“बुद्ध”; अर्थशास्त्राचे पितामह

ॲडम स्मिथ यांनी १७७६ मध्ये ‘राष्ट्राची संपत्ती’ (wealth of nation) हा ग्रंथ लिहिला. त्यामुळे त्यांना ‘आधुनिक अर्थशास्त्राचे जनक’ असे म्हणतात. आता एकदा जनक निर्धारित झाला की तो बदलता येत नाही. म्हणून बुद्धाला अर्थशास्त्राचे जनक न म्हणता पितामह म्हणायला हवे.
बुद्धाचे विचारांकडे धार्मिक चष्म्यातून पाहिले जात असल्यामुळे बुद्ध हा केवळ एक धर्म संस्थापक होता व तो धर्म आपला नसल्यामुळे त्याचा आपला काही संबंध नाही; अशी धारणा झालेली आहे.
नाही तर “बुद्ध” हा जगातील पहिला शिक्षण तज्ञ, पहिला अध्यापन शास्त्रज्ञ, पहिला मानसशास्त्रज्ञ, पहिला अर्थ शास्त्रज्ञ,…. सर्वच बाबतीत पहिला ठरला असता.
या ठिकाणी बुद्ध जगातील “पहिला अर्थ शास्त्रज्ञ” म्हणून विचार करूया.
धार्मिक तत्वज्ञान म्हटलं की ते आध्यात्मिक वगैरे असतं, असं समजलं जातं. पण बुद्धाने सर्व प्रकारच्या निराधार, काल्पनिक व तर्कहिन गोष्टींवर वेळ घालवण्याचे टाळले आहे. पारंपरिक दैवी संकल्पना, कर्मकांड इत्यादीचा त्याग करून मानवी मन, इच्छा, चिंता, भावना, आर्थिक प्रक्रिया कशा असतात; यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
वस्तूंचे उत्पादन, विनिमय आणि वापर करताना त्यांनी लाभदायक व हानीकारक या दोन्ही बाजूंचा विचार केला आहे. हा विचार त्यांनी त्यांच्या दुक्खमुक्तीच्या सिद्धांतात मांडला आहे.
मानवी कल्याण कशात आहे; हे सांगताना त्यांनी ‘मध्यम मार्ग’ सुचवला आहे. मानवी जीवनातील सर्व दु:खाचे कारण तृष्णा किंवा लोभ हे असून त्यांनी गरज आणि इच्छा (लोभ) यात फरक केला आहे. आजवर जगातील अर्थ शास्त्रज्ञांनी आर्थिक समस्यांचे विवेचन करतांना अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यावरच लक्ष केंद्रित केलेले आहे. पण गरज आणि इच्छा यांचा एकाच वेळी विचार करण्याचा प्रयत्न केला गेला नाही.
माणसाला भूक लागली तर त्याला पोट भरण्यासाठी काही तरी अन्न लागते. त्याला खरंच भूक लागली तर तो आपली भूक भागवण्यासाठी जे उपलब्ध मिळेल ते खाऊन आपली भूक भागवतो. त्यावेळी तो मला अमुकच हवं; असा हट्ट करीत नाही. ही आहे गरज. पण असा हट्ट करून वांच्छित पदार्थ खाण्याचा त्याचा हट्ट असेल तर ती त्याची गरज नसून इच्छा असते. तेथून समस्येला सुरुवात होते. यालाच बुद्धाने तृष्णा म्हटले आहे.
जगातील अर्थतज्ज्ञांनी गरजांची संख्या अमर्याद असल्याचे सांगितले आहे. पण अनंत असणाऱ्या या गरजा नव्हेत; त्या इच्छा आहेत. खरं म्हणजे सजीवांच्या नैसर्गिक गरजा मर्यादितच असतात. ज्या अमर्यादित असतात; त्या इच्छा होत. या अमर्यादित इच्छांना आधुनिक अर्थतज्ज्ञांनी गरजा म्हटल्यामुळे संपूर्ण अर्थशास्त्राची दिशाच बदलून गेली आहे.
इच्छा अमर्यादित असल्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी साधने कमी पडतात; म्हणून आर्थिक समस्या निर्माण होतात. अशा *गरजांचे नव्हे इच्छांचे आर्थिक दृष्टीने वर्गीकरण करण्याची आवश्यकता असते. आवश्यक, कमी आवश्यक आणि चैनीच्या इच्छा; असे तीन प्रकारात गरजांचे वर्गीकरण केले की; मग उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांच्या साह्याने त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांचा प्राधान्य क्रम लावला जातो.
वास्तवात गरजांचे कारण अज्ञात नसते पण इच्छा किंवा तृष्णेमुळे माणसाला त्याचे कारण कळत नाही. त्यामुळे तृष्णा हेच अज्ञानाचे व दुःखाचे कारण आहे; असे दिसून येते. विविध प्रकारच्या इच्छांमुळे माणसाच्या गरजा वाढत जातात आणि यातच माणूस गुरफटून जातो. असा विचार मांडून , बुद्धाने मानवी कल्याणाचा आर्थिक सिद्धांत मांडला आहे.
जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण असते. या तर्काच्या आधारे बुद्ध माणसाला विवेकवादाकडे नेतात. त्यासाठी त्यांनी “‘प्रतित्य समुत्पाद’’ हा सिद्धांत मांडला. विश्वातल्या प्रत्येक घटनेमागे कोणते तरी कारण असतेच; हा मुद्दा लक्षात घेऊन बुद्धाने दुःखाचे कारण शोधून काढले व त्यावर उपाय म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा सांगितला. तो पर्यंत “पूर्व जन्माच्या पापांचा परिणाम” हेच कारण सांगितले जात असे.
मानवी गरजा नैसर्गिक असल्या तरी आर्थिक समस्या निर्माण होण्यासाठी कोणते तरी कारण असते; याचा विचार धम्मपदाच्या तेविसाव्या भागामध्ये आढळतो. ‘भूक किंवा तहान लागली तर ती स्वप्रयत्नाने भागवावी लागते; हा निसर्गाचा नियम आहे. पण माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने केवळ आपल्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक गरजांचा विचार करून चालत नाही. समाजाचा किंवा देशाचा विचार सुद्धा करावा लागतो. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म होतो. मानवी इच्छा अमर्याद असल्यामुळे त्यांचे प्राधान्य क्रमाने वर्गीकरण करण्याचे तंत्र बुद्धाने सांगितले. इच्छा वाढत गेल्याने गरजा भागल्या तरी तृष्णा संपत नाही आणि त्यातून संचय करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते व समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय; अशी साधी सोपी व्याख्या आहे. असा आर्थिक दृष्टिकोन बुद्धाच्या अर्थशास्त्रात मिळतो.
जेव्हा माणूस समूहाने राहतो; तेव्हा निर्माण होणाऱ्या समस्या व्यक्तिगत वा कौटुंबिक न राहता त्यांचे स्वरूप सामाजिक बनते. म्हणूनच बुद्धाने व्यक्तिगत समस्ये बरोबर समाजाच्या समस्यांचा विचार करून संघाची संकल्पना मांडली. संघाची स्थापना करून सामूहिक प्रयत्नातून समाजाच्या गरजा व समस्या दूर कराव्यात; असे बुद्धाचे अर्थशास्त्र सांगते. “बुद्धाच्या आर्थिक व्यवस्थेचा विचार मानवी जीवनातील सहकारी आणि सुसंवादी प्रयत्नांच्या विकासाचा पाया आहे. स्वत:चा विकास करून आत्मनिर्भरता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यास बुद्धाचा विचार उपयुक्त आहे.” असा बुद्धाच्या अर्थशास्त्राविषयी चा विचार श्रीलंकेच्या अर्थतज्ञ नेव्हल करुणातिलके मांडतात. इ.स. १९७२ पासून भूतानचा राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक आणि त्यांच्या सरकारने बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित ‘’ सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांक ’’ ही संकल्पना स्वीकारून त्याचा देशाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी उपयोग केला. अमेरिकेतील क्लेअर ब्राउन या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेने सुद्धा बुद्धाच्या या मानवी विकासाच्या आर्थिक विचारांना अर्थव्यवस्थेच्या चौकटीत बसवून पर्यावरणाचे संरक्षण व उच्च दर्जाचे समाज जीवन कसे असावे; यासाठी बुद्धाच्या मध्यम मार्गास महत्त्व दिले. इतकेच नव्हे तर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी देखील व्यक्तीचा व राष्ट्राचा विकास करण्यासाठी बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावरून बुद्धाचे अर्थशास्त्र हे वैज्ञानिक ज्ञानाच्या चौकटीवर आधारलेले असून वैयक्तिक, सामाजिक आणि पर्यावरणीय क्षमतेच्या सामान्य उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी बुद्धाचे अर्थशास्त्र मार्गदर्शन करते; असे म्हणता येईल. मानवाच्या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी बुद्धाचे अर्थशास्त्र उपयुक्त असून त्याचा आर्थिक दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. कारण पाश्चात्त्य आर्थिक विचार भौतिक साधन संपत्तीला अधिक महत्त्व देते. परंतु भौतिक संपत्ती लालसा व इच्छेला उत्तेजन देते त्यामुळे लोक आपल्या गरजा व इच्छा पूर्ण करण्यासाठी, भरपूर पैसा मिळविण्यासाठी संपूर्ण जीवनभर धडपडत असतात. परंतु बौद्ध अर्थशास्त्रात यालाच दु:खाचे कारण म्हटले आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी इतर भौतिकवादी इच्छा कमी करणे आवश्यक आहे. लोक निरर्थक इच्छेचा पाठपुरावा करतात.
भांडवलवादी आर्थिक विचारांनुसार उद्योजक, व्यापारी, विक्रेता जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्यात उपभोक्ता वा ग्राहकाचे हित, कल्याण नसते. परंतु बौद्ध अर्थशास्त्रानुसार अहिंसा या तत्त्वावर आधारित बाजाराची रचना असावी. यामध्ये व्यापारी, विक्रेत्यांसोबत ग्राहकांचेही हित साधण्यावर भर दिला जातो. म्हणजेच इच्छेची तीव्रता कमी करण्याचा विचार बौद्ध अर्थशास्त्र सांगते.
बुद्धाच्या आर्थिक विचारसरणी नुसार अधिकाधिक समाधान मिळविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना कष्टाची तीव्रता वाढत जाते. परंतु इच्छांची तीव्रता कमी असल्यास पर्याप्त समाधान प्राप्त होऊ शकते. आयात-निर्यातीमुळे खुली अर्थव्यवस्था स्वीकारणे हे आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण आहे; मात्र भौतिक वस्तूंचा उपयोग मर्यादित ठेवला, तर देशातच स्थानिक आवश्यक वस्तू निर्माण करून विदेशी वस्तू वर अवलंबून रहावे लागणार नाही.
देशातील संपत्तीचे असमान वितरण हे सुद्धा बुद्धाच्या आर्थिक विचारप्रणालीत बसत नाही. नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकी वापर करून मानवाचे आर्थिक शोषण केल्याने माणसात हिंसात्मक प्रवृत्ती निर्माण होते. परिणामत: देशाच्या सुरक्षेसाठी संरक्षणावरील खर्च वाढतो. त्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त उपयोग करण्याचा सल्ला बुद्धाच्या अर्थशास्त्रात आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आठ सम्यक मार्गांचा उल्लेख आहे. या सम्यक आठ मार्गांने जीवन जगणे म्हणजे; बौद्ध अर्थशास्त्राचा स्वीकार केल्यास संपूर्ण जगातील प्रत्येक देशाचा व प्रत्येक व्यक्तीचा हमखास विकास होऊ शकतो. यात शंका नसावी. याच दृष्टीने सम्राट अशोकाचे साम्राज्य हे लोक कल्याणकारी समजले जाते. समृद्धी, सौख्य, समाधान नांदत असल्यामुळे या देशाला “सोनेकी चिडिया” असे संबोधले जात असे. या आर्थिक धोरणांतर्गत सार्वजनिक बांधकाम, रुग्णालये, वसतीगृहे, उद्याने, विश्राम गृह व निसर्गाचे जतन केले जात होते. त्यामुळे संपूर्ण जगात जम्बुद्विप प्रसिद्ध होता.
व्यक्ती जेव्हा जास्तीत जास्त भौतिक सुखाच्या मागे धावते तेव्हा तिला पुरेसे समाधान कधीच मिळत नाही. उलट अनेक आर्थिक प्रश्न निर्माण होतात व दुःखाचे प्रमाण वाढते. भौतिक सुखासाठी विविध वस्तूंचा उपभोग घेणे आवश्यक असते. म्हणजेच एक प्रकारे वासनांच्या आहारी जाणे होय. अशा प्रकारे वासनांमधून मिळणारे समाधान हानिकारक असू शकते. त्यामुळे खऱ्या सुख समाधानाचा त्याग करावा लागतो. म्हणून स्वत:च्या गरजा पूर्ण करताना इतर घटकांना (मनुष्य, पशू, पक्षी, सजीव आणि निसर्ग) हानी पोहोचणार नाही; हे मूळ तत्व लक्षात घेऊन सम्यक मार्गाने आयुष्य जगणे आवश्यक आहे. यालाच ” सम्यक आजीविका “ म्हटलेले आहे.
संदर्भ :
- Shumekar E. F., Bauddh Economics, Asia : A Handbook, 1955.
- Gote Prof.Dr. Bhimrao, “Gautam Buddha’s Theory for solution of Economic Problems in the world”, International Seminar, PGTD Pali-Prakrit, R.T.M. Nagpur University-2014.
- Brown, Clair, Buddhist Economics : An Enlightened Approach to the Dismal Science, UK, 2017.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत