संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात नाराजी; सांगलीच्या जागेवरून तणाव उघड

सांगली : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस आणि उबाठा यांच्यामध्ये ताण तणाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
महाविकास आघाडीत काही जागांवरुन सुरु असलेला वाद आजही कायम आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत आणि प्रचाराचा आवाका वाढत आहे तसतसे वागण्या बोलण्यातून समज गैरसमज आणि तणाव वाढत चालले आहेत . ठाकरे गटाने सांगलीमधील जागेवर उमेदवार जाहीर केल्यापासून काँग्रेस आणि त्यांच्यात तणाव आहे. त्यातच संजय राऊत यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आलात तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय लढणार हे शिवसेनेचं धोरण आहे असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलं असून छोट्या कार्यकर्त्याप्रमाणे वागू नका असा सल्ला दिला आहे.
ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरु आहे. दरम्यान संजय राऊत यांनी सांगलीची जागा शिवसेनेची असून चंद्रहार पाटीलच लढणार आणि जिंकणार असल्याचा दावा आणि निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचं आहे अशी आठवण करुन देताना राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये असा टोला लगावला आहे.
“संजय राऊतांनी युतीच्या मर्यादा पाळाव्यात. एक ते दोन दिवसांत सांगलीचा विषय सामोपचाराने मिटवू. संजय राऊत हे मोठे नेते आहेत, त्यांनी छोट्या कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करु नये,” असा टीकावजा सल्ला नाना पटोल यांनी संजय राऊतांना दिला आहे.
“कोणत्याही परिस्थितीत देशात लोकशाहीविरोधात सरकार सत्तेत आलं नाही पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. यासाठी आम्ही काही परिणाम भोगावे लागले तरी तयार आहोत. अशा स्थितीत मोठ्या व्यक्तीने लहान कार्यकर्त्याप्रमाणे विधान करु नये,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत