महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

मंबाजीच नव्हे तर रामेश्वर भट देखील ओळखण्याची गरज..

  तुकोबांच्या खूनाची केस उलगडणारे एक अंकी नाटक सेन्सॉर बोर्डाने रोखले आहे, असा राजाभाऊंचा मेसेज होता. त्यांनी संहितेची पीडीएफ पाठवली असल्याचे मला अंधूक आठवते. पण माझ्याकडे ती सापडली नाही. आता संहितेची पुस्तिकाच मिळाली आहे.
  अवघ्या ५० पानांचा वीतभर आकाराचा हा गोळीबंद ऐवज आहे. आपले दिवंगत वडील प्रा. विठ्ठल शिरगुप्पे व ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे सरांना ही संहिता अर्पण केली आहे. तिला चळवळीच्या रणभूमीवरील लढवय्ये कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर यांची मिताक्षरी प्रस्तावना लाभली आहे. ९ फेब्रुवारी २००२ला 'विद्रोही साहित्य संमेलन' सातारा येथे या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. म्हणजे दोन दशकांहून अधिक काळ ही एकांकिका रंगभूमीची प्रतिक्षा करते आहे.
 कीर्तन चालू असताना पडदा उघडतो. कीर्तन अर्थातच तुकोबांच्या तथाकथित वैकुंठगमनाची कथा रंगवून सांगणारे. पण श्रोत्यांमधील एक तरुण किर्तनात व्यत्यय आणतो. वैकुंठगमनाची कथा बनावट आहे, म्हणतो ! दोघांच्या संवादातून तुकोबांच्या पत्नीची आवलीबाईंची साक्ष घेण्याचे ठरते.
   पुढचा प्रवेश आवलीबाईंच्या पडवीत. शेजारीण विठाबाई, आवली आणि कान्होबा (तुकोबांचे बंधू) यांच्या संवादातून तुकोबांच्या खूनाची केस उलगडायला सुरूवात होते.
 त्या पुढच्या प्रवेशात संतोबा (गावकरी) आणि संताजी तेली (जगनाडे) व कान्होबा यांचा संवादातून खूनाचा संशय व्यक्त होतो. ही केस सरकारात न्यायची हे पक्के ठरते.
  पुढचा प्रवेश मंबाजीच्या मठातच सुरू होतो. मंबाजीवरच सारा संशय आहे. मंबाजी देखील अस्वस्थ आहे. मठातील एक गुंडो नामक मंबाजीचा शागीर्द आहे. त्यांच्या संवादातून ही केस सरकार दरबारी दाखल होण्याची अस्वस्थता आहे. ती सरकार दरबारी दाखलच होऊ नये म्हणून फिर्यादी कान्होबाला बोलावून घेतले आहे. पण मंबाजी व कान्होबा यांच्यात वादावादी होतेच. प्रवेश संपतानाच मोठे प्रस्थ असलेल्या रामेश्वर भट वाघोलीकरांचे आगमन झाल्याची खबर येते. 
   पुढचा प्रवेश मंबाजीच्या मठातच रामेश्वर भट वाघोलीकर व मंबाजी यांच्यातील संवादाचा आहे. ज्यात 'वैकुंठगमना'ची कथा रचली जाते. अर्थात या बनावट कथेचे बौद्धिक कावेबाजी कर्तृत्व मंबाजीचे नाही. ते आहे रामेश्वर भटाचे !
 रामेश्वर भट इथे एक महत्त्वाची माहिती मंबाजीला देतो. सरकारात फिर्याद दाखल करायला निघालेल्या कान्होबा आदी कुणब्यांना रामेश्वर भट माघारी आणतो ! तुकोबांच्या खूनाची केस कायमस्वरूपी वैकुंठगमनात परिवर्तित करण्याचे कसब कसे साधले हे सांगताना रामेश्वर भटांपुढे आदर्श आहे आद्य शंकराचार्यांचा. 
     आद्य शंकराचार्यांनी बौद्ध धम्माचा प्रभाव नष्ट करण्यासाठी स्वतःच्या उपनिषदी वेदांताला, बौद्धमताच्या बासनात गुंडाळूनच लोकांपुढे मांडले. तेही इतका बेमालूम की लोकच शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हणू लागले ! इथे तुकोबांच्या खूनाची केस जिरविण्यासाठी रामेश्वर भट 'कुणबट' तुकोबांना आपले गुरू म्हणून जाहीर करतो व त्यांचे (मरणोत्तर)शिष्यत्व पत्करतो.
 रामेश्वर भट दिवंगत तुकोबांची व आपली भेट कशी झाली याचे फार रहस्यमय वर्णन करतो ...
  • रामेश्वर : होय, आम्हांस भेटले. अगदी साक्षात भेटले. बुवांनी (म्हणजे तुकोबांनी) ‘धर्मबाह्य’ कृत्य केले. त्यांस आम्ही प्रायश्चित्त सांगितले. काय करणार ? शास्त्रापुढे आमचाही नाईलाज. पण अशा थोर महात्म्याला आम्हांस शिक्षा करावी लागली. आमच्या मनाचा अतिक्षोभ जाहला. काही केल्या होईना शांत. म्हणून बुवांचे नाव घेऊन कुंडात मारली बुचकळी आणि काय आश्चर्य … मन एकदम शांत होऊन गेले. अगदी शांत. तत्क्षणीच बुवांचे शिष्यत्व घेतले. त्यांचे दर्शनाचे ओढीने निघालो होतो, इकडे –
  • मंबाजी : असे सांगितलेत आपण ?
  • रामेश्वर : (तंद्रीतच) निघालो होतो इकडे. तर वाटेतच मुक्कामात एक अघटितच अवलोकनास आले.
  • मंबाजी : (उत्सुकतेने) काय ? काय पाहिलत आपण ?
    (इथे संताजी देखील भारावून ऐकायला उत्सुक झाला आहे)
  • रामेश्वर : जगदंब ऽऽ तो दिव्य प्रसंग अजूनही आमच्या दृष्टीसमोरून हलत नाही. पुष्पक विमानच ते … प्रत्यक्ष भगवंत बुवांना मांडीवर बसवून वैकुंठाच्या दिशेने ..‌. वर चालले होते. ते तेज:पुंज विमान … जणू आकाशातून सोन्याचा एक गोळा झळाळत चाललेला … बुवा मोठे पुण्य पुरुष … भगवंत त्यांना नेण्यासाठी येणार नाहीत तर काय आमच्या सारख्या हतभाग्यांसाठी ? आमच्या हाती फक्त खालून त्यांना नमस्कार करणे, एवढंच …
    यानंतर मग तुकोबांचे मंदिर बांधण्याचा प्रस्ताव रामेश्वर भट देतो. पण एवढं सगळं होऊनही तुकोबांची पत्नी आवली काही बधत नाही. तिचा मंबाजी व रामेश्वर भटावर मुळीच विश्वास नाही. तिला पक्का संशय आहे. घातपात झाला आहे. शेवटी, आवलीला वेड लागले आहे, असे पसरविण्याची मसलत रामेश्वर भट देतो. आवली देशोधडीला लागते.
    शेवटच्या प्रवेशात एकविस वर्षांनंतर आपल्या मुलाला, नारायणला घेऊन आवली पुन्हा देहूत आपल्या घराच्या पायरीवर येते. आता तुकोबांच्या विठ्ठल मंदिरावर जमीन जुमल्यावर मंबाजी कब्जा करून बसला आहे. त्याच्याशी मायलेकांचा संघर्ष सुरू आहे. मंबाजी इथे एक धर्मशास्त्राचाच पेच नारायणाला टाकतो. तुझ्या बापाचे वैकुंठगमन झाल्याने पार्थिवावर अग्निसंस्कार, तेरावे वगैरे काहीच झाले नसल्याने त्याचे सुतक फिटलेलेच नाही ! सबब, तुझे सुतकी तोंड काळे कर आणि जा खुशाल सरकारात !
    शेवटी आवली म्हणते – ” सुताक सुटल्यालं न्हाई …बुवांचं वैकुंठ सुटल्याबिगर ह्ये सुताक सुटायचं न्हाई. ल्येका, त्ये वैकुंठच पयलं सरनावर चडीव … इट्टल इट्टल … ” (खिन्न हस्ते. टाळ्या पिटते)
    या हतबलतेकडे भयभीत होऊन नारायण टाहो फोडतो … आये …(पडदा पडतो)
    या एकांकिकेचे नाव -‘ तीच्या नवऱ्याचं वैकुंठगमन’ असं देण्याचे कारण या शेवटच्या हतबल विधवाविलापात असावे.
    या एकांकिकेने तुकोबांच्या वैकुंठगमनाच्या बनावट कहाणीचे कर्ते रामेश्वर भट यांचा कावेबाजपणा व ब्राह्मणी कसब अचूकपणे अधोरेखित केले आहे व तेच या एकांकिकेचे खरे यश आहे.
    मंबाजी उघड दिसतात. रामेश्वर भट छुपे सोज्वळ चेहऱ्याचे कारस्थानी असतात. ते ओळखता येत नाहीत. हेच बहुजनांच्या आजवरच्या पराभवांचे गमक आहे.
    आजचे ‘मंबाजी’ उघड दिसताहेत. पण ‘रामेश्वर’ उदारमतवादी चेहऱ्याने, मंबाजीला शिव्या देतच वावरत असल्याने ओळखता येत नाहीत !
  • किशोर मांदळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!