हिटलर , आंबेडकर आणि माओ !


सुप्रसिद्ध जेष्ठ पत्रकार मा.रणजित मेश्राम.
शिर्षक वाचून कुणीही अचंबेल. मीही लिहितांना ! पण, तसे ते घेऊ नये. केवळ समकालीन. शिवाय जागतिक. एव्हढाच संबंध. अन् संदर्भ सुध्दा. १८८९ ला ॳॅडाॅल्फ हिटलर, १८९१ ला भीमराव आंबेडकर व १८९३ ला माओ त्से तुंग हे तिघेही महाचर्चित दोन दोन वर्षाच्या फरकाने जन्माला आले. तिघांचेही देश निराळे. पार्श्वभूमी निराळी. अडीअडचणी निराळ्या. तरीही, तिघेही आपापल्या देशात लोकनेते ठरत गेले.
यातल्या दोघांना राष्ट्रप्रमुख व्हायची संधी मिळाली. तिसऱ्यानेही प्रयत्न केले. पण अशक्य निघाले. ते दोघे मात्र, मृत्यूपर्यंत राजकीय सत्तेवर होते.
तिघांपैकी एकाने देश घडविला. एकाने देश घालविला. एकाने देशाला दिशा दिली.
तिघांच्याही जीवनात बाप हा प्रमुख घटक राहिला. बाप बाबतीत आंबेडकर धनी ठरले. आंबेडकरांच्या उत्तुंगतेची पायाभरणी बापाने केलीय.
यातुलनेत हिटलर व माओ दुर्दैवी राहिले. दोघांचेही बापलोक खूप संतापी होते. चड्डी ओली होईतो मारायचे. बापांमुळे दोघांचेही बालपण खडतर गेले. तिघांच्याही आई मायाळू होत्या. मुलांचाही आईवर जीव होता. माओ ची आई बौद्ध स्त्री होती.
हिटलर उपजत चित्रकार होता. माओ मात्र कवी ! आंबेडकरांना संगीताची जाण होती. तिघांचाही लोकनेतृत्वातून उदय झाला. तिघांत हिटलरचे वक्तृत्व मैदानी होते. त्याची देहबोली व संवादी वक्तृत्व तासनतास लोकांना बांधून ठेवी. द्वेषसूत्रात तो चपखल बांधे. तो पटवायचा. तो पेटवायचा. हाईल हिटलर .. हाईल हिटलर आरोळ्या लोकांत फुटत.
आंबेडकर आणि माओ यांच्या आंदोलनामागे विचारसूत्र होते. तो केवळ राज्यक्रांतीसाठीचा निनाद नव्हता. दास्यतेविरुध्दची मुक्ती होती. सत्ताप्राप्तीनंतर काय करु याची स्पष्टता होती. मात्र, दोन्ही विचारसूत्रात खूप फारकतता होती.
हिटलरचा बाप कस्टम अधिकारी तर माओचा बाप शेतकरी होता. आंबेडकरांचे बाप सैन्यात सुभेदार होते. तिघांच्याही आयुष्यात शहरी संस्कृती नंतर आली. त्यांच्या जन्मगावाची नावे हिटलर (ब्रानाऊ), माओ (चांगशा) व आंबेडकर (महू) अशी आहेत.
तिघात माओ अधिक जगले. ते ८३ वर्षे तर हिटलर (५६) व आंबेडकर (६५) वर्षे जगले. हिटलरला ‘फ्युरर’, माओला ‘चेअरमन माओ’ व आंबेडकरांना ‘बाबासाहेब’ ही ओळख लोकांनी दिली. तिघांचेही मृत्यूदिन सांगायचे तर, हिटलर (३० एप्रिल १९४५), माओ (९ सप्टेंबर १९७६) व आंबेडकर (६ डिसेंबर १९५६) हे आहेत.
१९३३ ला हिटलर जर्मनीचा चॅंसलर झाला. नंतर त्याने जगाची हाव केली. भयंकर अशा दुसऱ्या महायुद्धाचा तो उदगाता ठरला. त्यात गचकला. अवध्य .. अजेय .. अशरण .. फोकनाड निघाले.
सत्तेच्या बळावर क्रूरकर्मा प्रतिमा ठसविणारा लोकक्षोभापूढे आत्महत्येला प्रवृत्त झाला. केवळ धसका घेऊन ! तिथेच खलनायक म्हणून जगासाठी कायमची नोंद सोडून गेला !
१९३४ ला माओने लाॅंगमार्च काढला. सोबत एक लाख लोक होते. १९३५ ला तो चिनी साम्यवादी पक्षाचा प्रमुख झाला. शेतकरी हा विचारकेंद्राच्या अग्रावर यावा हा माओचा आग्रह असे. त्याने मार्क्सवादाला चिनी पेहराव दिला.
‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतून येते’ हे त्याचे आवडते सत्ता तत्वज्ञान होते. सांस्कृतिक क्रांतीशी त्याने स्वतःला बांधून घेतले होते. हातात भंगार मिळालेला चीन त्याने महासत्ता केला यात त्याचे कर्तृत्व अधोरेखित होते.
१९३६ ला आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची निर्मिती केली. तो तेव्हाचा लक्षवेधी राजकीय पक्ष होता. राजकीय दृष्ट्या यशस्वीही झाला होता. १९३७ च्या निवडणुकीत या पक्षाचे आंबेडकरांसह १४ जण निवडून आले होते. ते १४ ही संमिश्र समाजाचे होते. पूढे, विलक्षण घडामोडीत तो पक्ष गुंडाळायची आंबेडकरांवर बाध्यता आली. नंतर १९४२ ला आंबेडकरांना शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करावी लागली. त्यांनी स्वातंत्र्याच्या तीन महिने आधी संविधान सभेला दिलेले राज्यसमाजवादाचे राज्यसूत्र महत्त्वाचे होते.
ते कायदापूरक जगण्यावर व सामाजिक-आर्थिक समतेच्या महत्तेवर अपार प्रेम करायचे.धर्म असो की सत्ता ती माणसासाठी असते हे त्यांचे विचारसूत्र होते.
असा हा तिघांचा प्रवास. तिघांपैकी एकाचे त्याचे देशात पार विस्मरण झाले. दोन मात्र आपापल्या देशात स्मरणाच्या उंचीवर आहेत.
ती उंची रोजच्यारोज वाढतच आहे !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत