मुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

बिलकीस बानो, भारत की बेटी!

संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.

सावित्री, फातिमा, जिजाऊ, अहिल्या या स्त्रियांचे चरित्र बिलकीस ने वाचल्याची शक्यता जवळजवळ नाहीच. बाबासाहेब, क्रांतीबा, ते भगतसिंग अन्यायाविरुद्ध धगधगत्या मशाली बिलकिस ला बिलकुल माहीत नसणार! गुजरात ची असल्याने सत्याग्रही गांधीबाबा ची माहिती जुजबीच असणार! तरीदेखील आपल्यावरील अन्याया विरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढले पाहिजे, स्त्रियांच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या पुरुषी लांडग्यासमोर स्वतःच शरीर घेऊन उभे राहिले पाहिजे, अशी प्रेरणा तिला कोठून मिळाली असेल? विकली गेलेली दलाल न्यायव्यवस्था आपणास न्याय मिळवून देईल का? हा प्रश्न उराशी घेऊन मोठ मोठी माणसे चुटकीसरशी गायब करणाऱ्या महाभयंकर माणसातल्या जनावरांच्या डोळ्यात डोळे भिडवून कशी ती उभी राहिली असेल? तिच्या शरीराचा कण आणि कण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कसा तयार झाला असेल?

21 वर्षाची गरोदर तरुणी. स्वप्ने उरात घेऊन सर्वसामान्य जगण्याच्या जद्दोजिहाद मध्ये मशगुल. दंगल होते. कुटुंबासह बाहेर पडते. संस्कारी जनावरे रस्ता अडवतात. कुटुंबातील सात निरपराध माणसांना क्रूरपणे मारून टाकतात. ती पाच महिन्यांची गरोदर तरुणी, तरुणीची आई, आणि इतर कुटुंबातील महिला अश्या पाच महिलांच्या वर पाशवी बलात्कार करतात. तत्पूर्वी तरुणीच्या हातून तिची तीनच वर्षाची मुलगी हिसकावून घेतली जाते. आणि चिमुकलीला आपटून ठार मारले जाते. आईसमोर!! ती कशीबशी वाचते. गुलाम योद्धा स्पार्टाकस होऊन अमर होण्यासाठी!

मार्च 2002 च्या घटनेनंतर पोलीस तिची FIR घेत नाहीत. 2003 ती जाते मानवाधिकार आणि सर्वोच्च न्यायालयात. 2004 साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयला केस दिली जाते. सीबीआय कडून आरोपींना अटक केली जाते. पण धमकीमुळे गुजरात ते मुंबई न्यायालयाकडे केस वर्ग केली जाते. 13 आरोपी पैकी 11 आरोपींचा दोष सिद्ध होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावले जाते. 2008 साली त्यांचेकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील केले जाते. 2017 साली उच्च न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली जाते. 2022 एक दोषी सर्वोच्च न्यायालयामध्ये 15 वर्षाची सजा भोगल्याने मुक्तता करण्यासाठी अर्ज करतो. सदरचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुजरात शासनाच्या “कैदी मुक्तता योजनेसाठी” पाठवला जातो. आणि 15 ऑगस्ट 2022 देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पाच महिलांच्यावर बलात्कार, सात खून, आणि चिमुकली मारली ती आठवी, इतर गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांची मुक्तता केली. आणि अशाप्रकारे बिलकिसला स्वातंत्र्य दिनाची भेट देण्यात आली. खुनी, बलात्कारी बाहेर आले नंतर औक्षण करून, मिठाई, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला जातो. हार तुरे घालून स्वागत केले जाते. हे सगळे “संस्कारी ब्राह्मण” असल्याने असे करणारच नाहीत, हे छाती ठोकपणे सांगितले जाते. 2014 ला स्वातंत्र्य मिळालेला भक्तांचा नवा भारत तो हाच. या निकालाविरुद्ध ती पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली. आणि आज 08 जानेवारी 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने या भारतच्या बेटीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यात गुजरात सरकारचा दोषींची सुटका करण्याचा आदेश रद्द करण्यात आला. दोन आठवड्यामध्ये आरोपींनी तुरुंगात हजर राहण्याचा आदेश देण्यात आले. खटल्याची सुनावणी गुजरात मधून महाराष्ट्रात हलवण्याची आदेश देण्यात आले. यावरून याचा निर्णय आता पुरोगामी महाराष्ट्रात लागेल असे दिसते.

वरील घटनाक्रमामध्ये तरुणीचे कुठले नाव नाही. गाव नाही. अगदी देशसुद्धा नाही. आता आपल्या कुटुंबातील एक नाव टाका आणि कल्पना करा. जर तुम्हाला त्रास होत असेल तर आणि तरच तुम्ही माणूस आहात. मी माणूस आहे. म्हणून याचा मला त्रास होतो. मला हे कुठेही नको आहे. आणि अशा भारताची कल्पना पण मी करू शकत नाही. म्हणूनच बिलकीस चा लढा हा फक्त तिचा लढा नाही. जो समस्त मानवजातीचा लढा आहे. तो सगळ्या स्त्रियांचा पुरूषी वखवखलेपणाविरुद्धचा लढा आहे. ज्या मूल्यावर भारत उभा आहे. त्या मूल्यांचा लढा आहे. तो संविधान जिवंत ठेवण्याचा, संविधानिक लढा आहे. म्हणूनच लढलाच पाहिजे आणि जिंकलाही पाहिजे. At an any Cost.

हीच आमची भारत माता आहे. जिवंत. न्यायाच्या प्रतीक्षेत.
मार्च 2002 ते जानेवारी 2023. 21 वर्ष

भारत माता की जय

फारूक गवंडी
सांगली

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!