भगवान बुद्धांची शिकवण – भाग ८७

अहिंसा तत्त्वाचे टीकाकार
अहिंसा तत्त्वाला ज्यांचा विरोध होता असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे होते की, त्यामुळे पापाचा अप्रतिकार व शरणागती पत्करावी लागते.
तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्त्वाचा हा पूर्ण विपर्यास होता.
संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे.
ह्यापैकी पहिला उल्लेखनीय प्रसंग म्हणजे सैनिकाला प्रवेश देण्याबाबत नियम केला होता.
एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरु झाले, तेव्हा मगधनरेश सेनीय बिंबिसाराने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की, “जा, आपल्या सेनाधिकाऱ्यांना सांगा की, सीमाप्रदेशातील बंडखोरांना शोधून काढा. त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या.” सेनापतीने तसे केले.
सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो, ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात, अशी तथागतांची शिकवण होती हे त्यांना माहीत होते. याउलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निःपात करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशी ते विचार करु लागले.
सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की, जर आपण तथागतांच्या भिक्खूसंघात प्रवेश केला तर ह्या समस्येतून आपली सुटका होईल.
त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूकडे गेले आणि त्यांनी प्रवज्येची याचना केली. भिक्खूंनी त्यांना प्रव्रज्या व उपसंपदा दिली. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, “सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत हे कसे काय?”
“सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूंची धम्मवृत्ती अंगिकारली,” सैनिकांनी उत्तर दिले.
हे ऐकून सेनापती संतप्त झाला, “राजसैनिकांना भिक्खू प्रवज्या कशी देऊ शकतात?”
सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, “महाशय, राजसेवेतील लोकांना प्रव्रज्या देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा.”
“महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा. कम्मवाचा म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि इतर संघसदस्यांच्या अर्ध्या बरगड्या तोडून टाकाव्या.”
नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा गेला आणि त्यांना अभिवादन करुन सर्व हकीकत कथन केली.
“तथागत, आपणास ज्ञात आहे की, कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठीसुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध आहेत. जर त्यांना आढळले की, सैन्य सोडून सदस्य बनविण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करत आहेत तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे.”
तथागतांनी उत्तर दिले, “सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या अवगुंठनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता.”
त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले. “भिक्खूहो, राजसेवेतील लोकांना प्रव्रज्या देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रव्रज्या देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल.”
दुसऱ्या एका वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबत तथागतांशी वादविवाद केला.
सिंहाने विचारले, “तथागतांच्या तत्त्वाबद्दल माझ्या मनात अजून एक आशंका आहे. तथागत सांगतात तो धम्म मला यथातथ्य समजावा म्हणून माझ्या मनावरचे अभ्रपटल दूर करण्यास तथागत अनुमती देतील काय?”
तथागतांनी अनुमती देताच सिंह म्हणाले, “तथागत, मी एक सैनिक आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळप्रसंगी युद्धाची कार्यवाही करावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. दुःखिताबद्दल करुणा आणि असीमीत दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपली घरे, बायकामुले व चीजवस्तू ह्यांचे रक्षण करण्यासाठी युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की, जेणेकरुन अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी मी सहन करावे? आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे? तसेच सर्व संघर्ष, मग ते न्याय्य कारणासाठी असले तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय?”
तथागतांनी उत्तर दिले, “जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे. आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ मिळालाच पाहिजे. ह्याबरोबरच कोणत्याही प्राणिमात्राला अपाय करु नये. उलट त्यांना प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्परविरोधी नाहीत. कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे त्याला न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्याच कुकर्माची परिणती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो, तेव्हा त्याच्या ह्रदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांत सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपले कर्म शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल.”
ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे प्रत्ययास येईल की, तथागतांनी शिकवलेली अहिंसा मुलभूत होती, पण ती निरपेक्ष नव्हती.
त्यांची शिकवण होती की, चांगल्या गोष्टीची परतफेड करुन पापावर उपचार करावा. पण चांगल्या गोष्टींना निर्बल करण्यास पापाला सवड द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते.
ते अहिंसेचे समर्थक होते. ते हिंसेचे निंदक होते. पण पाप चांगल्या गोष्टीचा नाश करीत असताना ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल हे त्यांनी अमान्य केले नव्हते.
ह्यावरुन तथागतांनी एखाद्या भयंकर तत्त्वाची शिकवण दिली नव्हती, हे समजून येईल. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.९.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड सहावा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत