भारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

राम मंदिराच्या उभारणीबद्दल ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी फार मार्मिक विश्लेषण केलं आहे.

राजकीय आणि सार्वजनिक जीवनात धर्म जर इतका Dominant होत असेल तर ते चांगलं नाही, असं रामचंद्र गुहा यांचं म्हणणं आहे.

पाकिस्तान, बांगलादेश या देशांत धर्म इतका महत्त्वाचा झाला की त्यामुळे या देशांची प्रगती राहून गेली.

श्रीलंकेमध्ये जर अस्मितांच्या नावाखाली यादवी माजली नसती तर श्रीलंका आज एक प्रगत राष्ट्र बनली असती आणि तिथे बंगळुरूसारखे आयटी पार्क बनले असते.

त्याचवेळी सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया या देशांनी धर्माचं अवडंबर माजवलं नाही आणि आज ते देश कुठे आहेत !

इराणचं उदाहरण तर अवघ्या जगासमोर आहे. इराणमध्ये धर्मसत्ता येण्याआधी जागतिक दर्जाची विद्यापीठं होती. महिलांना सर्व अधिकार होते. पण नंतर काय झालं ते आपण बघितलं याचीही गुहा आठवण करून देतात.

भारताला कोणत्या देशांचा आदर्श ठेवायचा आहे ते आपण ठरवावं, असं त्यांचं म्हणणं आहे.

रामचंद्र गुहा हिंदुत्वाबद्दल खूपच interesting मुद्दा मांडतात. त्यांच्या मते आपली परंपरा ही आपली श्रद्धा वैयक्तिक स्वरूपात जपण्याची आहे. अध्यात्मिकता जपून, ध्यानधारणा करून आपण शांततेमध्ये आपली श्रद्धा जपतो.

मोठ्या समूहाने एकत्र येऊन पूजाअर्चा करण्याची आपली परंपरा नाही. अशी पद्धत इस्लाम आणि ख्रिश्चनधर्मियांमध्ये आहे. म्हणूनच अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली मोठ्या समूहाने एकत्र येणं ही आपली इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मियांना दिलेली प्रतिक्रिया तर नाही ना ? याचाही विचार व्हायला हवा.

महात्मा गांधींची रामावर श्रद्धा होती पण म्हणून त्यासाठी भव्य मंदिर उभारावं असं त्यांना कधी वाटलं नाही. गांधीजींच्या एका ख्रिश्चन अनुयायाने आदिवासींमध्ये जाऊन धर्मांतराला विरोध केला. त्याची चर्चेने हकालपट्टी केली. तेव्हा गांधी त्याला म्हणाले, चर्च ही जर पृथ्वी असेल तर तुझा धर्म हे आकाश आहे. माणसांची सेवा करण्यासाठी तुला चर्चची गरज नाही.

अध्यात्मिकता आणि सौंदर्यशास्राच्या दृष्टीनेही राम गुहा यांना हे मंदिर योग्य वाटत नाही. आपल्या कितीतरी प्राचीन मंदिरांमध्ये जो अध्यात्मिकतेचा आणि सौंदर्याचा अनुभव येतो तो या मंदिरात येईल का याबद्दल राम गुहा यांना शंका वाटते.

मध्ययुगामध्ये भारतात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बाबराने मशीद बांधली. आज इतक्या वर्षांनी, एकविसाव्या शतकात मोदी आणि भाजपचे नेते हेच करत आहेत, असा गुहा यांचा आरोप आहे. आपण जगासमोर हे भव्य मंदिर सादर करून काय सांगू पाहतो आहोत? असा त्यांचा प्रश्न आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतात ज्या दंगली झाल्या त्यात हजारो निरपराध माणसं मारली गेली. त्यात मुस्लीम समुदायाच्या लोकांचा जास्त बळी गेला. अशा ठिकाणी मंदिर बांधून आपण काय सिद्ध करू पाहतोय असा सवाल ते विचारतात.

याठिकाणी हिंदू मुस्लीम सौहार्दाचं प्रतीक म्हणून राम रहिम दरवाजा तरी असावा अशी एक सूचना होती. ती धुडकावून लावण्यात आली याची गुहा आठवण करून देतात.

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या प्रदर्शनामुळे भारताची लोकशाही आणि विविधतेची परंपरा धोक्यात आली आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

एवढं भव्य राम मंदिर असणाऱ्या देशात मु्स्लीम, शीख, पारसी, अशा विविध धर्मांचा आदर राखला जाईल का ? असं राम गुहा विचारतात.

राम मंदिराबद्दल टेलिग्राफ मध्ये लेख लिहिला तेव्हा वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचे मला मेल आले, असं त्यांनी सांगितलं आहे. कुणीतरी त्रिशूळ हातात घेऊन जय बजरंग बली म्हणतं तेव्हा आम्हाला असुरक्षित वाटतं, असं या लोकांचं म्हणणं आहे.

शिक्षण, आरोग्य याला प्राधान्य देण्याऐवजी आपल्याला फक्त एकाच धर्माला प्राधान्य
द्यायचं आहे. आणि भाजपच्या या अजेंड्यामुळे अगदी काॅंग्रेस, जनता दल सेल्युलर, भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षांनीही अशा बेगडी हिंदुत्वाचा आसरा घेतला आहे हेही रामचंद्र गुहा नमूद करतात.

या मुलाखतीत पुन्हापुन्हा ते गांधी, आंबेडकर यांच्या विचारांची आठवण करून देतात आणि आपण या विचारांपासून दूर चाललो आहोत, अशी खंत व्यक्त करतात.

राम मंदिराच्या उभारणीनंतर भारत कसा असेल असं करण थापर यांनी विचारलं तेव्हा रामचंद्र गुहा म्हणाले, सांगता येत नाही… पण देशभरातल्या विविध परंपरा, आपली दैवतं, श्रद्धा हे सगळं सोडून या देशातल्या लोकांनी एकाच मंदिरामध्ये जाण्याचा ध्यास घ्यावा, असा संदेश यामध्ये असेल तर भारताचं भवितव्य वर्तवणं कठीण आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!