महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

विरोधी राजकीय पक्ष evm बाबत आवाज का उठवित नाही?

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
सोमवार दि. १२ फेब्रुवारी २०२४.
मो.नं. 8888182324.

           सध्या देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहु लागले आहेत. मे महिन्याच्या आत लोकसभा निवडणूक होणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोग कामालाही लागले आहे. मात्र, निवडणूक आली की evm चा मुद्दा डोके वर काढते. कारण, electronic voting machine वर अविश्वास दाखविला जात आहे. भारतात गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही धर्म, पंथ, जातीचा भारतीय रहिवाशी, १८ वर्ष वय पूर्ण झालेल्या व्यक्तीला महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिलेला आहे. या अमूल्य मताने प्रत्येक व्यक्ती आपल्या पसंतीचे सरकार बसविते. परंतु, त्याने दिलेले अमूल्य मत त्याच उमेदवाराला गेले का? याबाबत मतदारच साशंक आहे. म्हणूनच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात evm मशिन आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहे. नुकतेच एका ग्रामपंचायतीने evm मशीनवर निवडणूक नको म्हणून ठरावच केला आहे. बामसेफ, वकील संघटना आणि काही सामाजिक संघटना evm हटावो, देश बचावो म्हणून जनजागृती करताना दिसत आहेत. मग, ज्यांना सत्तेपासून दूर ठेवले जात आहे असे देशातील सर्व विरोधी पक्ष evm मशीन बाबत आवाज उठविण्यासाठी उदासीन का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

           केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कित्येक जनहित याचिका दाखल होऊनही बाजू ऐकून घ्यायला दोघेही तयार नाहीत. नुकतेच दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज दिले कि, आम्हाला तुम्ही ५० evm मशिन्स द्या, आम्ही विविध राज्यात जाऊन त्या मशिन्स पत्रकारांसमोर इन कॅमेरा हॅक करून दाखवितो. तरीही केंद्रीय निवडणूक आयोग काहीच ऐकायला तयार नाही. उलट evm मशिन्स किती विश्वासपात्र आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे evm मशिन्स बाबत गैरसमज पसरवू नये अन्यथा कारवाई करू अशी धमकीच मतदारांना निवडणूक आयोग देत आहे. याच निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून उमेदवारांवर लाखो गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

           निवडणुका पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत असे निवडणूक आयोगाचे ध्येय आहे. मग ज्या evm नशिनवरच मतदारांचा विश्वास नसेल अशा भितीदायक मशिन्सचा वापर करण्याचा अट्टाहास निवडणूक आयोग का करत आहे? यापूर्वी अनेक निवडणुका बॅलेट पेपरवरच (मत पत्रिका) घेतल्या जात होत्या. मात्र, मत मोजणी करताना ३ ते ४ दिवस लागत असल्यामुळे evm मशिन्सचा पर्याय पुढे आला. मात्र, कित्येकदा असे निदर्शनास आले आहे की, मतदान झाल्यानंतर तब्बल १ महिन्यानी मतमोजणी सुरू केलेली आहे. मग, इथे वेळेची बचत कुठे झाली? उलट त्या एका महिन्यात evm मशिनवर संशयच जास्त घेतला गेला आहे. भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची सूत्रे कोणाच्या हातात देतो याविषयीच्या मतदानामध्ये मतदारांमध्ये संशय असेल तर जनभावनेचा विचार करुन बॅलेट पेपरवरच निवडणूक झाल्या पाहिजेत.

          विशेष म्हणजे मतदार फक्त एकदाच मतदान करुन पाच वर्ष गप्प बसतो. मात्र, ज्या निवडणूकीत evm मशिनवर विश्वास नसल्यामुळे सत्ता गेली अशी ओरड विरोधीपक्ष करतो, तो विरोधीपक्ष निवडणुकी आधी evm मशिनविषयी आवाज का उठवीत नाही? हा प्रश्न आता मतदारांनाच पडलेला आहे. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांना जनतेला मूर्ख बनवून आलटून पालटून सत्ता उपभोगायची आहे का? देशात दोनच प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. एक काँग्रेस आणि दुसरा भाजप.  हाच भाजप विरोधात असताना evm नको म्हणत होता. आणि आता समर्थन करत आहे. म्हणजेच जनतेला उल्लू बनविण्यात एक सापनाथ आहे आणि दुसरा नागनाथ अशी जनतेतच चर्चा सुरु आहे. म्हणूनच लोकसभेची निवडणूक दारात येऊन ठेपली आहे तरी अजूनही सर्व विरोधीपक्ष गप्पच आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!