निष्ठावान पिढीने बाबासाहेबांचे विचार प्रामाणिकपणे घराघरात पोहोचविल्यानेच आजचे चांगले दिवस !

- प्रा. आनंद देवडेकर
मुंबई रविवार: दि १७ डिसेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या चळवळीत सामील झालेली माणसं अशिक्षित वा अर्धशिक्षित असली तरी ती बाबासाहेबांप्रति निष्ठावान होती. स्वतःला आकलन झालेले डॉ. बाबासाहेबांचे समाजोद्धाराचे विचार त्यांनी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे घराघरात पोहोचविल्यानेच धम्मक्रांती यशस्वी होऊन आज समाजाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी भोईवाडा, मुंबई येथील बौद्धजन पंचायत समिती सभागृहात केले.
‘ संगमेश्वर तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक चळवळ: वास्तव आणि वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. आनंद देवडेकर यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुस्तकाचे लेखक वि. ल. मोहिते होते.
प्रा. आनंद देवडेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, १९३३ पासून २०२३ पर्यंतच्या नव्वद वर्षांच्या संगमेश्वर तालुक्यातील सामाजिक चळवळीच्या संघटीत प्रयत्नांचा सुरुवातीचा कालखंड निद्रिस्त समाजात जागृती निर्माण करण्याचा होता. तर १९५६ च्या धम्मदीक्षेनंतरचा कालखंड हा संक्रमणावस्थेचा कालखंड होता. त्या काळात मराठी भाषेत बौद्ध धम्माचं साहित्य उपलब्ध नसतानाही संगमेश्वर तालुक्यातील तेव्हाच्या सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी बौद्ध धम्म संस्कारांचं जे बीजारोपण केलंय त्याबद्दल आताच्या पिढीने कायम कृतज्ञ राहायला हवं. या कृतज्ञता भावनेतूनच संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघ, मुंबईचे विद्यमान अध्यक्ष वि. ल. मोहिते यांनी नव्वद वर्षांच्या वाटचालीचा इतिहास कार्यकर्त्यांच्या नावानिशी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकाद्वारे भावी पिढीला तालुक्यातील सामाजिक चळवळीचा ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध करून देण्याचं जे महत्त्वपूर्ण काम वि. ल. मोहिते यांनी केलं आहे त्यापासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी.
आजच्या वैचारिक आणि सांस्कृतिक संघर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेबांचं धम्म मिशन गतिमान करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. बौद्ध समाजाच्या नावानं काम करणाऱ्या संघटनांनी प्राधान्यक्रमाने याचा विचार करावा, असंही प्रा. देवडेकर आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे लेखक वि. ल. मोहिते यांनी संगमेश्वर तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजिक चळवळीचा इतिहास लेखनामागची पार्श्वभूमी सांगून १९३५ आणि १९३८ साली संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या सभांची माहिती दिली. त्या सभा घडवून आणणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील बावीस पुढाऱ्यांची माहिती या पुस्तकात आहेच शिवाय नव्वद वर्षांत तालुका संघटनेत झालेल्या स्थित्यंतराचा तपशीलही या पुस्तकात दिला असल्याचे वि ल नी सांगितले. तोच वारसा चालवणाऱ्या विद्यमान काळातील संगमेश्वर तालुका बौद्धजन सेवा संघ या संघटनेनं केलेल्या आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची सविस्तर माहितीही वि. ल. मोहिते यांनी यावेळी दिली.
बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आयु. लक्ष्मण भगत, तालुका संघाचे एकनाथ साळवी, अशोक अ. कांबळे, प्रकाश हरी कांबळे, भार्गव जाधव, देशराज तांबे, दीपक कांबळे, प्रकाश वि. कांबळे, डॉ अरुण मोहिते, डॉ.,नरेन्द्र कांबळे, यशवंत जाधव इ. चीही या प्रसंगी समयोचित भाषणं झाली.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक संघाचे सरचिटणीस आयु. शशिकांत गमरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. संघाचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाच्या तरुण व नवोदित पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत