महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसी समाजकारणात जय भीम आणि बुद्ध यांची गरज काय?(विनोद कोळी एक टीकाकार ..)

राजाराम पाटील.

जय भीम आणि बुद्ध या शब्दांची भीती हिंदुत्ववादी लोकांना वाटते.
त्याचबरोबर उच्चवर्णीय लोकांच्या मनात बसलेला अस्पृस्यतेचा विचार त्यांनी हिंदू मानसिकतेच्या ओबीसींमध्ये देखील खोलवर रुजवला आहे.
ओबीसी जातीमध्ये काम करणाऱ्या सामान्य समाजसेवकाना जेव्हा ते मनुवादी व्यवस्थेच्या रडारवर येतात ,तेव्हा त्यांच्या तोंडी जय भीम किंवा बुद्ध फुले शाहू आबेडकर असतील? तर असे प्रश्न सर्रास विचारले जातात.तुमच्या समाजसेवेचा आम्हास अभिमान वाटतो ,परंतु हिंदू धर्मात ब्राह्मणी मेंदूत न बसणारे हे शब्द बोलून ,तुम्ही हिंदूंची नाराजी का ओढवता ?अशी आमच्या अनेक आगरी कोळी ओबीसी मित्रांची काळजीवाहू विनंती आहे.

मागच्या सात दिवसात लोकनेते दि बा पाटील आणि ओबीसी चळवळी संदर्भात सातत्याने लेख लिहिल्यानंतर आगरी कोळी कराडी फेसबुकवर ही विनोद कोळी या मनुवादी मानसिकतेच्या ओबीसी मित्राची माझ्यावर जाहीर टीका होती.
ते म्हणतात “समाजसेवेसाठी राजाराम पाटील यांना जय भीम आणि बुद्ध हे शब्द वापरण्याची गरज काय”?त्याच्यापासून लोकांनी सावध रहावे.
उच्चवर्णीयांच्या छळाला कंटाळून मागासवर्गीय, मेले तरी चालतील !परंतु त्यांनी धर्मांतर करू नये.
भाजप संघपरिवार यांनी हिंदुत्वाचा ठेका घेतल्याप्रमाणे ते हिंदू धर्मांतर आणि” लव्ह जिहाद” यांची काळजी हिंदूंच्या जगण्याच्या प्रश्ना पेक्षा अधिक करतात.

रक्तदान शिबिर,मोफत धान्य वाटप,साडी वाटप,हळदी कुंकू समारंभ,शिर्डी दिंडी,रस्ते सफाई या समाजसेवा हिंदुत्व वादी लोकांच्या कल्पनेत मान्यता प्राप्त सेवा आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फोटो लावून प्रबोधनपर भाषण केले ,तर या ब्राह्मणी हिंदुत्ववादी लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
परंतु या जयंती सोहळ्यास महाआरती ,हनुमान चालीसा ,सत्यनारायण पूजा घालून साजरी करण्यात त्यांची हरकत नसते.अर्थात कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायचे ?कशावर टीका करायची? याची मुस्लिम मौलवी प्रमाणे “फतवा” पद्धत हिंदू वैदिक लोकांत देखील आहे.
यामुळेच दोन्ही धर्मात स्वतन्त्र मतांचा विचारप्रवाह थांबून ,तेथे धर्मांची डबकी होऊन, त्यांना हुकूमशाहीचा दुर्गंन्ध सुटू लागलाय.

विचार आणि आचरणाचे स्वातंत्र्य देणारे भारतीय संविधान या ब्राह्मणी पुरोहित शाहीने लोकांपासून दूर ठेवले आहे.
दररोजच्या जीवन संघर्षातून प्रबोधन करणे,लोकांचे प्रश्न सोडविणे,प्रत्यक्ष स्थळाला भेट देणे.
सरकारी कार्यालये कोर्ट पोलीस स्टेशन येथे जाणे, सामान्य कार्यकर्त्याला अवघड काम आहे.
या कामासाठी पैसा कुठून आणायचा ?हाही एक मोठा प्रश्न आहे.

आमदार, मंत्री ,उद्योजक झालेल्या लोकांनी आपल्या जवळील लाखो नव्हे शंभर दीडशे कोटी रुपयातून दोनशे किलो धान्य वाटप करून त्याची जाहिरात इलेक्ट्रॉनिक मीडियात करणे सोपे आहे.
परंतु नोकरीस नसणाऱ्या आणि नियमित व्यवसाय करणे शक्य नसलेल्या समाज कारणात आणि निवडणूक हरण्याच्या राजकारणात जगणे अवघड आहे.
हे दिव्य रोज पार पाडणारे पत्रकार,राजकीय कार्यकर्ते,धार्मिक प्रबोधनकार हे फार महत्वाचे काम लोकशाहीच्या भल्यासाठी नेहमीच करीत आहेत.
त्यांना मी मानाचा जय भीम आणि नमो बुद्धाय करतो.

एका रुपयाच्या फायद्याची आशा नसलेले आणि शंभर रुपयाचे कर्ज रोज डोक्यावर उभे करणारे हे प्रबोधनाचे काम करावे का?
असा प्रश्न पडतो तेव्हा, त्या प्रश्नांची उत्तरे जय भीम आणि बुद्ध या शब्दातून मिळतात.
आपले व्यक्तिगत पारिवारिक जीवन जगत असताना सोबत चालणाऱ्या समाजबांधव आणि देशबांधव यांचेही कल्याण व्हावे हा विचार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला .म्हणून “जय भीम” म्हणायचे.
तर व्यक्तीचे जीवन आणि सार्वजनिक जीवन हे एकमेकांच्या पूरक असते. हे सांगणाऱ्या भगवान बुद्ध यांच्यासाठी नमो बुद्धाय म्हणायचे.स्वार्थी मोक्ष मुक्ती वादी जंगलात राहून तप करणाऱ्या,हिंदू संन्यस्त जीवनाला ,बौद्ध भिक्खू संघ हा पर्याय उभा करताना, त्या भिक्खू जीवनाला समाज प्रश्नावर बोलायला शिकविणारे एकविरा पुत्र भगवान बुद्ध जगातील धर्म वाद्यांना सर्वात मोठे आदर्श ठरले आहेत.
म्हणूनच खरा अध्यात्मिक धार्मिक माणूस बुद्धांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही.

कर्मकांडी आणि लूटमार शोषण करण्यास कुप्रसिद्ध झालेल्या देव देवळे धर्मस्थळे यांना लोककल्याणकारी जीवन मार्गाचे स्वरूप देणाऱ्या बौद्ध विहार बौद्ध लेणी यांच्यातील भगवान बुद्धांच्या विचारांना, जनमानसात आणणे ही काळाची गरज आहे.
बौद्ध धम्माची मोक्ष मुक्ती हि लोकांत राहून,लोकांशी प्रामाणिक पणाचा लोकव्यवहार करून मानवी प्रामाणिक पणाचे अत्युच्च स्थान प्राप्त करणे म्हणजे “अर्हन्त” होणे होय.

याच जीवनाचा आदर्श भारतीय संविधानात आम्हाला बौद्ध धर्माचा आदर्श घेतलेल्या बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे.

आज शिवसेनेच्या एका खासदारांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला आहे.लोकांनी निवडून दिलेल्या लोकांशी प्रतारणा करून आपला व्यक्तिगत भ्रष्ठाचार लपविण्याचा मार्ग नाशिक आणि उत्तरेतील गंगा किनारी बसलेल्या पुरोहितांनी हजारो वर्षे दिला होता.
असाच काहीसा पापमुक्तीचा मार्ग वर्तमान भाजप नेतृत्वाने ईडी कारवाई झालेल्या शिवसेनेच्या आमदार लोकांसमोर ठेवला आहे.
लोकांनी चारित्र्यहीन लोकांविरोधात आंदोलन करण्यास पर्याय राहिला नाही.
कारण शासन प्रशासन काही प्रमाणात लोकशाहीचे चार स्तंभ चोरांच्या पाठी उभे राहिल्यानंतर लोकशाही वाचविण्याचे काम देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचे असते.

शील चारित्र्य यांचा मानवी जीवनात स्वतःच्या चारित्र्यातून आदर्श देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध याना पावित्र्याचा, पापमुक्तीचा हा हिंदुत्ववादी वैदिक कर्मकांडी मार्ग मान्य नव्हता.

मानवी जीवनाचा सरळ स्वभाव ,प्रामाणिक वागणे, हे त्यांच्या जीवनाचे सत्य स्वरूप होते.
अर्थात आज डॉ बाबासाहेब आबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांचा “अस्पृश्य “म्हणून तिरस्कार निर्माण करण्यात मनु समर्थक वैदिक ब्राह्मणी लोक यशस्वी झाले आहेत.
त्यांस क्षत्रिय वैश्य यांच्या सत्ता संपत्तीचा प्रचंड पाठींबा आहे.
या परिस्थितीत या दोन महापुरुषांची खरी ओळख ओबीसी बांधवाना करून देणे, हे आपले कर्तव्य ठरते.
अर्थात हे केवळ शब्दांचे खेळ जनमानसात टिकत नाहीत.
त्यात स्वतःच्या चारित्र्य आणि निर्मळ जीवनाची जोड द्यावी लागते.

आबेडकरी चळवळ समस्त मागासवर्गीय लोकांना आपल्याकडील विचारांचा ठेवा मुक्तपणे वाटत आहे.2005 साली माझ्या घरी आलेल्या अशोक अंकुश सानपाडा नवी मुबई,
लोकशाहीर संभाजी भगत.
प्रा प्रेमरत्न चौकेकर यांनी या विचारांचा प्रथम परिचय मला दिला.
अर्थात या आबेडकरी विचारांनी माझे जीवन बदलून टाकले.
व्यक्तिगत जीवनात याचा खूप मोठा फायदा मला झाला.
परंतु अज्ञान अंधारात सापडलेल्या माझ्या जात बांधवाना अर्थात ओबीसी बांधवाना बाहेर काढणे हे या “जय भीम, बुद्ध” जीवनाचा अविभाज्य भाग आहे !
हे मला या दोन महापुरुषांची विचारधारा अभ्यासून कळलेले सत्य होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या अलिबाग तालुक्यात माझा जन्म झाला.
त्यांच्या कूळ कायदा,चवदार तळे,मनुस्मृती दहन,चिरनेर जंगल सत्याग्रह, शिक्षण आरक्षण चळवळीने साऱ्या कोकणची माती पवित्र झालीय.
उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या गुलामी विरुद्ध बंड करण्याची ठिकाणे येथल्या शेतात, मातीत भु सुरूंगाप्रमाणेच पेरली गेली आहेत.
सातबारा काढताच या बंडाची कारणे समोर येतात.
म्हणूनच थोडी आग भेटताच येथे लोकनेते दि बा पाटील नामकरण आंदोलन पेटले! आणि हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरे यांचा राष्ट्रीय पराभव करूनच, आज नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला एका आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी अस्मितेचे धगधगते प्रतीक झालेल्या दि बानी, धगधगत्या हिंदू वैदिक तत्वाला ढगात घातले आहे.

ओबीसी अस्मिता जागविण्यासाठी होलसेल ओबीसी आंदोलन उपयोगाचे नाही.
त्यात अनेक ओबीसी जातींपैकी कोणत्याही एका जातीच्या,एका नेत्याने आपल्या जातीचे नेतृत्व करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
जातींच्या मुक्तीचे हे एकक दस्तुरखुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “मुक्ती कोण पथे “?
या आपल्या पुस्तकात मांडले आहे.
याचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते आदरणीय दत्ता पाटील यांनी मला प्रत्यक्ष भेटीत सांगितले आहे.
तर केवळ राजकीय आंदोलनं करून समाजाचे पूर्ण प्रबोधन ,आणि पुनर्वसन होऊ शकत नाही,आणि हिंदू वैदिक शोषणातून मुक्ती कदापि नाही. तर त्यासाठी धार्मिक चिकित्सेची गरज आहे.सामाजिक प्रबोधनच हवं.
विधानसभा ,विधानपरिषद अर्थात लोकसभा म्हणजे आमदारकी खासदारकी टिकवून ठेवणाऱ्या लोकांना हे धार्मिक प्रबोधन परवडणारे नाही ?
हे दिबांनि मोठ्या मनाने कबूल केले.
राजकीय सत्तेवर पाणी सोडण्याची तयारी असेल? तर व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील मुक्ती मिळू शकते.राजसत्ता राजमहाल सोडून मानवी दुःख त्याचे मूळ कारण ,उपाय शोधणाऱ्या भगवान बुद्धांच्या सर्व सुखाचे आगर असलेल्या राजसत्तेला दिलेली तिलांजली ही आताच्या सत्तेसाठी नग्न झालेल्या नेत्यांना काय कळणार?

अत्यन्त अवघड असा प्रश्न मागे ठेऊन ,हे माझे दोन ओबीसी नेते गेले.

जय भीम आणि बुद्धाचे नाव घेतल्याने माझी आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी लोकप्रियता प्रभावित होत आहे. हे कटू सत्य माझ्यावर निस्सीम प्रेम करणारे माझे अत्यन्त जवळचे मित्र सागर राजे पनवेल,यांनी सकाळीच सांगितले.
अर्थात प्रभात पर्व,दै महानायक यांच्या बातम्यांनी मला मोठा परिचय दिलाय.
लोकांच्या प्रत्यक्ष कामातून झालेली ही प्रसिद्धी आहे.

लोकांना माझे काम आवडते हे सत्य आहे.
जय भीम, बुद्ध ही माझी प्रेरणा आहे.
अर्थात लोकप्रिय होणे. त्यासाठी लोकाणुनय करणे. हे नेतृत्वाचे दोष आहेत .
तर लोकांना सत्य सांगताना, लोकप्रियतेची काळजी न करता, त्यांना चागल्या मार्गावर आणण्यासाठी प्रसंगी टीका सहन करणे.
हे खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे वाक्य माझ्या मनःपटलावर कायम कोरले आहे.

ओबीसी जातींच्या मुक्तीचा मार्ग म्हणजेच एकविरा पुत्र बुद्धाचा कार्ले लेण्यातील 2000 वर्षे जुना मार्ग आहे. हा नव्या भारतीय संविधानाकडेच जातो.हे सत्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले वास्तव असेल ?
तर ते जय भारत,जय हिंद, या राष्ट्रीय घोषणे इतकेच, “जय भीम” हे सुद्धा तेवढेच मानाचे राष्ट्रीय शब्द आहेत.
संविधान निर्मात्यांचा जयघोष त्यात आहे.
त्याच प्रमाणे भारतीय अध्यात्म म्हणा ?किंवा भारतीय तत्वज्ञान म्हणा? ज्या प्रेमाने ज्या विचारांनी आम्ही जगातील दीडशे देश जिंकले आहेत?
त्या अहिँसक क्रांतीचा विचार म्हणजे एकविरा पुत्र भगवान बुद्ध होय.

पुढील काळात माझ्या मच्छीमार आरमारी सागरपुत्राना ,महामुंबई क्षेत्रातून म्हणजेच बुद्ध काळातील “अपरांत” प्रदेशांत खरी सामाजिक राजकीय , धार्मिक मुक्ती, या “जय भीम आणि नमो बुद्धाय “या शब्द मानणाऱ्या माणसांच्या सम्यक संकल्पात आहे.
याच जीवनात ,ही मुक्ती मिळविण्याच्या माझ्या सकल्पाला ,आपल्या सारख्या प्रबुद्ध भावा बहिणींचे आशीर्वाद मिळावेत .ही विनयशील प्रार्थना आहे.

सुलोचनापुत्र
राजाराम पाटील.
8286031463.
केगाव उरण
रायगड.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!