महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ७५


धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असावा

बुद्ध आणि त्यांचा धम्म या दोन अगदी अलग, वेगवेगळ्या गोष्टी होत. बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून वेगळे मानीत असे, याचे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी (successor) नेमण्यास त्याने दिलेला नकार. दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायांनी, त्यांच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी तथागत बुद्धांनी तसे करण्याचे नाकारले. “धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असावा,” असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे.
“धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे. त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे. ज्या धम्माला (तत्त्वाला) जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते, तो धम्मच नव्हे. धम्माचे शासन चालावयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल, तर तो धम्मच नव्हे.” धम्म आणि त्यातील आपले स्थान यासंबंधी भगवान बुद्धांचा दृष्टीकोन अशा प्रकारचा होता.

मी ‘मार्गदाता’ आहे, ‘मोक्षदाता’ नव्हे

बुद्धांनी मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. ते म्हणतात, “मी ‘मार्गदाता’ आहे, ‘मोक्षदाता’ नव्हे.”
बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात (revelations); परंतु भगवान बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे ‘मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या’ असे प्राणिमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात.
प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्मावर श्रद्धा व विश्वास राखणा-यांचा मोक्ष-लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणा-यांचा मोक्ष म्हणजे, जर ते प्रेषिताला देवदूत मानीत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्यांची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे.
तथागत बुद्व आपण स्वतः प्रेषित किंवा देवदूत आहोत, असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडण करीत असे.
अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध होता. जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा आहे.
तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे, असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे. ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो, त्यांच्या क्रिया-प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्ध धम्म.
सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा तथागत बुद्ध हा एक ‘गुरु’ (teacher) आहे. मोक्षदाता आणि मार्गदाता यांमध्ये त्याने स्पष्टपणे भेद केला आहे. एक मोक्ष देणारा आहे, तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे.
भगवान बुद्ध हा केवळ ‘मार्गदाता’ होता. मुक्ती ही ज्याची त्याने आपल्या श्रमाने मिळवावयाची आहे.
आपले हे मत, ‘मोग्गलान’ ह्या ब्राम्हणाला भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे.
धम्माच्या शिक्षणात असे शिकवले जाते –
“तू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे, हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयमरहित इंद्रियाने, जसे की दृष्टीने रुपग्रहण करताना ज्या तृष्णा-वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात. त्या दुर्वृत्तींना दूर ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत रहा. चक्षुरिंद्रियाविषयी सावधान रहा. चक्षुरिंद्रिये संयमित ठेव. (Guard the sense of sight, win control over the sense of sight.) इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिव्हेने रूची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस त्यावेळी त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीरसौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस; तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की, मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे. नव्या वेदना (feelings) उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. जागृतीचा अभ्यास कर. दिवसा, चालता, बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. जागरुकता आणि स्मृती (सम्यक जाणीव) यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वाकताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, अन्न चावून व चव घेऊन खातांना, स्पर्श करताना, शरीरव्यापार(नित्यकर्मे) करताना, चालताना, उभे असताना, बसले असताना, पहुडलेले वा निद्रिस्त असताना किंवा जागे असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना, सदैव स्मृतीयुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. (Have yourself under control.) तथागताचे हे भाषण ऐकून ब्राम्हण मोग्गलान म्हणाला:
“परंतु गौतमा, मला हे सांग की, तुझे सर्व शिष्य अशा प्रकारची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय? किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय?”
“ब्राम्हणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निब्बाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही.”
“परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निब्बाण आहे, इथे हा निब्बाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निब्बाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये हे कसे?”
“ब्राम्हणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो. परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे काय?”
“होय; मला तो पूर्ण माहीत आहे.”
“बरे. मग ह्या रस्त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली असता, एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो.”
“नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देश करण्याबाबत तुला विनंती करतो, तू त्याला त्याच सूचना करतोस, तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो.”
ब्राम्हण बोलू लागला, “त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे.”
“ब्राम्हणा, मग मी काय करतो, हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितात.”
या सूक्तावरून स्पष्ट होते की, बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही. तो फक्त मार्ग दाखवितो.

मोक्ष म्हणजे काय?

महंमद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे.
बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निब्बाण (निर्वाण)! आणि निर्वाण म्हणजे रागलोभादि विकारांचा निग्रह.
अशा धम्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार?
भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा, दैवीपणाचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो धम्म अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही.
प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे.
मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की, दुधा-मधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे. कारण ती ईश्वराचीच शिकवण आहे.
येशू ख्रिस्तांनी आपण ईश्वरपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्यांची शिकवणूकही दैवी झाली आहे.
कृष्णाचे म्हणणे असे की, ‘मी स्वतः ईश्वर आहे आणि गीता हा माझा शब्द आहे.’
तथागत बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबधी किंवा स्वत:संबंधी कधीही असा दावा मांडला नाही.
तो तर असे म्हणत असे की, ‘आपण इतर माणसांसारखे माणूस आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आहे.’
आपला संदेश प्रमादातीत आहे, असे त्याने कधीच म्हटले नाही. (He never claimed infallibility for his message)
तो म्हणतो, ‘माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे.’ हा एकच दावा बुद्धाने केला आहे.
त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव!
तो म्हणत असे की, ‘त्यात कितपत सत्य आहे, हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे.’
कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२६.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग पहिला)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!