भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बापाची जयंती विकणारी औलाद !

राजु बबन राजवन्त

      अगदी काल परवाची घटना आहे. मुंबईत एका मंडळाच्या कार्यकर्त्याने फोन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी आमचा कार्यक्रम पाहिजे आहे, यासाठी चर्चेकरिता बोलावलं. मी आणि माझे एक मित्र आम्ही दोघेजण ठरल्या वेळेनुसार पोहचलो. जयंतीच्या तयारीत असलेले तीनचार कार्यकर्तेही पोहचले. हॉटेलमध्ये चहापान सुरू असताना ऑर्केस्ट्राचं मानधन, आघाडीचे गायक, गायिका यांच्या विषयी चर्चा झाली. नेहमीप्रमाणे मानधनावर चर्चा सुरू झाली. हो - नाही म्हणत अगदी वाजवी मानधनात ऑर्केस्ट्रा करायचं ठरलं. सर्व काही व्यवस्थित झालं. 

  एवढं झाल्यावर मंडळाचा अध्यक्ष म्हणाला, “साहेब, एक विनंती आहे.” 

आम्ही म्हणालो , काय विनंती आहे ?

मग त्याने सांगायला सुरुवात केली.

१) कोणत्याही जाती धर्म आणि राजकारणावर टीका टिप्पणी नको.
यांवर आम्ही म्हणालो कि , आम्ही टीका करत नाही, परन्तु आंबेडकरी चळवळीचा इतिहास मात्र कोणालाही न घाबरता मांडतो.

२) कार्यक्रमात जर एक दोन लावण्यां सादर करता आल्या तर बरं होईल ?
आम्ही म्हणालो , कोणासाठी आणि का ?

त्यावर तो कार्यकर्ता म्हणाला, “साहेब ! या ऑर्केस्ट्राचा खर्च विभागातील एक अण्णा करणार आहे, त्याचे बार आहेत व त्याला लावणी हवी आहे !”
आम्ही म्हणालो , “जमणार नाही, आम्ही आत्ताच तुमच्या सोबतचा करार रद्द करतो” , असं म्हणून आम्ही दोघेही तेथून निघालो.

      त्या कार्यकर्त्याने लावणीचा उल्लेख केल्यामुळे मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पठ्ठे बापूराव यांच्या संवादाची आठवण झाली.

    पठ्ठे बापूराव म्हणजेच बापूराव कुलकर्णी ! याला तमाशाचं वेड असल्याने घरच्यांनी घरातून हाकलून दिलं होतं. त्यांनतर पठ्ठे बापूराव हा तमाशातील गण गवळींचे कवण करीत तमाशाच्या फडात रहात असे. एके दिवशी पठ्ठे बापूराव डॉ बाबासाहेबांना भेटायला आला. त्याच्या सोबत दोन तरुण महिला होत्या. पठ्ठे बापूराव यांनी डॉ बाबासाहेबांना चळवळीसाठी काही रक्कमेची थैली देऊ केली. त्यावेळी पठ्ठे बापुरावला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारलं कि, “बापूराव , तुमच्या सोबत या दोन महिला आहेत त्या कोण आहेत ?” त्यावर पठ्ठे बापूराव म्हणाला की, ‘ही एक मांगीन आहे, तर ही दुसरी महारीण आहे. दोघीही छान नर्तिका आहेत.’ हे ऐकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर पठ्ठे बापूराववर खवळले आणि त्याला हाकलून दिले. त्यावेळी डॉ बाबासाहेब म्हणाले, “माझ्या आया बहिणींवर वासनांधांनी उडविलेला पैसा घेऊन चळवळ चालविण्यापेक्षा ती मी बंद करीन !” 

      आज खेड्यापाड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतं आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे. कधीकाळी लोकं गरिबीमुळे आपली जनावरं विकायची. त्यानंतर निवडणूकीत गांवच्या गांव विकण्याची पद्धत आली आणि आता तर आपल्याच बापाची जयंती विकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. काय म्हणावं अशा औलादीला ? असे कार्यकर्ते असताना आंबेडकरवाद संपवायला मनुवाद कशाला हवा ? 

      तथागत बुद्ध श्रावस्ती वनात धम्मोपदेश देताना म्हणतात, दानं ददंतु सद्धाय, शिलं रख्खन्तु सब्बदा! (श्रद्धेने दान करा, आणि शिलाचं संवर्धन करा !) जयंतीसाठी जनता श्रद्धेने निधी देत असताना असल्या बाहेरच्या मंडळींकडून पैसे घेण्याचे काय कारण आहे ? 

    आज आम्ही मुंबई आणि आसपासच्या परिसरात पहातो. जयंतीच्या कार्यक्रमासाठी काही स्वयंघोषित तत्वज्ञानी क्षुल्लक रक्कमेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अक्षरशः विकत आहेत. “तुम्ही आम्हांला अमुक इतके द्या, आणि जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक अथवा उद्घाटक किंवा व्याख्याते म्हणून या” अशी डॉ बाबासाहेबांची जयंती विकणारी औलाद जोपर्यंत वस्तीवस्तीत आहे तोपर्यंत स्वतःच्या खिशाला कात्री लावून चळवळीत राबणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर केली जाणार नाही आणि जयंतीचं पावित्र्य देखील राखलं जाणार नाही. 

      या पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईतील काही कार्यकर्त्यांनी पदराचे पैसे खर्च करून “आदर्श जयंती अभियान” राबवल्याची देखील आठवण झाली. मिणमिणते दिवे म्हणून का असेना परंतु असे कार्यकर्तेच आज समाजाचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. 

   आंबेडकरी जनतेने त्यांना पाठींबा देणं गरजेचं आहे. आपल्या वस्तीतील जयंती विकणाऱ्या औलादीला हेच खरं उत्तर आहे. 

   याचा विचार होणं अत्यंत गरजेचे आहे.

      राजु बबन राजवन्त

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!