देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

मी कांग्रेस सरकारात का सामील झालो -डॉ. बाबासाहेब म्हणतात..

आपल्या वर्गसमूहाचे, समाजाचे राजकारण प्रसंगानुरूप कसे असावे याबाबत बाबासाहेबांचे महत्वपूर्ण विचार !


संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब म्हणतात,

  • मी कांग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे माझ्या अनुयायांपैकी कित्येकांची परिस्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यांच्या मनातील किंतू नाहीसा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
  • १९४६ साली ‘शेड्युल्ड कास्टस फेडरेशनने’ प्राथमिक निवडणूकी जिंकल्या होत्या व विरोधकांना भुईसपाट केल्यामुळे फेडरेशनचे प्रातिनिधिक स्वरुप प्रस्थापित झाले होते. परंतु नंतर ब्रिटिशांनी आपले पूर्वीचे वचन न पाळता हिंदू, मुसलमान व शीख ह्यांचेच हाती सत्ता सोपविण्याचे ठरविले.
  • आपल्या राजकीय लढ्यातील तो अत्यंत चमत्कारिक काळ होता. सर्वत्र काळोख पसरला होता व आपल्याला आशेचा एकही किरण दिसत नव्हता. जमातीची फार मोठी जबाबदारी माझे शिरावर होती. अशा वेळी माझे मलाच कळत नव्हते. अशा परिस्थितीत कोणत्याही मार्गाने त्यांना नेण्यास मी तयार नव्हतो. परिस्थितीचे योग्य आकलन होईपर्यंत वाट पाहण्याचे मी ठरविले.
  • २५ वर्षे कांग्रेस बरोबर लढा दिलात आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण तुम्ही का स्वीकारलेत असा प्रश्न मला विचारण्यात येतो. नेहमीच लढ्याचे तंत्र उपयोगी पडत नाही. कित्येक वेळा दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणेही आवश्यक असते. ब्रिटिशांनी आपल्याला धोका दिला. आपल्यामध्येही कित्येक फितूर होतेच. एवढ्या मोठ्या प्रचंड संस्थेविरुध्द लढत देणे त्यावेळी योग्य ठरले नसते. त्याच्यानंतर तडजोडीचा मार्ग शिल्लक उरतो. त्यादृष्टिने आपल्याला बरेच हक्क प्राप्त झाले आहेत. आपल्याला पाहिजे होते तेवढे जरी आपल्या पदरात पडले नसले तरीही आपण पुष्कळच गोष्टी साध्य करु शकलो.
  • आपल्याला विधिमंडळातून व नोकऱ्यातून राखीव जागा मिळाल्या आहेत व आपल्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करण्यात आली. इतर अन्य अल्पसंख्यांकानाही ती गोष्ट साध्य करता न आल्यामुळे आपल्याला त्याबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कांग्रेसबरोबर लढा पुकारण्याची ही वेळ नव्हे. सहकार्य आणि समझौता या मार्गानेच आपण मिळेल तेवढे हस्तगत केले पाहिजे.
  • मी मध्यवर्ती/केन्द्र सरकार मध्ये गेलो असलो तरी कांग्रेसचा सभासद झालो नाही. तसा माझा विचारही नाही. मध्यवर्ती सरकारात येण्याबद्दल मला कांग्रेसकडून आमंत्रिण्यात आले व मीही कांग्रेस सरकारमध्ये विनावट प्रवेश केला.
  • मी दगडासारखा घट्ट असल्यामुळे पाण्यात विरघळण्याची मला मुळीच भीती नाही. परंतु तुमची स्थिती मात्र वेगळी आहे. पाण्यात पडलेल्या ढेकळासारखे तुम्ही विरुन जाल. तेथे राहणे निरुपयोगी आहे असे मला वाटले तर मी केव्हाही बाहेर पडेल.
  • निरनिराळ्या प्रश्नावरुन माझ्या काही अनुयायांनी मजवर केलेल्या टीकांना उत्तर म्हणून हे मुद्दे मांडले.

पहिला मुद्दा असा : त्रिमंत्री शिष्टमंडळाच्या प्रयाणापासून मी मुग्धता स्वीकारावी याचे कारण काय ?

दुसरा मुद्दा असा : मी कांग्रेस सरकारात का सामील झालो ?

आणि तिसरा मुद्दा : भविष्यकाळात मी काय करायचे ठरविले आहे?

  • पहिल्यास उत्तर म्हणून मी म्हणालो की अमात्य त्रयीकडे शेड्यूल्ड कास्टस फेडरेशनने स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. आमची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. याला दोन कारणे होती. (१) मुस्लिमांच्या व शिखांच्या मानाने आपला पक्ष कमकुवत होता. (२) आमच्यामध्येच फाटाफूट होती. बरेच पंचमस्तंभी लोक भरले होते.
  • अमात्य मंडळाच्या निर्णयाने दलित वर्गांना काही वेगळे राजकीय अस्तित्वच नाही, असे ठरल्यासारखे झाले. बरे, राजकीय संरक्षण नाही म्हणजे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने सर्वनाशच ओढवून घेतल्यासारखे आहे असेही मला वाटले. माझ्यापुढे अथांग अंधकार पसरला. मी तेव्हापासून कोणतेही निवेदन केले नाही. मुग्धता स्वीकारली त्याचे कारण असे आहे.
  • दुसऱ्या मुद्द्याबाबत बोलावयाचे तर मी कांग्रेसचा विरोधक व टीकाकार होतो. हे खरे. परंतु त्याचबरोबर केवळ विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नव्हते. सहकार्याने जर आपला लाभ होत असेल तर सहकार्याच्याच भावनेने वागले पाहिजे. म्हणूनच मी कांग्रेसशी सहकार्य केले. घटनेत जे काही संरक्षण आम्हाला मिळाले ते अशा सहकार्याअभावी मिळविता आले नसते. माझ्या विधानाला पूरक अशी काही उदाहरणे मी या अनुषंगाने दिली.
  • मी मंत्रिमंडळात का सामील झालो, त्याचा खुलासा करताना मी पुढील दोन कारणे विशद केली. एक, मंत्रीमंडळात येण्यापूर्वी मला दिलेले आमंत्रण बिनशर्त होते व दोन, बाहेर राहण्यापेक्षा सरकारात जाऊन अस्पृश्यांच्या हितसंबंधीचे रक्षण करणे जास्त सुलभ होते.
  • मी माझ्या भाषणात सांगीतले की पूर्वग्रहदूषित असे वाईट कायदे आपल्याविरुध्द होतील, याची भीती दलित वर्गांनी बाळगू नये. त्यांनी भ्यावयास हवे ते वाईट कारभाराला. दलित वर्गांचे लोक या कारभारात नसल्यानेच हा कारभार दूषित होतो. सवर्ण अधिकारी ह्या कारभारात भरले असल्याने राजवटीला दलित वर्गाविषयी सहानुभूती नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी सरकारात सामील झालो.

अस्पृश्यांचे मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संदर्भ :

१) संयुक्त प्रांत शे.का.फे.चे ५ वे अधिवेशन, लखनौ, ता.२४ व २५ एप्रिल १९४८

२) जनता, दिनांक ८ मे १९४८.

टीप : बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षास जन्मास घालून देण्यापूर्वीचा, शे.का.फे (Scheduled Castes Federation) हा आपला तत्कालीन राजकीय पक्ष होता.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!