भगवान बुद्धांची शिकवण-भाग ७६

धम्माचा प्रचार आणि प्रसारक यंत्रणा
इ.स.पूर्व ५२८ वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राती झाल्यावर भगवान बुद्धांनी ४५ वर्षे धम्मोपदेश केला. सुरवातीला तथागतांनी इषिपतन (सारनाथ) येथे पाच परिव्राजकांना ‘धम्मचक्क पवत्तन सुत्त’ उपदेशून उपसंपदा दिली. पुढे काही शतकानंतर भारतभर, तसेच श्रीलंका, ब्रम्हदेश, दक्षिण आशिया व जगातील इतर भागात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला.
धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तथागतांनी संघाची स्थापना केली. संघ म्हणजे भिक्खूंचा संघ. भिक्खू आणि उपासकांचे तीन शरणस्थान आहेत. ती म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ.
आपण बुद्धाला शरण जातो. बुद्ध हे एखाद्या व्यक्तीचं नामाभिधान नसून ते पद आहे. तथागत आणि बुद्ध हे पद प्राप्त झाल्यावर सिद्धार्थ गौतमाचं हे नाव लोप पावलं. त्यांनी स्वतः दुःखाच्या कारणांचा व दुःख मुक्तीच्या मार्गाचा शोध लावून सर्व विकारांवर (मारांवर) विजय मिळविला आणि संबोधी प्राप्त केली व नंतर तोच मार्ग सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी लोकांना शिकविला.
आपण धम्माला शरण जातो, कारण मानवी मन व मानवी शरीर या विषयीचे सत्य व नैसर्गिक नियम त्यात प्रतिपादीत केले आहेत व मनातील विकार कमी करण्याच्या नियमांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. प्रत्येक व्यक्ती ही विकार संपविण्यासाठी व दुःख मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असते. त्यामुळे या नैसर्गिक सत्य नियमांशी श्रद्धा, एकनिष्ठता व्यक्त करण्यासाठी आपण धम्माला शरण जातो.
आपण संघाला शरण जातो. कारण संघ हा धम्माचे काटेकोरपणे पालन करून निर्वाण प्राप्तीसाठी आणि भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटीबद्ध असणा-या भिक्खूंचा समूह म्हणजे संघ होय.
संघ आणि संघाची संघटनात्मक संरचना
तथागत भगवान बुद्धांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे.
एक भिक्खू आणि दुसरा गृहस्थ ज्यांना उपासक म्हणत.
संघ ही भिक्खूंची संघटना. बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे. तथागत बुद्धांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची, आदर्शांची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेवले.
संघात कोणालाही प्रवेश मिळे. त्याला जातीचे बंधन नसे. त्यांत पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती. संघप्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे. संघात जातीला स्थान नव्हते. संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च-नीच असा भेद पाळला जात नसे. संघात सर्व समान मानले जात असत. संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे; कुळावर नसे. बुद्ध म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत. नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात. परंतु नदी एकदा महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते. ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते. संघाचीही स्थिती तशीच आहे. भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो. त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कूळ ही लोप पावतात असे तथागत म्हणत. संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक: भिक्खू संघ आणि भिक्खूणी संघ, ह्या दोन वेगवेगळ्या संस्था असत.
श्रामणेर आणि भिक्खू
संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात. वीस वर्षांखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई. त्रिशरण आणि दशशीला ग्रहण केलेला प्रत्येक व्यक्ती श्रामणेर बने.
‘त्रिशरण’ म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे.
‘दशशीला’ म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रम्हचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही. मी अवेळी अन्नसेवन करणार नाही. मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही. मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही. मी ऐषआरामापासून दूर राहीन. मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही. अशा ह्या दहा प्रतिज्ञा आहेत. ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या दहा प्रतिज्ञा आहेत. श्रामणेराला कधीही संघ सोडून उपासक बनता येत असे. श्रामणेर हा भिक्खूंच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे. त्याने परिव्रज्या घेतलेली नसे.
भिक्खू व्हायला दोन अवस्थांतून जावे लागे; पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा. उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरे.
ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल त्याला ज्या भिक्खूला उपाध्यायपदाचा अधिकार असे त्यांच्याकडे जावे लागे. भिक्खू म्हणून दहा वर्षें घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे. उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागत होते. हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलविलेल्या संघसभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खूपदाचा प्रार्थी आहे, तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही. याची खात्री संघाला करून घ्यावी लागत असे. ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळे.
भिक्खूणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम साधारणतः भिक्खूसंघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२७.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड पाचवा
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत