भगवान बुद्धांची शिकवण – भाग ९१

तथागतांची करुणा
एकदा तथागत श्रावस्तीमध्ये होते तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की, त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात.
त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन, तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या:-
“जो चांगुलपणात, सन्मार्गात कुशल आहे, जो शांतीपदाची आकांक्षा करीत आहे, त्याने असे वागले पाहिजे:
तो समर्थ, न्यायी, सुवचनी, तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे.”
“तो संतुष्ट असला पाहिजे, त्यांच्या गरजा अधिक असू नयेत. त्याची कर्तव्ये कमी, त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रियनिग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंबपरिवाराची अति आसक्ती असू नये.”
“सुज्ञजन नावे ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टीचा नाद धरु नये. सर्वांचे मंगल होवो, सर्वांचे कुशल होवो, सर्व आनंदी व सुरक्षित राहोत, सर्वांची ह्रदये निरामय होवोत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे.”
“कसेही प्राणीमात्र असोत- सबल किंवा दुर्बल, उंच, सुदृढ किंवा मध्यम, बुटके, मोठे किंवा लहान, दृश्य किंवा अदृश्य, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात सर्व प्राणीमात्र सुखी होवोत.”
“कोणी कोणास फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करु नये किंवा रागाने वाईट भावनेने कोणाचेही अनिष्ट चिंतू नये.”
“आपले प्राण पणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे.”
“त्याच्या असीम मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र वर, खाली, आसमंतात, अनिर्बंधपणे, द्वेषविरहित प्रस्तुत झाल्या पाहिजेत.”
“तो उभा असो, बसलेला असो, चालत असो, पडून विश्रांती घेत असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरुक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे.”
“मोहात न पडणारा, सद्गुणी, ज्ञानी, इंद्रियसुखाबाबत अनासक्त असेल तर त्याच्या नशिबी पुन्हा गर्भवास येत नाही. आपल्या शत्रूवरही प्रेम करा.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१३.३.२०२४
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत