बौद्धांचे आरक्षण आणि स्वसन्मान चळवळ.
अनिल वैद्य
माजी न्यायाधीश
डी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समूहांना मानवी मूल्यांची जाणिव करुन देण्यासाठी चळवळ केली . 1927ला महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.नाशिक येथे काळाराम मंदिर आंदोलन केले. पुण्याचे पार्वती मंदिर आंदोलन,अमरावतीचे अंबाबाई मंदिर आंदोलन केले .डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला येवले येथे घोषणा केली की, ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मरणार नाही ,आणि 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे हिंदू धर्म सोडला आणि बौध्द धम्म स्वीकारला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रकारे मृतव्यक्तीला जिवंत केले. आपल्या मानवी हक्कांची जाणीव करून दिली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आत्मसन्मान किंवा स्वसन्मान चळवळ म्हणतात.
बौद्धांना बौध्द म्हणूनच आरक्षण मिळणे हा कळीचा मुद्दा असून तो डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्व सन्मान चळवळीचा कळीचा मुद्दा आहे.
बौध्द असुनही हिंदू धर्मातील जातीचा असल्याचे प्रगणकांना सांगावे लागत असेल आणि त्याच जातीचे प्रमाणपत्र केंद्र सरकारला द्यावे लागत असेल तर ही बाब डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्व सन्मान चळवळीला
विसंगत अशी आहे.
नुकतेच महाराष्ट्रात
मराठा आरक्षणासाठी
जातीय सर्वेक्षण सुरू असताना बौद्धांना हिंदू महार लिहण्याची नामुष्की आली होती त्यावरून हा विषय राज्यभर चर्चेला आला आहे.स्वाभिमानी बौद्ध महार लिहू इच्छित नाहीत.म्हणुंन कायद्यात सुधारणा झाली पाहिजे म्हणून स्वाभिमानी बौद्धांसाठी हा लेख लिहत आहे.
नुकतेच मराठा समाजाच्या आरक्षना बाबत महाराष्ट्रातील राज्य मागासवर्ग आयोग जाती निहाय सर्वेक्षण करीत होते.त्या वेळेस
बौद्धांच्या गणने साठी
अनुसूचित जातीची नोंद करण्यासाठी सॉफ्टवेअर मधे व्यवस्था केली नव्हती .
त्याचे कारण आयोगा तर्फे असे दिले होते की, बौद्ध हे महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या सूचित नसल्यामुळे त्यांची अनुसूचित जाती म्हणून नोंद करता येणार नाही.
असे आयोगाच्या 24जानेवारी 2024 च्या पत्रात स्पष्ट नमूद केले होते.आयोगाचे हे म्हणणे बरोबर आहे.संविधानातील अनुच्छेद 366(24) नुसार अनुसूचित जातीच्या व्याख्येनुसार सूचित असल्या शिवाय त्या समूहाला अनुसूचित जातीचे समजल्या जात नाही.
हा नियम केंद्र सरकार च्या जनगणनेसाठी बरोबर आहे परंतु सर्वेक्षण राज्य आयोग
करीत आहे. आणि महाराष्ट्र राज्यात बौद्धांना बौद्ध म्हणून 1960 पासून आरक्षण लागू आहे.त्या मुळे महाराष्ट्रात राज्य सरकार मार्फत बौद्धांची अनुसूचित जाती म्हणून जांगणना करायला हवी होती.परंतु तशी तरतूद आयोगाने केली नव्हती.त्या मुळे
प्रगणक माहिती घ्यायला आले की,स्वाभिमानी बौद्ध महार किंवा हिंदू महार म्हणून नोंद करतांना संतप्त होत असायचे. त्यांना अपमानित वाटत होते.त्या मुळे प्रखर आंबेडकरी बाण्याचे मंत्रालय कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे,मुंबई यांनी शिस्टमंडळासह
दिनांक 27 जानेवारी 2024 लां राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनिल शुक्र्रे साहेब यांची भेट घेऊन निवेनाद्वारे बौद्धांच्या भावना कळविल्या . बौद्धांची बौद्ध म्हणूनच अनुसूचित जाती म्हणून नोंद व्हावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. न्यायमूर्ती शुक्रे साहेबांनी लगेचच बौद्ध शिस्ट मंडळाची मागणी पूर्ण केली.आणि आयोगाच्या सदस्य सचिवांनी तातडीने दिनांक 25जानेवारी 2024 ला पत्र प्रकाशित केले व बुद्धिस्ट किंवा नवबौध्द अनुसूचित जाती अशी नोंद करनाऱ्यांची अनुसूचीत नोंद करण्यात यावी. असे जाहीर केले.
धर्मांतरित बौद्धांच्या
महाराष्ट्र राज्यातील आरक्षणाचा सविधनिक् इतिहास असा आहे की,
महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्ध हा समूह 1958 ला ओबीसी सूचित दाखल केला होता.
1958 साली अनुसूचित जातींमधून बौद्ध धम्मात धर्मातरीत बौद्धांना तत्कालिन जुन्या मुंबई प्रांत सरकारने इतर मागासवर्ग म्हणून दर्जा दिला. याकरिता शासन निर्णय हा दि. १७ जानेवारी १९५८ रोजी निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयाचा क्रमांक, श्रम व समाज कल्याण विभाग, एससीडब्ल्यू-२२५८ई होता. या आदेशानुसार तत्कालिन मुंबई प्रांतात त्यांना ‘इतर मागासवर्ग’ म्हणून घोषित करण्यात आले व त्यांना इतर मागासवर्गीयांना लागू असलेल्या सवलती देण्यात आल्या.त्या नंतर
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर महाराष्ट्र शासनाने, निर्णय, दि. ६ जुलै १९६०, एससीडब्ल्यू-२२६० द्वारे ‘अनुसूचित जाती तून धर्मांतरीत बौद्धांना’ संवैधानिक बाध्यता असलेल्या तरतुदी वगळता अनुसूचित जातीच्या इतर तरतुदी लागू होतील, असा निर्णय जारी केला.
१९६२ साली या समूहाची महाराष्ट्र शासनाने ‘अनुसूचित जातीमधून धर्मातरीत बौद्ध’ असल्याचे घोषित केले. याकरिता महाराष्ट्र शासनाने १ ऑक्टोबर १९६२ रोजी यता , शासन परिपत्रक, शिक्षण व समाजकल्याण विभाग, सीबीसी, १४६२/ या क्रमांकाचे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात नवबौद्धांना प्रमाणपत्र याचा नमूना देण्यात आला होता.
तेव्हा पासूनच
महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती साठी सवलतीचे परिपत्रक घोषित होतात तेव्हा त्यात अनुसूचित जाती व धर्मांतरित बौद्ध किंवा नवबौध्द असा उल्लेख असतो.
अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांना जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देणे या बाबत महाराष्ट्र राज्याचे नियम 2012 आहेत त्यात धर्मांतरित बौद्ध यांना
जातीचे प्रमाण पत्र देण्यासाठी वेगळा नमुना आहे.राज्य सरकारने हा नविन नमुना केल्या मुळे हा नमुना 7 म्हणून संबोधल्या जाते
.महार या अनुसूचित जातीने
1956 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात धर्मांतर केले.ते महार राहले नाहीत म्हणून त्यांना बौद्ध या समूह नावाने आरक्षण मिळावे ही बौद्धांची मागणी महाराष्ट्र राज्यातील तत्कालीन सरकारने मंजूर केली.त्या साठी तत्कालीन रिपब्लिकन नेत्यांनी सरकारला मागणी केली होती.त्या नुसार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मागणी पूर्ण केली.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील मागासवर्गीय समूहाची परिस्थिती तपासून त्यांना आरक्षनाचे प्रमाण सुचविण्यासाठी बी डी देशमुख समिती नियुक्त केली होती त्या समिती मधे आर डी भंडारे हे सदस्य होते. त्यांनी धर्मांतरित बौद्ध यांना आरक्षण मिळावे या साठी मोठा अहवाल सादर केला त्या मुळे बी डी देशमुख समितीने अनुसूचित जाती व धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग सुचविला व 13 टक्के आरक्षण सुचविले .सरकारने ते स्वीकारले. इत्यादी कारणाने महाराष्ट्र राज्याचे धर्मांतरित बौद्ध जात महार न लिहता धर्मांतरित बौद्ध म्हणून महाराष्ट्र राज्यातील योजनांसाठी आरक्षणास पात्र ठरले.तसे आरक्षण राज्य सरकार देत आहे.
महाराष्ट्र सरकारने बौद्धांना दिलेले आरक्षण चुकीचे आहे हे रद्द करा अशी याचिका एका उच्पवर्णीय नागरिकाने दाखल केली होती परंतु मुंबई ऊच्य न्यायालयाने14 जानेवारी 1986ला ती याचिका फेटाळून लावली.(गोपाळ कृष्ण चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र सरकार.88बॉम्बे.एल. आर.230)
हा निर्णय मुख्य न्यायमूर्ती लेंट्टीन यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला.त्यात न्या कुर्डू कर व न्या जामदार होते.
अशा रीतीने राज्य सरकारने धर्मांतरित बौद्ध यांना दिलेले आरक्षण न्यायालयाने
कायदेशीररित्या मान्य केले आहे.ही बाब 1990 च्या पूर्वीची आहे.
महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्ध समूहाला बौद्ध म्हणून आरक्षण दिले व देत आहे परंतु हा प्रवर्ग अनुसूचित दाखल करण्यात यावा अशी केंद्र सरकारला मागणी मात्र केली नाही व करीत सुद्धा नाही.हेही विशेष!
सूचित दाखल करण्याचे अधिकार संसदेला कलम 341नुसार आहेत.
राज्याच्या अनुसूचित जी जात किंवा प्रवर्ग
दाखल असतो त्यांनाच आरक्षण देता येते. राज्याच्या अनुसूची म्हणजे यादी किंवा लिस्ट .यात बौद्ध (अनुसूचीत जातीतून धर्मांतरित) हा प्रवर्ग दाखल करण्यासाठी राज्य सरकारने केन्द्र सरकारला शिफारस केली पाहिजे.परंतु राज्य सरकार 1958व 1960 पासून आरक्षण देत असूनहि तशी शिफारस मात्र करीत नाही. या साठी धर्मांतरित बौद्ध समूहाने सरकारला मागणी केली पाहिजे . कारण ही स्वस्नमान चळवळीचा कळीचा मुद्दा आहे.
धर्मांतरित बौद्धांच्या जनंआंदोलना मुळे 1990 ला केंद्र सरकारने बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती लागू केल्या परंतु अनुसूचित बौद्ध(अनुसूचीत जातीतून धर्मांतरित) हा प्रवर्ग दाखल केला नाही.त्या मुळे 1990ला आरक्षण लागू करूनही केंद्राच्या सवलती साठी अनुसूचित असलेल्या महार जातीचा उल्लेख करावा लागतो. महार जातीचा दाखला मागितल्या जातो.व केंद्र सरकार च्या जनगणनेत अनुसूचित जातीच्या नोंदी साठी महार नमूद केले तरच अनुसूचित जाती म्हणून नोंद होते.स्वाभिमानी बौद्धांना हे मुळीच आवडत नाही परंतु
केंद्र सरकारचे अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे म्हणून महार लिहणे भाग पडते.अशी परिस्थिती आहे.
शासन प्रशासनात जाण्यासाठी आरक्षण घेणे ही आजची गरज आहे.अद्याप धर्मांतरित बौध्द समूहातील फार मोठी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. बोटावर मोजण्याइतके लोकांची प्रगती झाली आहे.हे वास्तव आहे.त्या मुळे आहे त्या परिस्थितीत आरक्षण घेणे गरजेचे आहे.हीच व्यवहारिक ता आहे.परंतु त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न न करणे व अपमानित होत राहणे हे मात्र आंबेडकरी चळवळीच्या उद्दिष्ठ साठी विसंगत बाब आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”
हा मांग हा ब्राम्हण , हा शेणवी हा मराठा, हा चांभार हा कायस्थ हा पारशी, हा कोरी, हा वैश्य इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो”(संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड १९ पृष्ठ १) . या वरून हे स्पष्ट होते की,महार ही हिंदू धर्मातील जात आहे तरीही काही विद्वान महार जात व हिंदूचा काही संबंध नाही असा अपप्रचार करतात . अनुसूचित बदलासाठी कायद्यात दुरुस्तीची मागणी करीत नाहीत आणि महार ही हिंदू धर्मातील जात नाही म्हणून सांगतात . अशा जैसे थे वादी लोकांसाठी हा संदर्भ द्यावा लागला आहे.
संविधानाच्या अनुच्छेद 25 नुसार धर्म स्वातंत्र्य आहे.
पूर्वाश्रमीच्या महार या अस्पृश्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. धर्म स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क आहे.धर्मांतरित बौद्ध आता हिंदू महार नाहीत.हे वास्तव आहे. हा स्वसन्मान चळवळीचा पाया आहे.
संविधानाच्या उद्देशिकेत सुध्दा प्रत्येकाला प्रतिष्ठेचे जीवन देण्याची हमी दिली आहे. बौद्धांना सुद्धा प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे.तो घटनादत्त हक्क आहे.तो हक्क सरकारने द्यावा इतक्या मोठ्या लोक समूहाला इच्छेविरुद्ध महार लिहण्यासाठी बाध्य करू नये. या समूहाला कुणी महार किंवा महाऱ्या म्हटले तर तो चिडून जातो. अट्रोसिटी ची केस करतो. इतका प्रखर स्वाभिमान धर्मांतरित बौद्धांना आहे.
या विषयाच्या अनुषंगाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मते
महार नाव कसे पडले ते थोडक्यात बघू.
महार जाती नावाच्या उत्पत्ती बाबत अनेकांनी अनेक मोठ मोठे दावे केले परंतु
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जो
इतिहास किंवा जो तर्क मान्य केला व मांडणी केली ती अंतिम असते.कारण त्यांच्या इतके विद्वान कुणी झाले नाही.ते आमचे आदर्श आहेत तसेच या महार जाती विषयी त्यांच्या इतका कुणी अभ्यास केला असेल असे मला तरी वाटत नाही.म्हणून ते म्हणतात ती पूर्व दिशा असे मी मानतो.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक शोध निबंध लिहला त्याचे नाव आहे महार पूर्वी कोण होते व ते अस्पृश्य का झाले?.त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे की.इतिहासकार डॉ भांडारकरांचा शोध असा की,
महार नावाची उत्पत्ती
मृत मासाचा आहार करतात म्हणून महार नाव दिले . ही बाब डॉ
बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “हिंदुत्व आमच्या पूर्वजांवर लादले व त्यांचा नाइलाज होता”.हे
डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण व लेखन खंड 17(2)पृष्ठ 137 ते150 मध्ये आहे.
याच शोध निबंधात
डॉ बाबासाहेब आंबेडकर ,
“इतिहासकार विल्सन यांची थियरी नाकारतात. विल्सन म्हणतात
महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र किंवा राज्य असे
मि. विल्सन च्या थेअरी नुसार आहे परंतु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विल्सनच्या थेअरीला हाणून पाडतात आणि म्हणतात
“महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र नसून महान राष्ट्र असा त्याचा अर्थ होतो”
आणि मृत आहार करण्यावरून महार नाव पडले ही बाब स्वीकृत करतात. महार नावाचा उदो उदो करणाऱ्यांनी एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 17(2)पृष्ठ 137 चस्मा लावून वाचले पाहिजे.
महार नावा बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर
काय म्हणाले तेही बघू.
३१ मे, १९३६ रोजी महार इलाखा परिषद मुंबई येथे डॉ. बाबासाहेब म्हणाले, “महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून महार जातीमध्ये स्वाभिमान जागृत होण्यास सुरुवात झाली. ‘महार’ या जाती नावामुळे आपल्याला हीन लेखतात, ही जाणीव झाल्यामुळे समाजातील काही लोक स्वत:ची जात ‘चोखामेळा’ किंवा ‘हरिजन’ असे सांगू लागले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल, तोपर्यंत तुम्हाला या नामांतरापासून काही अर्थ नाही. ख्रिस्ती म्हणवून घेणे, बौद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मांतर आहेच, पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गंधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे. चोखामेळा, हरिजन याला जुन्या नावाची घाण लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला नामांतरापासून काही अर्थ नाही. नावाला नामांतर करावेच लागेल. कारण हिंदू म्हणवून चालणार नाही. कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज हे नाव, उद्या ते नाव, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये, असा माझा प्रश्न आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणावरुन धर्मांतरामागचा महत्त्वाचा उद्देश स्पष्ट होतो की, धर्मांतरामुळे जातीचे नाव महार, मांग, चर्मकार इत्यादी नष्ट होईल. ज्यामुळे अस्पृश्यांना कुणी तुच्छ लेखणार नाही.
दुसरे उदाहरण असे.
३१ मे, १९३७ रोजी कुर्डूवाडी, जि.सोलापूर येथे महार व मातंग समाजाच्या लोकांसमोर “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “महार किंवा मांग या नावात काय आहे की, त्यात तुम्हाला अभिमान वाटावा? या नावाने असा कोणता ज्जवल इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की, जुनी परंपरा चालू ठेवण्यास तुम्ही झटावे? सर्व समाज या नावाला तुच्छ लेखीत आहे. तुम्हाला आज उकिरड्यावरील कचऱ्याची देखील किंमत नाही. तेव्हा या नावाचा अभिमान न बाळगता आपले दोन्ही समाज एका वरवंट्याखाली चिरडले जात आहेत, हे जाणले पाहिजे.”
यावरून हे स्पष्ट होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार किंवा मांग या पूर्वाश्रमीच्या जातीच्या नावाचा उल्लेख नको होता ,या नावांना इतर समाज तुच्छ लेखतो. कचऱ्याचीदेखील किंमत नाही, असा स्पष्ट उपदेश त्यांनी केला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चळवळीला आत्म सन्मान चळवळ म्हणतात. या चळवळीत जर हा कळीचा मुद्दा लक्षात येत नसेल तर आत्मसन्मान चळवळ
समजली की नाही या वर शंका निर्माण होते.धम्मचक्र गतिमान करण्यासाठी बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळाले पाहिजे.सामाजिक दृष्टीने मागास असल्यामुळे
आरक्षण ही धर्मांतरित बौद्धांची गरज आहे. धर्मांतरा नंतर गेलेले आरक्षण संघर्ष करून 1990 ला 30 वर्षाने मिळाले,पण महारच लिहावे लागत असेल तर काय फायदा झाला,?
धर्मांतरित बौद्ध आता महार नाही . बौध्द धर्मात जाती नाहीत.हे तर सत्य आहे परंतु 1990च्या तरतुदी नुसार धर्म बौद्ध व जात महार लिहावे लागते .म्हणजे सरकार खोटे बोलायला लावते.
केन्द्र सरकारचा जातीच्या दाखल्याचा
नमुना आहे.त्यात
अमुक व्यक्ती महार आहे असा उल्लेख असतो.केंद्र सरकार मधे हाच दाखला स्वीकारतात. महाराष्ट्र सरकारने धर्मांतरित बौद्धांसाठी जातीचा दाखला नमुना 7 केला आहे.ज्यात अमुख व्यक्ती महार होती आता धर्मांतरित बौद्ध आहे.असा उल्लेख असतो हा जातीचा दाखला फक्त महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयात स्वीकारल्या जातो केंद्र सरकारचे विभाग स्वीकारीत नाहीत.जनगणना सुद्धा केंद्र सरकार करीत असते.
धर्मांतरित बौद्ध आहेत तर सरकारने या नावाने आरक्षण द्यावे.तशी कायद्यात तरतूद करून द्यावी. धर्मांतरित बौद्ध हा पूर्वीच्या महार अनुसूचित जातीतून निर्माण झालेला प्रवर्ग आहे ती जात किंवा धर्म नाही. आरक्षण एखाद्या जातीलाच नाही तर प्रवर्गला सुद्धा आरक्षणाची कायद्यात तरतूद आहे.
संविधान कलम 341 नुसार नविन समूह धर्मांतरित बौद्ध या नावाने केंद्र सरकार आरक्षण देऊ शकते व कायद्यात सुधारणा करू शकते पण त्या साठी स्वाभिमानी बौद्धांनी एकजुटीने तशी मागणी केली व जोरदारपणे चळवळ केली तरच ते होवू शकते.
महार हे शुर होते यात काहीच शंका नाही.ते नागवंशीय होते .तो वंश शुर आहेच.परंतु आता वंश महार राहला नाही तर बौद्ध झाला आहे त्यामुळे बौद्ध म्हणूनच अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे.समाज धुरिणांनी सरकार कडून ही मागणी पूर्ण करून घ्यावी. परिवर्तन करून घेणे यालाच चळवळ म्हणतात.
१९९० ला बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती देण्यात आल्या परंतु अनुसूचित बौध्द (अनुसूचीत जातीतून धर्मांतरित) हा प्रवर्ग दाखल केला नाही म्हणून ही समस्या आहे. स्वसन्मान चळवळीची धुरा सांभाळनाऱ्या आंबेडकरी अधिकारी,पुढारी, कार्यकर्ते, लेखक, विचारवंत यांनी हा स्व सन्मान चळवळीतील कळीचा मुद्दा सरकार कडून सोडवून घेतला पाहिजे.
अनिल वैद्य
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत