बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सहा विद्वानांपैकी एक !... पत्रकार पंडित विव्हर्ली निकल्स

विव्हर्ली निकल्स हा ब्रिटिश पत्रकार, तो पत्रकारांमध्ये पंडित म्हणून त्याचा मान होता. त्याने जवळपास एक वर्ष भारतभर दौरा केला, अगदी बैलगाडीने सुद्धा व प्रसंगी पायी.◆ त्या अभ्यासदौऱ्यातून त्याने एक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कुणा भारतीय कदृ लोकांना आवडेल की न आवडेल, पण त्याने भारताच्या अनेक क्षेत्रांतील माहिती गोळा करून ती त्याच्या ग्रंथात दिली आहे. केवळ राजकारणात नव्हे; तर त्याने भारताची कला, संगीत, दवाखाने, वर्तमानपत्रे, सिनेमा व धर्म इत्यादी संबंधीही माहिती दिली आहे.◆ विव्हर्ली निकल्स याच्या ग्रंथाचे नाव *”व्हर्डीक्ट ऑफ इंडिया (भारतातील निवाडा)”* असे असून सदर ग्रंथ हा इंग्रजी भाषेत आहे. *”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत या ग्रंथात दिलेली आहे. डॉ. बाबासाहेबांचा त्याने सहा विद्वानांपैकी एक असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे*◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यावेळच्या काँग्रेस पुढाऱ्यांच्या कल्पना काही और होत्या. त्यातून बाबासाहेबांच्या *पुढारपणा* बद्दलच्या त्यांच्या कल्पना तर विचारूच नका. भारतीय घटना समिती अजून सुरू व्हावयाची होती. त्याआधी सरदार वल्लभभाई पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर जो पत्रव्यवहार केला होता, त्यामध्ये अशा काही कल्पना दिसून येतात की त्या नमूद करण्यापूर्वी, हे पत्रकार पंडित विव्हर्ली निकल्स डॉ. बाबासाहेबांच्या पुढारपणाबद्दल आपल्या ग्रंथात काय म्हणतात, ते येथे नमूद केल्यास बरे होईल!◆ विव्हर्ली निकल्स लिहितात :- – “काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्काला आव्हान देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची एखादीही जाहीर सभा जे ऐकतील ते तसे आव्हान देण्याच्या भानगडीत पडणार नाहीत” – उदाहरणादाखल, पत्रकार लेखकाने नागपूरच्या जाहीर सभेचा उल्लेख केला आहे. “त्या सभेत, अंत:करणपूर्वक ज्या उत्कंठतेने जनतेने बाबासाहेबांना साथ दिली त्यामुळे गांधींना देखील आंबेडकरांचा हेवा वाटला असला पाहिजे,” असे त्याने आपल्या ग्रंथात नमूद केले आहे.◆ डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तृत्वाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकताना, सदर विदेशी पत्रकार पंडित म्हणतो:– “डॉ. आंबेडकर जाहीर सभेत जनतेसमोर भाषण करतात त्यावेळी सर्व जनताच खडबडून जागी होते. जनतेत ते सामर्थ्य निर्माण करतात आणि बोलतांना ते असे मुद्देसुद बोलतात की काही विचारू नका.”◆ काँग्रेसचे पुढारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तृत्वाची सदर लेखकाने मोठी मार्मिक तुलना केली आहे, त्या बाबत हा लेखक म्हणतो:– “काँग्रेस पुढाऱ्यांच्या सरासरीच्या वक्तृत्वाशी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाची तुलना करावयाची म्हटले तर, काँग्रेस पुढाऱ्यांचे भाषण हे “हिंदू-लोक म्हणत असलेल्या मंत्राप्रमाणे” असते; तर डॉ. आंबेडकरांचे भाषण हे “पिस्तुलातून सटासट सुटणाऱ्या गोळ्याप्रमाणे” असते!★ त्यामुळे *भारतातील सहा विद्वानांपैकी एक असणारे डॉ. आंबेडकर, हे भारतात ज्यांचा जास्तीत जास्त द्वेष केला जातो, त्यापैकी एक असेही ते ठरले गेले आहेत!* असे उद्गार लेखक पत्रकार पंडित यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे. = भीमराव तायडे, नांदुरा (जिल्हा: बुलडाणा) 9420452123【संदर्भ : समग्र आंबेडकर चरित्र या ॲड. बी. सी. कांबळे यांच्या ग्रंथावरून संपादित】
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत