भगवान बुद्धांची शिकवण-भाग ६३

अधम्म म्हणजे काय?
ब्रम्हावर आधारित धम्म हा अधम्म आहे
भगवान बुद्धांचे म्हणणे असे होते की, कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. ह्या प्रमाणाचे ‘प्रत्यक्ष’ आणि ‘अनुमान’ असे दोन प्रकार आहेत. (perception and inference)
भगवान बुद्धांनी वासेट्ठाला प्रश्न केला, “कोणी ब्रम्ह प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रम्ह पाहिले आहेस काय? तू ब्रम्हाबरोबर बोलला, संवाद केला आहेस काय? तुला ब्रम्हाचा वास आला आहे काय?” वासेट्ठाने उत्तर दिले, “नाही.” ब्रम्हाच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे. ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. भगवान बुद्धाने प्रश्न केला, “कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रम्हाचे असणे (अस्तित्व) अनुमानायचे?” याचेही उत्तर मिळाले नाही.
काही लोक म्हणतात की, वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते. म्हणून ते म्हणतात की, ब्रम्ह अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभवाला स्थापन करण्यासाठी केलेले आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की, वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज (electricity) हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे. परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरूर आहे. तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज (electricity) अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. वीजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण वीजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रम्ह, दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की, ‘कोणतीच नाही.’
दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी एक पद्धत आहे की, काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील ‘कल्पना’ (Fiction) असते. आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला (Legal fiction) मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण ‘या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात’ हे आहे. ब्रम्ह ही सुद्धा एक कल्पना आहे; परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासेट्ठ आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते, ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्ठाकडे वळून बुद्धांने विचारले, “तुम्ही ब्रम्ह पाहिले आहे काय?” “तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राम्हणांमध्ये एक तरी ब्राम्हण असा आहे काय, की ज्याने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे?”
“नाही गौतमा, निश्चित पाहिले नाही.”
“त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राम्हणांच्या एका तरी गुरूने ब्रम्ह प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय?”
नाही गौतमा, “निश्चित पाहिलेले नाही.”
“वासेट्ठ, त्या ब्राम्हणांच्या सात पिढ्यांत एक तरी ब्राम्हण असा झाला काय, की ज्याने ब्रम्ह समोरासमोर पाहिले?”
“नाही, गौतमा, निश्चित पाहिलेले नाही.”
“ठीक वासेट्ठ! ब्राम्हणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय, की आम्ही ब्रम्ह जाणतो, आम्ही ते कुठे आहे -इथे आहे की तिथे आहे- ते पाहिलेले आहे?”
“नाही, गौतमा, नाही!”
बुद्ध त्या दोन ब्राम्हण तरुणांना प्रश्न विचारीत राहिले.
“मग वासेट्ठा, तुला असे वाटत नाही काय, की यावरून त्या ब्राम्हणाच्या ब्रम्ह असल्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या?”
“वासेट्ठा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्यापुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही. त्याप्रमाणेच, मला वाटते, ह्या ब्राम्हणांचे शब्द त्या आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्राम्हणांचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यांत काही अर्थ नाही.”
“वासेट्ठ, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणा-या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारणार, “मित्रा, ज्या अति सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वांछा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय आहे, की ब्राम्हण आहे, की वैश्य आहे, की शूद्र आहे?आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो ‘नाही’ असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, ‘बरे, मित्रा, जी सर्व प्रदेशातील अति सुंदर स्त्री आहे. जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची वांछा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे, की ठेंगणी आहे, की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे, की गव्हाळ वर्णाची आहे, की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते?’ परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो ‘नाही’ असेच उत्तर देणार. वासेट्ठ, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय, की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे?”
ते दोन्हीही ब्राम्हण तरुण बोलले,
“होय, खरोखर तसेच आहे.”
यास्तव ब्रम्ह हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा उपयुक्त नाही.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१४.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग चवथा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत