“मुंबईसह ठाणे जिल्ह्यात झाला मूसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान.”

मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी पहाटे आणि संध्याकाळी गडगडाटासह पाऊस कोसळला. रविवार सुट्टी असल्याने साखर झोपेत असलेल्या मुंबईकरांना ढगांच्या गडगडाटाने जागे केले. त्यानंतर दुपारभर मुंबईचे आकाश पावसाळलेले होते. मात्र संध्याकाळी ते पूर्णपणे काळवंडले आणि पाऊस सुरू झाला. परिणामी, बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. ठाण्यात पावसामुळे काही भागांत विद्यात पुरवठा खंडीत झाला, तर रात्री वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी झाली. भिवंडीतील काल्हेर भागात रविवारी सकाळी ७च्या सुमारास काशीनाथ पार्क या इमारतीवर वीज कोसळून आग लागली. यात जीवितहानी झाली नसल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याण, डोंबिवली भागातही अवचित कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांचा तारांबळ उडाली. काही बाजारपेठा ओस पडल्या. शहापूर, मुरबाड आणि भिवंडीच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांची भात मळणीची कामे सुरू आहेत. पावसाने मळणी केलेल्या भाताचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांवरील पत्राची छप्परेही उडाली. टेंभुर्णी गावात एका शेतकऱ्याचे घर कोसळले. शहापूरच्या समर्थ नगर भागात एका रहिवाशाच्या घरावर झाड कोसळले. आदिवली भागात गारपीटीसह पाऊस कोसळला, असे ग्रामस्थ वसंतकुमार पानसरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात रविवारी पहाटे आणि सायंकाळी पाऊस कोसळला. ठाणे शहरात सायंकाळी आकाश काळवंडले आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. रविवार असल्याने शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती. तरीही पावसामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत