द. आफ्रिका विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी भारतीय टीम सज्ज ..!

भारतीय संघाच्या बहुचर्चित दक्षिण आफ्रिका दौऱ्याला आज, रविवारपासून ट्वेन्टी-२० मालिकेने सुरुवात होणार असून पहिला सामना डरबनच्या किंग्जमिड मैदानावर खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचा कस लागणार आहे.
जायंबदी असल्याने ट्वेन्टी-२० संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या या संपूर्ण दौऱ्याला मुकणार आहे. तसेच प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांच्या ट्वेन्टी-२० संघातील भविष्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंची मोट बांधण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ अशी सहज मात केली होती. मात्र, ही मालिका मायदेशात झाली होती. आता दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या मैदानांवर पराभूत करण्याचे भारतीय संघासमोर आव्हान आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेतील खेळपट्ट्या पूर्णपणे फलंदाजीला अनुकूल होत्या. आफ्रिकेतील खेळपट्ट्यांकडून मात्र वेगवान गोलंदाजांना मदत मिळणे अपेक्षित आहे. अधिक उसळी असणाऱ्या या खेळपट्ट्यांवर भारताच्या युवा फलंदाजांची कसोटी लागेल. त्याच वेळी भारताच्या वेगवान गोलंदाजांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची ही उत्तम संधी असेल. दोन्ही संघांनी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे या मालिकेत दमदार कामगिरी करून पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा युवा खेळाडूंना प्रयत्न असेल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत