भारतीय संविधानाची सर्वसमावेशकता — डॉ. अनंत दा. राऊत

लेख क्र.५
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीयांनी स्वनिर्मित संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण केले. इथून पुढे आम्ही आता संविधानातील विचारांनुसार आमच्या राष्ट्रजीवनाची वाटचाल करणार असा निश्चय समग्र भारतीय जनतेने केला. संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना सार्वभौमत्व दिले, म्हणजेच देशाचे भविष्य कसे घडवायचे ? देशाच्या सत्तेवर कुणाला बसवायचे? देशाचा विकास कसा घडवून आणायचा, देशात कोणत्या स्वरूपाची समाजरचना निर्माण करायची, कोणती जीवनमूल्ये जनमानसात रूजवायची हे सर्व ठरवण्याचा अंतिम अधिकार या संविधानाने समग्र भारतीय नागरिकांना दिला. म्हणूनच या वेळेपासून भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. प्रजासत्ताक राष्ट्रात अंतिम सत्ता ही समग्र जनतेची असते. ती कुणा तथाकथित श्रेष्ठ वंशात जन्मलेल्या राजाची, राजपुत्राची, अवताराची किंवा कुठल्याही एका गटाची नसते. भारतीय प्रजासत्ताक कोणत्याही धर्म, वंश, पंथ, जात वगैरेसारख्या घटकाला वेगळे महत्त्व देत नाही. इथे माणसाचा विचार केवळ माणूस म्हणून केलेला आहे. धर्म, वंश, पंथ अथवा जातीच्या निकषानुसार संविधान या देशातील कोणत्याही माणसाला श्रेष्ठ अथवा कनिष्ठ मानत नाही. तर प्रत्येक माणसाला माणून म्हणून सन्मानाने जगता आले पाहिजे, सर्व माणसांचा सर्वांनी आदर केला पाहिजे ही संविधानाची मानवकेंद्रित अशी वैचारिक भूमिका आहे. भारतातील एखाद्या विशिष्ट गटातटाचे नाही, तर समग्र भारतीयांचेच कल्याण झाले पाहिजे अशी भूमिका आपले संविधान घेते. म्हणून हे समग्र भारतीयांचे सर्वसमावेशक संविधान आहे.
आपले संविधान निर्माण होण्यापूर्वी आपल्या देशात व जगात धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असे अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्या त्या स्थळ, काळाला त्या ग्रंथांनी मार्गदर्शन केले, विचारही दिले. कोणत्याही काळातील माणसांच्या उदात्त विचारशक्तीमधून होणारी ग्रंथनिर्मिती समाजमन व समाजजीवन विकसित करण्यास मदतच करीत असते म्हणून मानवी इतिहासकाळातील ज्या ज्या ग्रंथांनी व्यापक भूमिका घेऊन मानवी कल्याणाचा विचार मांडला त्या ग्रंथांबद्दल व ग्रंथकर्त्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली पाहिजे. जागतिक पातळीवर इतिहासाच्या विविध टप्प्यांवर मानवी कल्याणाच्या विचारांचा वारसा जो विकसित होत गेला त्या वारशाला वाट पुसतच माणून अधिकाधिक पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो. मानवाच्या वैचारिक विकासाच्या विविध टप्प्यांचा आपण वेध घेतला तर वरचेवर माणूस वैचारिक दृष्टया अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेला आहे हेच आपल्या लक्षात येईल.
धर्म व धर्मग्रंथांचा जनमानसावरील प्रचंड प्रभाव हे एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक व वर्तमानकालीन वास्तव आहे. म्हणून धर्म व धर्मग्रंथांनी समाजधारणेसाठी दिलेल्या विचारांचे योगदान आधी आपण मान्यच केले पाहिजे. परंतु त्याचबरोबर नंतरच्या काळात धर्मामध्ये घुसलेल्या विविध दुष्प्रवृत्तींनी समाजाचे खूप मोठे नुकसान केले, हेही आपणाला लक्षात घ्यावे लागेल. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळून येतात की देव, धर्म व धर्मग्रंथाचे हत्यार समाजाच्या शोषणासाठीही स्वार्थी प्रवृत्तींनी कौशल्याने वापरलेले दिसते. म्हणून कोणताही धर्म विशुध्द असे कल्याणकारक विचार देणारा राहिला नाही तर त्याला बहुतांशी कर्मकांडी रूप प्राप्त झाले. असे कर्मकांडी धर्म मानवी बुध्दीच्या विकासातील खूप मोठा अडसर ठरले.
आपल्या देशातल्या व जगातल्या कोणत्याही एकाच एका धमनि किंवा धर्मग्रंथाने भारतातल्या किंवा जगातल्या समग्र जनतेच्या मनाची कधीही पकड घेतलेली नाही. म्हणूनच कोणताही धर्म ही त्या स्थळ, काळ परिस्थितीचे आपत्यच असते. असे असले तरी प्रत्येक धर्मसंस्थापकाने स्वश्रेष्ठत्वाचा डांगोरा कंठरवाने पिटलेला आहे. माझा धर्मच सत्य आहे, तोच अंतिम आहे. तोच जगाचे कल्याण करू शकतो असा अंहकार सर्वानी कायम बाळगलेला आहे.जगातल्या जवळपास सर्व धर्मांनी स्वश्रेष्ठत्व समाजावर लादण्यासाठी अलौकिक अशा कल्पनेचा आधार घेतलेला आहे. म्हणून प्रत्येक धर्मनिर्माता किंवा कथनकर्ता मी जे सांगतो आहे, ते माझे स्वतःचे आहे असे म्हणून सांगत नाही, मी एक माणूस आहे, असे म्हणून सांगत नाही, तर मी ईश्वराचा दूत आहे, पुत्र आहे किंवा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे, अशी पोज घेवून प्रत्येक धर्मकत्याने स्वधर्माचे कथन केलेले आहे. यावरून हे स्पष्टपणे लक्षात येते की मी हे माणूस म्हणून लोकांना सांगितले तर लोक माझे ऐकणार नाहीत, हा प्रत्येक धर्मसंस्थापकाला स्वतःबद्दलचा न्यूनगंड होता. म्हणूनच प्रत्येकाने अलौकिक शक्तीचा आधार घेतला. प्रत्येक जण तिचा दूत, पुत्र किंवा अवतार झाला या अलौकिक शक्तीचा आधारच, धर्मकल्पनेच्या जनमानसावरील प्रचंड मोठ्या प्रभावाचे कारण आहे. पंरतु असा प्रभाव घेऊन जगणाऱ्या जनतेची बौध्दिक आणि नैतिक शक्ती नीटपणे विकसित होत नसते असेच म्हणावे लागते.
विविध धर्मग्रंथांचा प्रभाव जनमानसावर असला तरी भारतातील कोणताही एक धर्मग्रंथ समग्र भारतीय जनतेवर प्रभाव गाजवू शकला नाही. म्हणजेच या देशातील कोणताही धर्मग्रंथ सर्वमान्य नाही. कोणताही धर्मग्रंथ समग्र भारतीयांचा नाही तर या देशातले वेगवेगळे समाजगट वेगवेगळ्या धर्मग्रंथांना आपला श्रध्देय ग्रंथ मानतात. याचाच अर्थ भारतातील कोणत्याही धर्मग्रंथामध्ये समग्र भारतीय जनतेच्या मनाला साद घालण्याचे सामर्थ्य नाही. कुराण फक्त मुस्लिम मनाला साद घालू शकते, बायबल ख्रिश्चनांना साद घालू शकते, वेदांनी समग्र हिंदूंना साद घालण्याचा प्रश्नच नाही. कारण बहुसंख्य हिंदूंना वेद ऐकण्याची, वाचण्याची व बोलण्याची बंदीच होती. विविध स्मृत्याही समग्र हिंदूंना साद घालू शकलेल्या नाहीत. समग्र हिंदूंना साद घालणारा, समग्र हिंदूंना आपला वाटणारा एकही धर्मग्रंथ हिंदूंच्याकडे नाही, असे असले तरी या संदर्भातील एक वास्तवही नोंदवले पाहिजे की हिंदू पुराणांचा व रामायण, महाभारतादी महाकाव्यांचा बहुतांश हिंदू जनमानसावर खूप मोठा प्रभाव आहे. त्या प्रभावाला त्यातील रंजन, अतिशोक्ती, काव्यात्मकता व अलौकिक कल्पनांचा वापर कारणीभूत आहे.
मुख्य मुद्दा हा की समग्र भारतीय जनमानसाला कवटाळणारा, समग्र भारतीयांच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेणारा समग्र जणांचे कल्याण करण्याचा ध्येयवाद बाळगून त्या दिशेने भक्कम पावले टाकणारा एकही ग्रंथ भारतीय संविधानापूर्वी लिहिला गेला नाही. परंतु भारताचे संविधान मात्र भारतातील समग्र नागरिकांना स्वतःच्या प्रेमबाहूमध्ये कवटाळते. समग्रजणांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठीची राज्य यंत्रणा उभी करते.
संविधानाने कुठल्याही अवास्तव, अलौकिक कल्पनांचा आधार घेतला नाही तर ते वास्तवावर आधारलेले आहे. संविधान हे व्यापक अशी राष्ट्रहितैशी दृष्टी असलेल्या विचावंतांनी व राष्ट्रीय नेत्यांनी निर्माण केलेले आहे. या विचारवंत व राष्ट्रीय नेत्यांनी हे संविधान कुठल्या दैवी साक्षात्कारातून लिहिलेले नाही तर जीवनाच्या सखोल व व्यापक अनुभवातून, अध्ययनातून व समग्र मानवी कल्याणाचा वास्तवाधिष्ठित असा उदात्त ध्येयवाद बाळगून लिहिलेले आहे. जगात जिथे जिथे बुध्दिवादाच्या कसोटीवर टिकणारा समग्र मानवी कल्याणाचा विचार दिसतो तो तो विचार या संविधानाने स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर भारताच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय जनमानसिकतेचे वास्तवाधिष्ठित आकलन करून समग्र भारतीय समाजाला अधिकाधिक उपकारक ठरणारा विचार देण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाने केलेला आहे. म्हणजेच भारतातील सर्व गटातटांच्या इच्छा आकांक्षाचा विचार, संकुचित विचारांना नकार, अंधश्रध्दांना नकार, तोडणाऱ्या विचारापेक्षा जोडणाऱ्या विचारांवर भर, एका गटातटाच्या कल्याणापेक्षा समग्र जणांच्या कल्याणाचा विचार, दुर्बल घटक दुर्बल न राहता तेही सबल झाले पाहिजेत आणि त्या घटकांच्या सबलीकरणाचे नियोजन केले पाहिजे हा विचार संविधानाच्या केंद्रस्थानी आहे. सर्वजणकल्याणातून राष्ट्रकल्याण ही भारतीय संविधानाची भूमिका आहे. म्हणूनच भारतीय संविधान हा आजवरच्या ग्रंथांमधील व्यापक व सखोल आवाहनक्षमता असलेला सर्वश्रेष्ठ असा राष्ट्र ग्रंथ आहे. संविधान हा केवळ कायद्याचा ग्रंथ नाही, राजकीय, सामाजिक व आर्थिक भूमिका मांडणारा ग्रंथच नाही तर तो भारत या राष्ट्राची सर्व अंगांनी निर्माणक्षम व कल्याणकारक अशी पुनर्मांडणी करू पाहणारा भारताचा सर्वसमावेशक राष्ट्र ग्रंथ आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत