भगवान बुद्धांची शिकवण-भाग ८२

मुलांसाठी विनय
मुलांनी आई वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या आईवडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलांवर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्यांना परावृत्त करतात. सद्गुणाचा त्यांना उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सर्व मालमत्ता त्याच्यावर सोपवतात.
शिष्यांसाठी (विद्यार्थ्यांसाठी) विनय
शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी, ते आले असता आसनावरुन उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्याचे कोणतेही काम करावयास पडले तरी ते करावे आणि अध्यापन करीत असताना एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्यांचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात, सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवतात. त्यांचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व बाजूने त्यांच्या रक्षणाची काळजी घेतात.
पती-पत्नीसाठी विनय
“पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करुन, तिच्याशी एकनिष्ठेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती एकनिष्ठ असते. ती दोघांच्याही नातलगांचे आदरातिथ्य करते. त्याने संपादन केलेल्या मालमत्तेवर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.”
मालक व नोकर यांसाठी विनय
“मालकाने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. अन्न व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रुषा करावी. असाधारण व स्वादिष्ट पक्कान्ने त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात, ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची किर्ती सर्वत्र वाढवितात.”
कन्येसाठी विनय
तथागतांनी मुलींना उद्देशून म्हणाले, “तुम्ही अशा प्रकारचे वर्तन ठेवावे की, आमचे आई-बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील, त्या पतीविषयी प्रेमबुद्धी ठेवू. आम्ही सकाळी लवकर उठू आणि सर्वांच्या शेवटी झोपू. मनःपुर्वक काम करु. कुठलीही गोष्ट करायला सांगताना ती गोडीगुलाबीने करायला लावू. नेहमी गोड आवाजात बोलू. असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आमच्या पतीचे आप्तेष्ट, आईवडील, संन्याशी अथवा पूजनीय माणसे या सर्वांना आम्ही मान देऊ. त्यांचा आदर करु. ते आमच्या पतीच्या घरी येताच त्यांना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सन्मान करु. असे वागायला शिका. त्याप्रमाणेच पतीगृहीची सर्व कलाकुसर व इतर कामे, मग ती लोकर किंवा कापूस विणण्याची असोत किंवा इतर, मोठ्या कौशल्याने व चपळाईने करु. कोणत्याही कामाचे स्वरुप नीट समजावून घेऊ. म्हणजे ते आम्हाला सुलभतेने करता येईल किंवा करवून घेता येईल, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच दूत, कामगार हे आपली कामे कशी बजावतात, प्रत्येक जण काय करतो आणि काय करीत नाही ह्या गोष्टी आम्ही ओळखायला शिकू. कोण किती सशक्त आहे, दुबळा आहे हे आम्ही जाणून घेऊ आणि ज्याला जसे लागते तसे अन्न देऊ, असे वागायला शिका. त्याप्रमाणेच आपला पती जे धनधान्य, रुपे, सोने कमाई करुन घरी आणतील ते आम्ही सुरक्षित ठेवू, त्यांच्यावर पहारा आणि देखरेख ठेवू, आणि जेणेकरुन चोर दरोडेखोर यांच्या नजरेपासून ते सुरक्षित राहील असे सर्व काही करु, असे वागायला शिका.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.४.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत