आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३६

समाधी
समाधीमध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे तीन मार्ग येतात. यापैकी सम्यक व्यायाम या मार्गाची माहिती मागील भागात घेतली आहे. या भागात पुढील मार्गाची माहिती घेऊया.
२) सम्यक स्मृती
अष्टांगिक मार्गातील सातवा मार्ग सम्यक स्मृती हा आहे. सम्यक स्मृती म्हणजे योग्य प्रकारे स्मरण करणे, मनाची जागरुकपणा व विचारीपणा होय. जीवनामध्ये जे कार्य करावयाचे आहे ते जागरुकतेने करायचे असते, हीच स्मृती आहे. सम्यक स्मृती दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवते.
भगवान बुध्दांनी कामतृष्णेपासून आणि त्याच्या दुष्परिणामापासून दूर राहाण्यासाठी सम्यक स्मृतीचे महत्व सांगितले आहे. मनुष्याने सदा स्मृतीमान राहून कामतृष्णेचा त्याग करावा.
संयुक्त निकायात सांगितले आहे की, स्मृतिमान व्यक्तीचे सदा कल्याण होत असते. स्मृतीमान व्यक्ती सुखाच्या आधीन राहतो. असा व्यक्ती श्रेष्ट जीवन जगत असतो. जो स्मृतीमान असतो तो वैरापासून मुक्त असतो. स्मृतीचा अभ्यास करण्याने जीवनातील अत्युच्च पद म्हणजे निर्वाण प्राप्त करण्यास मदत होते. प्रत्येक क्षणी स्मृतीमान राहिल्याने त्याच्याकडून वाईट कृत्य घडण्याचा शक्यता फारच कमी असते. स्मृती वाईट आणि चांगले जाणत असते. तसेच स्मृती माणसांच्या विकारांना जाणत असते. तृष्णेच्या आहारी जाणारे दु:खाला बळी पडत असतात. मिथ्या आचरण, मिथ्या दृष्टी, मिथ्या वाचा, मिथ्या कर्म याबाबत स्मृती जागृत ठेऊन जीवन जगणारे सुखी व आनंदी राहत असतात.
बुध्दांचा धम्म माणसासाठी असून माणसातील विकारांना नष्ट करुन त्याला एक चांगला माणूस बनविणे हे धम्माचे ध्येय आहे. हे ध्येय तेव्हाच साध्य करता येते जेव्हा तो स्मृतिने युक्त असे आचरण करतो.
मज्झिम निकायमध्ये सतिपठान सुत्तामध्ये चार प्रकाराचे स्मृती सांगितल्या आहेत.
१)कायानुस्मृती,
२)वेदनानुस्मृती,
३)चित्तानुस्मृती व
४) धम्मानुस्मृती
या सुत्तामध्ये भगवान बुध्द म्हणतात, “भिक्षूंनो, हे जे चार स्मृतीप्रस्थाने आहेत ते स्वत:च्या विशुध्दीसाठी, शोक कष्टाच्या अस्तासाठी, दु:खाला दूर करण्यासाठी, सत्याच्या प्राप्तीसाठी, निर्वाणाच्या प्राप्ती आणि साक्षात्कारासाठी एक मात्र मार्ग आहे.” सतिपठानतील सती म्हणजे स्मृती. स्मृतीमध्ये प्रस्थापित होणे, स्मृतीमध्ये राहणे म्हणजेच कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या स्मृतीचा सराव करणे होय. या कायेच्या, वेदनेच्या, चित्ताच्या व धम्माच्या प्रती सतत जागृत राहणे होय. यालाच अनुपस्यना करणे असे म्हणतात. अनु म्हणजे सतत व पस्यना म्हणजे पाहणे, अनुभव घेणे होय.
कायानुस्मृती म्हणजे कायेबद्दल (काया म्हणजे शरीर) स्मृती ठेवून, आळस सोडून उद्धोगशील, ज्ञानयुक्त स्मृतिमान बनून राग, लोभ, मोह व द्वेष यास काढून जागृतीपूर्वक कायेची स्मृती ठेवणे होय. जसे चालताना चालत आहे, बसताना बसत आहे, उठत असताना उठत आहे, झोपलेले असताना झोपले आहे याची जाणीव ठेवणे होय. रोजच्या जीवनात आपण कायेबद्द्ल अजागृत असलो तर अकुशल कर्म घडू शकतात. म्हणून कायेबद्दल बाह्यस्वरुपात जागृत असावे लागते. अंतरंगात मात्र श्वासाद्वारे कायेचे जागृती ठेवावी लागते. आपल्या मनात ज्या काही भावना उमटतात, त्यावर शरीर श्वासाद्वारे प्रतिक्रिया देत असतात. जसे राग आल्यास श्वास जोरात चालतो. आनापानसतीमध्ये श्वास आत घेणे व श्वास बाहेर सोडणे ही क्रिया होत असते. जो एक विपश्यनेचा भाग आहे. विपश्यनेमध्ये श्वास आत घेणे व श्वास बाहेर सोडणे या क्रियेबद्दल जागृत राहावे लागते. तो श्वासाच्या उदय आणि लयाला जाणतो. श्वासाच्या प्रत्येक संस्काराला जाणतो. शरिराच्या अनित्य स्वभावाला जाणत असतो. शरीरइंद्रियाच्या आसक्तीला दूर ठेवतो. जसे आपले डोळे हे इंद्रिय, निसर्गातील एखाद्या सुंदर फुलाकडे आकर्षित झाल्यावर तो मोहित होतो व ते फुल तोडण्याची क्रिया आपले शरीराच्या हाताद्वारे करीत असतो. आपण जर श्वासाद्वारे स्मृतिमान असलो तर अश्या आसक्तीपासून, ‘मी, माझे’ अश्या अनात्मतेपासून दूर राहू शकतो. आपण जर सदा स्मृतिमान राहिलो तर आपल्याकडून असे हे अकुशल कर्म घडणार नाही.
वेदनानुस्मृतीमध्ये आपल्या शरिरात इंद्रियाद्वारे वस्तूला स्पर्ष झाला की सुखद, दु:खद व असुखद-अदु:खद अशा संवेदना निर्माण होतात, तेव्हा अशा संवेदनाबाबत जागृत राहाणे होय. विपश्यनेमध्ये आपल्या शरीरातील आतील भागातील वेदनांची स्मृती विपश्यी जागृत ठेवीत असतो. तो वेदनानुस्मृतीचा सराव करीत असतो. वेदनेचा उदय व लय कळल्यानंतर वेदनेच्या कारणास जाणण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. हे जाणणे प्रज्ञेद्वारे शक्य होते.
चित्तानुपस्सनामध्ये चित्ताच्या स्वभावाला जाणल्या जाते. चित्त म्हणजे मन आणि विज्ञान (जाणीव) याचे समन्वय होय. काया, वाचा आणि मनाचा अनुभव विज्ञान घेत असते. चित्ताच्या स्मृतीमध्ये इंद्रिय कुशल आणि अकुशल कर्माला जाणत असतो. म्हणजेच चांगले काय आणि वाईट काय हे चित्तस्मृती ओळखत असते व त्याप्रमाणे आपल्या शरीराच्या अवयवाकडून काम करुन घेत असते. चित्त शरीराला आकार देत असते. चित्त ज्या प्रकारचे असेल, त्याप्रमाणे शरीर प्रतिक्रिया देत असते. चित्तस्मृती लोभ, द्वेष, मोह इत्यादी विकारापासून दूर जाण्यास मदत करते. बर्याच वेळा आपला वेळ आळसात, दुसर्यांचा द्वेष करण्यात, अस्वस्थतता व शंका-कुशंकामध्ये जात असतो. परंतु चित्त स्मृतीमुळे याचा लय होतो आणि चित्त शुध्द होते. म्हणून चित्ताबाबत सतत जागृत असणे म्हणजेच स्मृतिमान राहणे अत्यंत आवश्यक आहे.
धम्मानुस्मृतीमध्ये भगवान बुध्दांच्या चार आर्यसत्याच्या शिकवणूकीला जाणतो. तसेच त्यांच्या दु:ख, अनित्य आणि अनात्म या सिध्दांताला जाणतो. नामरुप स्कंधाला व त्याच्या कार्याला जाणतो.
म्हणून सतिपठान सुत्ताच्या या चार स्मृतीचा नियमीत अभ्यास करुन आचरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुष्य विमुक्तीची अवस्था प्राप्त करु शकतात.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१८.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत