशी जाण्याचे धाडस या सत्यशोधकी विचारात असते. यामुळे समाज मानसिक गुलामीतून बाहेर येईल. आज आपला बहुजन तरुण कोणत्याही कर्मकांडात का अडकतो तर याचे साधे कारण तो सत्यशोधकी विचार डोक्यात ठेवत नाही. त्यामुळे आज तरुण पिढीला कोणीही बाबा , बुवा गुलाम करतो आणि त्याचा स्वार्थ साधतो आहे. आज कोणीही कथाकार आपल्या करोडो तरुणांना दिशाहीन करीत आहे. आणि आपले तरुण त्यांच्या मागे आपले करियर सोडून पळत सुटले आहेत. याचे कारण आपली बहुजन सत्यशोधकी विचार परंपरा ते विसरले आहेत. आपल्या महापुरुषांच्या जयंत्या काढून आणि डी.जे. लावून फार हातपाय दुखे पर्यन्त नाचले तरीआपण पुढे कधीच जाणार नाही. तर आपल्याला आज आर.एस.एस. आणि त्यांची पिळावळ असणार्या संघटना काय डावपेच आखत आहेत त्याला विचारानेच उत्तर द्यावे लागेल. आणि यासाठी आपला समाज सत्यशोधक विचाराने पुढे गेला पाहिजे.
राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सत्यशोधक कोणाला म्हटले आहे तर ते म्हणतात “ सत्यशोधक शूद्र आणि अतिशुद्रच असू शकतो.” याचा अर्थ आज आपल्या समाजात अनेक लोक आपण सत्यशोधक आहोत असा जाहीर प्रचार करतात त्यापासून आपण सावध असले पाहिजे. त्यामुळे आपले बहुजन सोडून इतर कोणीही सत्यशोधक होऊ शकत नाही. परंतु आपल्याच अर्ध्या विद्वानांना असे वाटत आहे की, काही ब्रह्मामण सत्यशोधक असतात आणि मग आपले काही विद्वान यात फसतात आणि पूर्वी सुद्धा फसले आहेत. तर आपण यापासून सावध असले पाहिजे. कारण ब्रह्मामण किती धूर्त आणि आपली फसवणूक करणारे आहेत याबद्दल महात्मा फुले यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात म्हटले आहे की, “ ब्रह्मामणांची तसेच शुद्रा-अतिशुद्र असा भेदभाव पाळणार्या दलालांची सावली सुद्धा माझ्या मृत्यूशय्येवर पडू देता कामा नये.” असे जर आपल्याला सांगितलेले असेल तर मग आपण बहुजन त्यांचे वारसदार आहोत. आज महाराष्ट्रात असे काही वारसदार आहेत की,त्यांनी समता परिषद आणि अशा संघटना सुरू केल्या आहेत पण त्यांचे वर्तन पाहिले तर महात्मा फुले यांच्या विचारा विरोधी आहे. असे अनुयायी साई दर्शन घेतात आणि अनेक सनातनी परंपरा पाळतात. परंतु राजकीय असतील किंवा सामाजिक असतील अशा लोकांनी थोडया आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी आपल्या महापुरुषांना बेइमान होऊ नये असे मला वाटते.
आपल्या बहुजन समाजाने आपला सामाजिक आणि संस्कृतिक इतिहास कधीच विसरू नये उलट समाजाला पुन्हा पुन्हा सांगितला गेला पाहिजे. कारण आपण आपला इतिहास जीवंत ठेवला तर आपण मानसिक गुलाम होणार नाही. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की, “ जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.” आणि म्हणून काठमांडू येथील धम्म परिषदेत भाषण देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की,“ मी सर्व भारत बौद्धमय करीन.” याचा आधार काय होता ? तर तो एकच होता की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या बहुजन समाजला त्यांचा सामाजिक आणि संस्कृतिक इतिहास सांगणार होते. परंतु त्यांना थोडे जास्त आयुष्य मिळाले नाही. आणि मग पुढील काळात आपल्याला आपला सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास समजू दिला नाही. उलट आपल्यावर पारंपारिक विचार जास्त लादले गेले आणि आपलीच कांही विद्वान मंडळी थोडया फायद्यासाठी त्यांना जाऊन मिळाली.
दिनकरराव जवळकर , भास्करराव जाधव आणि केशवराव जेधे हे सत्यशोधक चळवळीचे खरे निष्ठावान होते. पण आपल्याकडे अनेक थोर पुरूषांना या ब्रह्मामणी डावपेचापुढे हार मानावी लागली. आता अशी अपेक्षा नव्हती पण कधी कधी सत्ता आणि पदे याचा मोह माणसांना आपल्या ध्येयापासून दूर नेतो आणि असेच झाले एवढे प्रामाणिक असणारे लोक इथे बळी पडले. आणि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मदतीने हे तीनही सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते असूनसुद्धा तेच या चळवळीचे मारेकरी ठरले. आणि ही भारताच्या सत्यशोधक चळवळीच्या इतिहासातील सर्वात भयंकर घटना ठरली. आणि सर्व सत्यशोधक चळवळ कोंग्रेस मध्ये विलीन झाली. आणि ज्यांनी आपल्या जिवापेक्षा जास्त जपलेली चळवळ स्वत:च कोंग्रेसच्या दावणीला बांधली. आणि यानंतर जी उतरती कळा लागली ते आजपर्यंत ही चळवळ फार पुढे जाऊ शकली नाही. कारण एवढे प्रामाणिक आणि सच्चे कार्यकर्ते पुन्हा होणे नाही. मग आधुनिक काळात काही लोकांनी प्रयत्न केले पण यात अनेक विद्वान मागे सांगितल्या प्रमाणे खूप अभ्यास करतात आणि चळवळ पुढे नेतात आणि ऐनवेळी त्यांच्या जाळयात अडकतात. हे ऐकून मनाला फार वेदना होतात. आज अनेक आंबेडकरी विद्वान मंडळी आहेत तसेच इतर बहुजन मंडळी सुद्धा आहेत पण एखादा क्षुल्लक फायदा मिळत असेल तर असे लोक लगेच मागे होतात आणि चळवळ मग मंदावते. भारतातअनेक क्षेत्रात काम करणार्या आपल्या विद्वान मंडळीचा हेवा वाटतो की, किती विद्वान आहेत यासाठी आणि कधी कधी फार राग येतो की, कसे यांना आर्थिक लाभासाठी आपल्या महापुरुषांनी सुरू केलेली चळवळ यांनीच मागे नेली.
आज अनेक लोक आहेत ते वयक्तिक पातळीवर समाजाचे प्रबोधन करतात म्हणजे साहित्य निर्माण करतात तसेच विचार मांडतात पण यांना आपला समाज साथ देत नाही , कधी कधी त्यांच्या घरची मंडळी सुद्धा साथ देत नाही. पण हे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांचे काम चालूच ठेवतात. आज महाराष्ट्रात आणि देशात अनेक विचारवंत आहेत त्यांना स्वत: जिवाला धोका आहे हे माहीत आहे , अनेक पत्रकार आहेत त्यांनाही धोका आहे पण ते आपले काम चालूच ठेवत आहेत. इथे आपल्या समाजाने त्यांना साथ दिली पाहिजे. हे सर्व निर्भीड पत्रकार आजच्या काळातील सत्यशोधक आहेत असेच म्हणावे लागेल. आणि सत्यशोधकांना नेहमी किंमत मोजावी लागते.
आपण गोविंद पानसरे , कलबुर्गी आणि गौरी लंकेश अशा लोकांना पाहिले असेल आणि नरेंद्र दाभोळकर सारखे विचारवंत समाजाला जागृत करीत होते. पण त्यांना शेवटी प्राणाला मुकावे लागले. महात्मा फुले यांच्या घरी त्याकाळात मारेकरी पाठवले होते. त्यांनी स्त्री शिक्षणाची देशात सुरुवात केली आणि कांही समाज कंटकाच्या सांगण्यावरून महात्मा फुले यांच्या वडिलांनी पती-पत्नीला घरातून बाहेर काढले गेले. चार्वाकला जीवंत जाळले , बुद्धाला विषप्रयोग झाला आणि आपले सर्वच महापुरुष कोणत्या ना कोणत्या कटाचे बळी ठरले आहेत. कारण सत्य सांगणे हे समाजात काही लोकांना नको असते. म्हणजे त्यांच्या हीताच्या आड येते. आणि संपूर्ण समाजाला सत्य काय असते ते माहीत नसते. आणि ब्रह्मामणवाद हा फार खतरनाक असतो. तो आपल्याला सत्यशोधक मार्गानेच संपवावा लागेल आणि त्यामुळे आज कोणीही सत्य सांगत असेल , समाजाला जागृत करीत असेल तर ब्रह्मामण त्याला कोणत्याही षडयंत्रात अडकवून एक तर संपवतात किंवा बदनाम करतात. आणि त्यामुळे आज आपल्या बहुजन समाजात यांचे षड्यंत्र आपण सर्वांना सांगितले पाहिजे. आणि आपल्या समाजासाठी वेळ दिला पाहिजे. सत्यशोधक काम करण्यासाठी आपणास मोठा त्याग करावा लागेल,कारण ही मोठी विचार परंपरा आहे. समाजाला जागृत करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आपल्या महापुरुषांनी मोठा त्याग केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:ची मुले मरतांना डोळ्याने पाहिली आहेत पण कार्य सोडले नाही. महात्मा फुले यांनी किती कष्ट घेतले त्याग केला तेंव्हा कुठे ही चळवळ आज पर्यन्त आपणास दिसत आहे. आपण आपल्या सत्यशोधक चळवळीला महत्व देण्यासाठी किती त्याग करावा याबद्दल बहुजन लेनिन बाबू जगदेव प्रसाद म्हणतात,
“ यदि हमारे पडोस मे ब्रह्मामणवाद के विनाश के लिए विचारमंथन चल रहा है और तुम्हारे घर मे तुम्हारे बेटे की,लाश पडी है , तो सबसे पहले विचारमंथन मे भाग लो |बेटे की लाश बाद मे दफन कर देना, अन्यथा ब्रह्मामणवाद तुम्हारे करोडो बच्चोको दफन कर देगा |”
आता एवढा त्याग तर एखाद्या सामान्य माणसाला शक्य नाही. पण आपण निदान आपल्या काळात जे लोक हे काम करतात त्यांना सपोर्ट तरी केला पाहिजे. नाही तर आजकाल लोक म्हणतात आपल्याला काय करायचे आहे ? अशी नकारात्मक विचारसरणी ठेवणे योग्य नाही. आणि एका सर्वेनुसार तरुण पिढी ही जास्त काळ एखाद्या विषयावर चिंतन करू शकत नाही , स्थिर होऊ शकत नाही. याचे कारण मोबाइल आहे. मग अशा काळात एखाद्या विचारावर ठाम राहणे आणि विचार करणे फार दुर्मिळ बाब आहे. पुढील काळात येणार्या समस्या आणि प्रश्न यादृष्टीने विचार केला तर ही बाब खूप गंभीर आहे. आणि आपल्या पुरोगामी चळवळीसाठी जास्त घातक आहे. आजकाल तरुण पिढीला मोबाइलमुळे वेळ मिळत नाही आणि मग कोणती घटना सत्य आणि कोणती असत्य याच्या खोलात जाणे तर शक्यच नाही. तेंव्हा पुढील काळासाठी तरुण कसे तयार होतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. आज अनेक तरुणांना आपला इतिहास माहीत नाही ,आपल्यासाठी कोणी काय कार्य केले आहे ते माहीत नाही. कारण आजची पिढी वाचत नाही. एका ठिकाणी स्थिर होत नाही मग सत्यशोधन काय करणार ?सत्यशोधन करण्यासाठी पहिले तर तुम्हाला वाचन करावे लागेल , अनेक विचारवंतांना ऐकावे लागेल आणि मग त्यावर विचार करवा लागेल. आज आपल्या सामाजिक चळवळीचे सर्वात मोठे नुकसान या वाचन आणि चिंतन न करणार्या लोकांमुळेच झालेले आहे. पत्रकारिता क्षेत्रात असे अभ्यासू आणि मेहनती लोक आहेत की, त्यांना सलाम करावा असे वाटते. यात मला पहिले नांव निरंजन टकले सरांचे घ्यावे असे वाटते. या माणसाचा अभ्यास आणि समाजासाठीची तळमळ खूपच आहे. नंतर निखिल वागळे सर , संजय आवटे , हिंदीत रविश्कुमार आहेत या लोकांचे योगदान खूप मोठे आहे. आज अनेक प्रश्न ,समस्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत पण त्या सत्य स्वरुपात नेण्याचे काम हे लोक करीत आहेत मला वाटते. म्हणजे ही विचार परंपरा अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार सुरूवातीला कपिल –बळीवंश –चार्वाक –तथागत बुद्ध –महात्मा फुले आणि पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा या सत्यशोधक विचाराचा प्रवास आहे आणि आज आपण विचार केला तर खूप मोठी जबाबदारी आहे आजच्या सत्यशोधक पत्रकार बंधुची आहे आणि ते सर्व समर्थपणे पुढे नेत आहेत.
आता दोन दिवसापूर्वी मी एक पुस्तक वाचत होतो आणि वाचत असतांना असा विचार आला की, त्या पुस्तकाचा लेखक किती प्रामाणिक आहे. आणि वास्तविक कोणतेही पुस्तक वाचत असतांना आपण त्या लेखकाशी अप्रत्यक्ष संपर्क करीत असतो असा एक संकेत आहे. आणि मला वाटले की, असे अनेक लोक आहेत आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात पण ते सर्व एकत्र आले तर आपली पुरोगामी चळवळ जी आपल्या सर्व महापुरूषांना अपेक्षित होती ती फार वेगाने पुढे जाईल. आणि थोडा जास्त विचार केल्यावर असे वाटले की, आपले जीवन व्यर्थ आहे . आपण फार क्षुद्र गोष्टीसाठी धडपड करीत आहोत. खरे काम तर फार मोठे आणि वेगळे आहे . म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती आर्थिक प्रगतीसाठी फार धावत आहे. आणि अनेक लोक गैरमार्गाचा वापर करून जास्त पैसा मिळवत आहेत. पण हे फार मोठे काम नाही. आपली परंपरा काय आहे आणि आपला वारसा काय आहे ? आणि आपण काय करीत आहोत हे बघून समाजाची किळस वाटली. आणि खरे म्हणजे प्रामाणिक लोक आहेत त्यांनी एकत्र काम केले पाहिजे पण याला सुद्धा मर्यादा येतात. म्हणजे अनेक पुरोगामी लोक अनेक क्षेत्रात आहेत आणि दूर अंतरावर आहेत. पण त्यांचे उद्दीष्ट मात्र एकच आहे.
आज आपला समाज सत्यशोधक का होत नाही हा सुद्धा एक मूलभूत प्रश्न आहे. आणि त्याच्या मुळाशी आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की, ते आहे आपल्याला मिळणारे शिक्षण आणि त्यावर होणारा शासनाचा खर्च आहे आज आपण शिक्षणाचा उद्देश पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, आपण शिक्षण का घेतले पाहिजे याचा उद्देश राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात, “ बरं –वाईट समजण्याची क्षमता विकसित करणारं शिक्षण असावं. ज्या शिक्षणाने बरे काय ,वाईट काय हे समजत नसेल तर ते शिकलेले कसले हुकलेले म्हणावे लागतील.” म्हणजे आज जे पालक शिक्षणावर खर्च करतात पण त्यांचा उद्देश त्यांच्या पाल्याला इंजिनीअर ,डॉक्टर करण्यासाठी आहे त्यांना एक जबाबदार नागरिक तयार करणे हा नाही. आणि त्यामुळे आज आपला एखादा डॉक्टर किंवा इंजिनीअर ,प्राध्यापक असेल त्याला दोन पैसे मिळतात नौकरी –व्यवसाय करून पण चांगले काय आणि वाईट काय याची समज येत नाही हे सर्वात मोठे नुकसान आहे. मग महात्मा फुले यांचा शिक्षणाचा उद्देश सफल होत नाही. आणि त्यामुळे आपल्या देशाची जगात प्रतिमा गेली ,आपली अर्थव्यवस्था जगात कुठेच नाही आज तरुण बेरोजगार आहे ,आज सामान्य शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि देशात सर्व अस्थिरता आहे, सर्वत्र जात आणि धर्म यांचा संघर्ष चालू आहे, विकास कुठेच नाही पण तरीही सबका साथ सबका विकास म्हटले की, लोकांना खरे वाटते आणि यावर कहर म्हणजे आमचे अनेक विद्वान , पी,एचडी झालेले प्राध्यापक भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचे अंधभक्त आहेत ते म्हणतात जगात आपली प्रतिमा उंचावली आहे. आता हे का होत आहे तर त्याचे साधे उत्तर आहे त्यांना सत्य काय आणि असत्य काय याची जाणीव या आपल्या बाजारू शिक्षणाने दिली नाही. आणि आईवडील आणि समाज त्यांना एक जबाबदार नागरिक तयार करण्यास सक्षम नव्हते. आणि आपले विद्वान फक्त पदव्या घेऊन त्यांचे पोपट तयार झाले आहेत. आणि आपल्या बहुजन विद्वान लोकांना थोडया पदव्या आणि पुरस्कार दिले की, सर्व थंड होतात. आणि म्हणून आज भारतीय व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असू द्या पण त्याने सत्यशोधकी असले पाहिजे. हेच आज होत नाही. आज शिक्षण घेऊन पैसा , घर ,गाडया आल्या पण सामाजिक समज आली नाही. त्यामुळे याचा काहीच उपयोग नाही. आज आपला विद्वान बहुजन त्यांच्या ओंजळीने पाणी पीत आहे हेच तर मोठे दु:ख आहे आणि म्हणून महात्मा फुले पुढे म्हणतात की, “ नुसतं लिहणं –वाचणं चालतय पण जर तुम्ही त्यांना ज्ञानी बनवत असाल तर चालणार नाही , तुम्ही त्यांना लिहायला ,वाचायला शिकवा आमच्या बाजूने बोलणारे पोपट तयार करा, अशा वेळी ब्रह्मामण म्हणतील फार चांगलं चाललय ,तुम्हाला थोर विद्वान म्हणून मान्यता देतील , बक्षीस देतील ,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केलं जाईल , एखादवेळी कुलगुरू पदही दिलं जाईल. पण तुम्ही माणसांना तयार करीत असाल तर ते ब्रह्मामणाना मुळीच चालणार नाही.” आता हे का होत आहे तर याचे मूळ आहे आपल्या देशात यांचे वर्चस्व असले पाहिजे अशी यांच्या अनेक पिढयापासून तसे प्रयत्न चालू आहेत आणि ते त्यांच्या (भट)फायद्याचे आहे पण आपले नुकसान करणारे आहे. आणि समाजसत्यशोधकी होऊ नये म्हणून आपल्या बहुजन समाजाला अनेक काल्पनिक कथा आणि विधी,कर्मकांड सांगून मानसिक गुलाम केले आहे. आणि म्हणून महात्मा फुले भटापासून दूर रहा असे म्हणतात पण इतक्या वर्षात आता आपला बहुजन समाज आणि त्यात मोठा असणारा मराठा समाज आज 2024 ला म्हणत आहे की, “ यांना दक्षिणा देऊ नका.” पण आता त्याची सुरुवात केंव्हा होते दक्षिणा न देण्याची ते पहावे लागेल. हे तर आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी शिवधर्माची सुरुवात करतांना 2005 सालीच सांगितले होते पण आपल्याकडे सत्य लोकांना पचत आणि आणि पटत सुद्धा नाही. म्हणून त्यांचे कुणी ऐकले नाही. नाही तर आज निदान महाराष्ट्राचे तरी सामाजिक चित्र वेगळेच राहिले असते.
आज आपले शिक्षण क्षेत्र कमजोर केले जात आहे आणि त्यासाठी आपले बजेट कारणीभूत आहे. आता बजेट तयार करणारे कोण तर हेच आहेत. आणि आपले मंत्री मानसिक गुलाम असल्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत हे सचिव जे सांगतील तेच ऐकतात. यांच्यात विरोध करण्याची क्षमता नाही. त्याला सत्यशोधक लागतो आणि त्यासाठी आपले महापुरुष यांनी जे सांगितले आहे ते आपणास स्वीकारावे लागेल. या 2024 च्या बजेट मध्ये आपल्या शिक्षणावर 2.53 टक्के खर्च केला आहे आणि आपले राजर्षी शाहू महाराज जे आपल्या महाराष्ट्राला खूप उशिरा समजले त्यांनी त्यांच्या काळात 26 टक्के खर्च केला होता. आणि त्यामुळे त्याकाळात समाज सक्षम होता , सत्यशोधकी होता आज समाज सत्याच्या मुळाशी जात नाही. कारण लहान असतानाच त्यांना देव आणि धर्म ,स्वर्ग , नर्क अशा अनेक काल्पनिक बाबी सांगितल्या जातात आणि शिक्षण देणारे शिक्षक आज इतके कमजोर केले आहेत की,त्यांना दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही तर चार पुस्तके आणि विचार कधी वाचतील ? आणि हे सर्व जाणीवपूर्वक षड्यंत्र आहे. आज आपले महापुरुष शिक्षणातून बाद होत आहेत आणि नवीन शिक्षण धोरणात काल्पनिक बाबी समोर येत आहेत. आताचा एक विचारवंत म्हणतो की, “ जर एखाद्या देशाला बरबाद करायचे असेल तर त्यावर आक्रमण करू नका तर केवळ त्यांचे शिक्षण बरबाद करा की, देश बरबाद झालाच म्हणून समजा.” आणि इथे तर इतर देशातील लोकांची काय गरज आहे आपलेच हे काम प्रामाणिक करीत आहेत. आपलेच अनेक शिक्षण सम्राट तयार झाले आहेत आपल्याच अनेक पुढील पिढया बरबाद करण्यासाठी आणि त्यामुळेच राष्ट्रपिता ज्योतीराव फुले म्हणत होते “इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.” म्हणजे शिक्षण सर्व समाजाच्या प्रगतीचे मूळ आहे. त्यामुळे विकसित देश याकडे जास्त लक्ष देतात आणि भारत जास्त दुर्लक्ष करतो आहे. आणि आपले हे दुर्लक्ष एक दिवस आपल्याला अधोगतीच्या एका धोकादायक वळणावर नेणार आहे यात शंका नाही. समाज सत्यशोधकी होण्यासाठी प्रथम अट म्हणजे आपण आपल्या पुढील पिढीला चांगले शिक्षण दिले पाहिजे यातून अनेक विचारवंत , शास्त्रज्ञ आणि सर्व क्षेत्राला पुढे घेऊन जाणारे सामाजिक योद्धे तयार होतील आणि मग आपला देश खर्या अर्थाने महासत्ता होईल. पण देव आणि धर्माच्या नांवाने निवडणूक लढविली जात आहे आणि जिंकली सुद्धा जात आहे आज बहुजन तरुण धर्माच्या नशेत आहे यातून तो बाहेर आला पाहिजे. आज धार्मिक नाही तर महात्मा फुले यांचा सत्यशोधक झाला पाहिजे तरच आपल्या देशाला उज्ज्वल भविष्यकाळ आहे. पण समाज सुद्धा अशा धर्मांध लोकांना सपोर्ट करीत आहे ही एक मोठया धोक्याची घंटा आहे. पण तरुण यातून बाहेर पडेल अशी अशा आणि आत्मविश्वास मला वाटत आहे.
आज राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !
प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
नाशिक ( 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत