छत्रपती राजे शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने..

छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गुणवेशिष्ट्याबद्दल बोलत असताना आपण शालेय जीवनापासून त्यांच्याबद्दल जे शिकत, वाचत आलेले आहोत ते सारे प्रसंग मनात तरळून जातात. परंतु आज आपल्याला कळून चुकलेले आहे की, शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपल्याला शिकवला गेलाय तो खरा इतिहास नाहीच मुळी. म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु दादोबा कोंडदेव हे नसून त्यांच्या माता खुद्द जिजाऊ आहेत, तसेच रामदासाला त्यांचे गुरु सांगितले जाते आणि महाराजांना मुस्लिम द्वेष्टे म्हणून प्रचार केला तोही असाच खोडसाळ प्रकार आहे. संत तुकाराम हेच शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे आणि महाराजांच्या फौजेत सर्व महत्वाच्या जबाबदाऱ्या ह्या मुस्लिमांवर होत्या हे संशोधन, अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
आपल्या देशाच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्थेच्या, राजेशाहीच्या जुलमशाहीमुळे स्वातंत्र्यापूर्वी लोकांचे जीवन केवळ गुलामीचे बनलेले होते, केवळ गुलामीत राहणे आणि पशूसारखे जीवन जगणे हेच त्यांचे जगणे होते. परंतु ज्यांनी ज्यांनी या देशातील जनतेला हुकूमशाहीतून, रुढी-परंपरेतून आणि गुलामीतून मुक्त करुन चांगले जीवन देण्यासाठी आपल्या कुटुंबाचा त्याग करुन, प्रसंगी आहुती देवून आपले जीवन समर्पित केले अशा सर्व महापुरुषांमध्ये आद्य क्रांतीकारक तथागत भगवान गौतम बुध्द, महात्मा बसवेश्वर, संत कबीर नंतर अलिकडच्या काळामध्ये पहिले नाव येते ते छत्रपती शिवाजी महाराजांचे.
शिवाजी महाराजांचे अनेक गुण इतिहासात अभ्यासाला मिळालेले आहेत. त्यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व, गनिमी कावा, स्त्रियांचा आदर असे अनेक गुण महाराजांमध्ये होते. त्यापैकी सर्वात मोठा गुण म्हणजे स्वाभिमान. ते अत्यंत स्वाभिमानी होते. त्यामुळेच तर ते गुलामी पसंत करत नव्हते. म्हणूनच मुघल, आदिलशहा, निजामशहा यांच्या जुलूमशाहीविरुध्द त्यांनी बंड पुकारले तेही मुठभर मावळे गोळा करुन. आपण मोठ्या सैन्यांबरोबर लढू शकतो असा विश्वास मुठभर मावळ्यांमध्ये त्यांनी निर्माण केला आणि बलाढ्य अशा मुघल, आदिलशाह, या साम्राज्याच्या हुकूमशाही विरोधात बंड पुकारले.
परंतु आज आपल्या अवतीभवती काय दिसते आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकजण स्वाभिमान गहाण टाकून लाचारी पत्करताना दिसतो आहे. राजकारण्यांपासून ते सामान्यांपर्यंत सारेचजण म्हणजे कुणी व्यवस्थेपुढे हतबल होऊन, कुणी स्वत:चे पोट भरण्यासाठी, कुणी पैसा कमावण्यासाठी, तर कुणी कमावलेला पैसा पचवण्यासाठी गुलामी पत्करुन लाचार बनला आहे. परंतु आपल्या अशा थोर महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्यातील गुणांना स्मरुन, त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी केलेले कार्य, त्यांचा अपरिमित त्याग, समर्पण आणि त्यांच्यामधील स्वाभिमान यांचा आदर्श घेण्याची प्रेरणा आपल्याला अशा जयंतीच्या निमित्ताने घेण्याची गरज आहे.
परंतु अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो वा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, त्यांच्या विचारावर, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जाण्यासाठी चिंतन, मंथन करण्याचे सोडून केवळ एक दिवसापुरता उत्सव, इव्हेंट साजरा केला जात आहे. फक्त धांगडधिंगा करण्यासाठी, डिजे लावून कर्कश आवाजात नाचण्यासाठी आणि लाईटिंगसाठी लाखो-करोडोंचा भरमसाठ खर्च केला जातोय तेही फक्त एका दिवसासाठी. नुसता डान्स आणि नुसता एन्जॉय. मग ज्यांची आपण जयंती करतो त्यांच्या विचाराचे काय ? तर त्यांच्या विचाराचे कुणालाही काहीही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. त्यांनी सांगितलेला मार्ग कुणालाही अनुसरायचा नाहीए. ‘खाओ पिओ बत्ती बुझावो’ हीच मानसिकता आजच्या तरुणांची बनलेली आहे. मग भविष्याचे काय असा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडल्याशिवाय रहात नाही. भविष्याचे म्हणजे सध्या देशात काय चालले आहे, राजकारणी कुठल्या दिशेला देशाला घेऊन चालले आहेत ? एकुणच देशाचे भविष्य काय होणार आहे ? या प्रश्नांनी कळणाऱ्यांना अस्वस्थ करुन सोडले आहे.
आज आपण जे स्वातंत्र्याचे, स्वैरभैर जीवन जगतो आहोत त्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे, आपल्या देशाचे संविधान. परंतु आज सत्ताधारी सर्वांना अधिकार, स्वातंत्र्य आणि हक्क देणारे, मानवी कल्याण साधणारे संविधान बदलण्याची भाषा करत असेल तर यामागचे नेमके काय कारण आहे यावर तरुणांमध्ये चिंतन, चर्चा झाली पाहिजे. कारण याचा थेट परिणाम लोकशाहीवर आणि साऱ्या भारतीयांच्या जीवनावर तर होणारच आहे परंतु त्याहीपेक्षा आजच्या तरुणांच्या जीवनावर भयानक असा परिणाम होणार आहे. परंतु याची फिकीर आहे कुणाला ?
आज देशात स्त्रीयांपासून ते ज्येष्ठ नागरिक, तरुण यांच्या जीवनमरणाचे अनेक प्रश्न आणि समस्या आहेत ज्यावर चर्चाच होत नाही. चर्चा होते, बातमी होते ती केवळ मंदिराची. जणू काही मंदिर बांधल्यामुळे देशातील साऱ्या समस्या चुटकीसरशी सुटणार आहेत, असेच सध्या भासवले जात आहे. मंदिराच्या नावावर साऱ्या देशाला आपले मूलभूत अधिकार नि हक्क आणि आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नापासून कोसो दूर नेले आहे, आणि याची साधी कल्पना तरी कुणाला आहे की नाही? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान अर्पण करताना याबाबतचा इशारा देशाला दिलेला आहे. ते म्हणतात, “भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” म्हणजे धर्मातील भक्ती किंवा व्यक्तीपूजा राजकारणात आणता कामा नये असा गर्भित इशारा दिलेला असूनसुध्दा आताचे सत्ताधारी जाणूनबुजून देशाला भक्तीमार्गाकडे नेत आहेत, म्हणजेच हुकूमशाहीकडे नेत आहेत. मग संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी इतका स्पष्ट इशारा दिलेला असतानासुध्दा सत्ताधारी राम मंदिराच्या नावाने देशामध्ये भक्तीचे वातावरण का निर्माण करत आहेत ? का त्यांना देशातील लोकशाही, संविधान नको आहे ? या अशा विषयांवर, अशा वस्तुस्थितीवर, देशातील भयाण वास्तवावर आणि एकुणच लोकांच्या जीवनमरणाच्या मूलभूत प्रश्नांवर अशा जयंतीच्या निमित्ताने तरुणांमध्ये चर्चा आणि चिंतन व्हायला पाहिजे.
दुसरे असे की, सध्या लोकशाहीचे सारे संकेत न पाळता केवळ एका व्यक्तीवर फोकस होतो आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे. मग या देशात लोकशाही आहे की हुकूमशाही आहे ? याबाबत सुध्दा तरुणांमध्ये चर्चा आणि चिंतन व्हायला पाहिजे.
त्याचबरोबर, माणसाला माणूस म्हणून अत्युच्च पातळीवर नेणारे त्याग, निष्ठा आणि समर्पण हे गुण, मूल्ये इतिहासजमा होत चाललेली आहेत. कुणालाही कशाचा त्याग करायची इच्छा नाहीए, कुणाची कुणावर निष्ठा सोडा साधा विश्वाससुध्दा नाहीए आणि मानवतेच्या कल्याणासाठी समर्पणाची भावना तर शोधूनही सापडत नाहीए. तथागत भगवान बुध्दांपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचे साऱ्या महापुरुषांनी मानवी मुक्तीसाठी, लोकशाहीसाठी आणि एकुणच मानवाच्या कल्याणासाठीचा लढा दिला, संघर्ष केला. म्हणूनच आपण हे आजचे दिवस उपभोगतो आहोत हे आपण विसरता कामा नये. आपण हेही ध्यानात घेतले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे की, संविधानाच्या विरोधात वातावरण तयार होत असताना संविधानामुळेच आपली प्रगती शक्य आहे आणि यापुढेही संविधानामुळेच आपले आयुष्य सुखकर होणार आहे याबाबतची सत्यता पटवून देवून त्याबाबतचा प्रचार आणि प्रसार सर्व बहुजनांमध्ये (SC/ST-VJNT-OBC-SBC-MINORITY) करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला पाहिजे.
तेंव्हा, जर का आपल्याला या देशात लोकशाही टिकवायची असेल तर आपल्या महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला सजग आणि डोळस रहावे लागेल, आपल्या अवतीभवती काय घडत आहे, राजकारणी कसे सामान्य जनतेला वेड्यात काढत आहेत, सामान्यांच्या प्रश्नांना बगल देवून ते स्वत:चीच पोळी भाजून घेऊन केवळ स्वत:चेच घर भरत आहेत. अशा लोकप्रतिनिधिंना संविधानिक शपथेचे स्मरण करुण देण्याची वेळ आता आलेली आहे.
आज साऱ्या देशाच्या भवितव्याची भिस्त आजच्या तरुणांवर आहे. तेंव्हा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा जोतिबा फुले, शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे गुण अंगी बाळगून या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे.
मनिष ब. सुरवसे 9657725946
जिल्हाध्यक्ष,
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा सोलापूर, सोलापूर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत