महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीय

सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील :बुद्धिवादी जनमानस घडवणारा मोलाचा ग्रंथ

डॉ. अनंत दा. राऊत

‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटीलजीवनकार्य आणि लेखन समीक्षा’ हा डॉ.जी. ए. उगले यांचा ग्रंथ अलीकडेच डॉ. सुधाकर शेलार, डॉ. शिरीष लांडगे आणि अन्य प्राध्यापक व कार्यकर्त्यांनी मिळून प्रसिद्ध केला आहे.समाज प्रबोधनाच्या निखळ भूमिकेतून अर्थ सहाय्यक करत एखाद्या लेखकाचा ग्रंथ प्रसिद्ध करणे ही बाब फार गौरवास्पद अशी आहे.

आधुनिक भारतातील समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतीराव फुले यांनी शोषण व विषमतेला नाकारून समता प्रस्थापित करू पाहणारी जी चळवळ उभी केली होती, तिला सत्यशोधक चळवळ असे म्हटले जाते. ही चळवळ केवळ सत्यशोधक नव्हती तर प्रचलित समाज व्यवस्थेत वरच्या स्थानी बसलेल्या लोकांच्या तोंडावरचे दांभिकतेचे बुरखे फाडणारी होती. त्यांची लबाड लांडगी शोषक वृत्ती उघड करणारी होती.देवधर्म या जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या संकल्पनांचा आधार घेऊन शोषण करणाऱ्या तत्कालीन ब्राह्मणांच्या विरुद्ध बंडखोरी करायला लावणारी होती. धर्मामध्ये ब्राह्मणांनी घुसडलेले असत्य उघडे पाडणारी आणि माणसांच्या कल्याणासाठीचा खरा सत्यधर्म काय असतो याची प्रगल्भ मांडणी करणारी होती.

कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतीराव फुले यांचे सत्यशोधक चळवळीतले महत्त्वाचे सहकारी होते.मुकुंदराव पाटील हे कृष्णराव भालेकर यांचे सुपुत्र. त्यांना त्यांच्या आत्याकडे दत्तक दिलेले होते. वडिलांच्याप्रमाणेच ते ध्येयवादी मनोवृत्तीचे होते. जीवनाच्या अंतिम क्षणी कृष्णराव भालेकरांनी मुकुंदरावांना सांगितले की “तू ‘दीनमित्र’ हे पत्र निदान बारा वर्षे चालवले पाहिजे.”मुकुंदराव पाटलांनी ‘दीनमित्र’ हे पत्र आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे केवळ १२ वर्षे चालवले नाही तर तब्बल ५८ वर्षे चालवले. हा परिवर्तनवादी ध्येयवादाने प्रेरित झालेल्या मराठी पत्रकारितेचा फार मोठा मानबिंदू आहे. ‘दीनमित्र’ हे नियतकालिक चालवण्यासाठी मुकुंदराव पाटलांनी केलेल्या प्रचंड मोठ्या काबाडकष्टाचा परिचय या ग्रंथातून होतो. त्याचबरोबर त्यांच्या एकूणच सामाजिक कार्याचा प्रत्ययही येतो.मुकुंदराव पाटलांच्या उदात्त अशा ध्येयधुंद व्यक्तिमत्त्वाच्या अनेकविध पैलूंचे दर्शन या ग्रंथातून घडते. महात्मा ज्योतीराव फुले आणि कृष्णराव भालेकर यांचा सत्यनिष्ठ व बुद्धिवादी वारसा मुकुंदराव पाटलांनी किती निष्ठेने पुढे चालवला हे या ग्रंथातून अनेकविध तपशीलांच्यासह कळून येते.मुकुंदराव पाटील हे प्रखर बुद्धिवादी विचारवंत जसे होते तसेच ते कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार व सिने पटकथाकारही होते. त्यांचे ‘दीनमित्र’ मधील अनेक वैचारिक लेख सदर ग्रंथात वाचावयास मिळतात.डॉ. जी.ए. ‌उगले यांनी या ग्रंथातून मुकुंदराव पाटलांच्या वैविध्यपूर्ण लेखनाचा अत्यंत चांगल्या प्रकारे परिचय करून दिलेला आहे.इथल्या समाज व संस्कृतीतील दांभिकांच्या ढोंगी वृत्तीवर मुकुंदराव पाटील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रमाणेच वैचारिक असुडाचे फटके मारत होते. कुलकर्ण्यांच्या धुर्त अशा शोषक लीला त्यांनी जशा मांडल्या त्याचप्रमाणे शेठजींचे शोषक प्रतापही अधोरेखित केले. ही मांडणी ते धर्मभोळ्या शेतकरी, शेतमजूर समूहातील बहुजनांना जागे करण्यासाठी करत होते. या कष्टकरी वर्गाला ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. एकूणच बहुजन समाजाला धर्म भोळेपणातून बाहेर आणण्यासाठी व त्यांना बुद्धिवादी दिशेने घेऊन जाण्यासाठी मुकुंदराव पाटलांनी केलेला खूप मोठा वैचारिक खटाटोप किती महत्त्वाचा होता, हे या ग्रंथातून प्रत्ययाला येते.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटना घडामोडी आणि त्या काळातला वैचारिक संघर्ष समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून देखील हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘कुलकर्णी लीलामृता’तील मांडणी ‘केसरी’कारांच्या मनाला प्रचंड झोंबली आणि मुकुंदराव पाटलांच्या या मांडणीवर त्यांनी खूप मोठी टीका केली. त्या टीकेचा मुकुंदराव पाटलांनी घेतलेला खरपूस समाचार मुळातून वाचण्यासारखा आहे. मुकुंदराव पाटील यांच्या वैचारिक लेखनातील भाषेमध्ये अनेकविध प्रतिमाप्रतिकांचा, म्हणी व वाक्प्रचारांचा वापर केलेला दिसतो. अशा प्रकारच्या भाषेतून ते प्रतिपक्षावर खूप तुटून पडताना दिसतात. समाजातील दांभिकतेवर फटके मारणाऱ्या व तिचा उपहास करणाऱ्या मुकुंदराव पाटलांच्या लेखनाबद्दल डॉ.जी.ए. उगले लिहितात’ दीनमित्र पत्राच्या अठ्ठावन्न वर्षांच्या कालखंडात या फटक्यांनी त्रेपन्न वर्षे दीनमित्र पत्रावर अधिराज्य केले. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीच्या उणिवांवर या फटक्यांनी आसूड फटकारला. अशा या फटक्यांच्या आतषबाजीची संख्या पाच हजारांच्या वर असावी. सनातनी उत्तर पेशवाई राज्यकारभारावर मारलेल्या हजारो फटक्यातून तत्कालीन ब्राह्मणी राज्यव्यवस्थेचे आणि ब्राह्मणी मनोवृत्तीचे दर्शन होत राहते. उत्तर पेशवाईतील रंगेल समाजजीवनाचे दर्शन एका फटक्यातून होत राहते. उत्तर पेशवाईवरील हा फटका २६ डिसेंबर १९१७ रोजी मारला गेला आहे. ‘फटक्यां’चा शहेनशाह असलेला हा फटका येणेप्रमाणे :”आमची पेशवाईच बरी, कारण तिच्या (शेवटच्या बाजीरावाच्या) कारकीर्दीत आताच्या ब्रिटिश राज्याप्रमाणे नोकरीसाठी एम. ए., बी. ए. सारख्या अवघड परीक्षा द्याव्या लागत नव्हत्या. फक्त खालील वीस कलमांच्या परीक्षा पास होताच बडी नोकरी मिळत असे.१. पागोटे – कंगणीदार, झोकदार.२. शेंडी – संजाबदार.३. मिशा – कल्लेदार, पिळदार.४. ओठ – पोवळेदार.५. भिवया – कमानदार.६. काया – लिंबदार.७. अंगरखा – तंगदार, कंठीदार, पेलेदार, घोळदार.८. निऱ्या – कठोरदार.९. कासोटा – तंगदार.१०. जोडा – अणीदार.११. बोलणे – खुबीदार.१२. हसणे – मोहकदार.१३. बसणे – ऐटदार.१४. चालणे – टुमदार.१५. खाणे – मजेदार.१६. गंध – मोहरेदार.१७. अक्षर – वळणदार.१८. बायको – छानदार.१९. धोतर – पट्टीदार.२०. डोळे – पाणीदार.हा! हा! रे पेशव्यांचे स्वराज्य ! आणि आता जो पुढारी वर्ग स्वराज्याची ओरड करीत आहे तो ब्रिटिश अमलातील ही उणीव भरून काढण्याकरिता तर नव्हे ना! म्हणा, मला काय समजते !”१७ (पृष्ठ क्र.१२५,१२६)या मांडणीमधून मुकुंदराव पाटलांच्या लेखणीतील तीव्र अशा उपाहारगर्भतेचा प्रत्यय येतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मानव मुक्तीच्या आंदोलनाला ‘दीनमित्र’ मधून मुकुंदराव पाटलांनी भक्कम असा पाठिंबा दिलेला दिसतो. त्यांच्या धर्मांतराच्या कृतीचे समर्थन केलेले दिसते. या संदर्भातली संगोपन चर्चाही सदर ग्रंथात केलेली आहे.

डॉ.जी.ए. उगले सदर ग्रंथात मुकुंदराव पाटलांच्या लेखनाचा केवळ परिचय करून देत नाहीत तर त्यांच्या लेखनाची चिकित्साही करतात. त्यातील काही मर्यादांची नोंद देखील करतात हे महत्त्वाचे आहे. मुकुंदराव पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध कसे चांगले होते. मुकुंदराव पाटलांनी बाबासाहेबांच्या भूमिकांचे कसे समर्थन केले, याच्या सोदाहरण नोंदी ते करतात. परंतु बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर त्यांच्या कार्याची विशेष अग्रलेख लिहून पुरेशी नोंद मुकुंदराव पाटलांनी न घेतल्याबद्दलची खंत ते पुढील प्रमाणे व्यक्त करतात.’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव समकालीन होते. दोघांच्या वयात अवघ्या सहा वर्षांचे अंतर होते. दोघेही बुद्धिमान होते. दोघेही समविचारी होते, पत्रकार होते. दोघांना एक दुसऱ्याप्रती आदर-प्रेमभाव होता. इ. स. १९२७ मध्ये अनाहूतपणे कोर्ट खटल्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे बाबासाहेब, आणि तितक्याच आदरभावाने परममित्र म्हणणारे, धर्मांतरावर सातत्याने अग्रलेख लिहिणारे मुकुंदराव बाबासाहेबांच्या महानिवार्णानंतर मात्र केवळ एका कॉलमात श्रद्धांजलीपर वृत्त देऊन मोकळे होतात. या प्रसंगी विश्वपातळीवरील या असाधारण नेत्याचा कार्यवृत्तांत एखाद्या अग्रलेखात रेखाटायला हवा होता, असे वाटते. (पृष्ठ क्र.२६८) महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, कृष्णराव भालेकर यांच्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा मुकुंदराव पाटलांनी कशी प्रभावीपणे वाहिली हे समजून घेण्यासाठी ‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील : जीवनकार्य आणि लेखन समीक्षा’ हा जी.ए. उगले यांचा ग्रंथ भोळ्या भाबड्या समाज मनाला बुद्धीवादी दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा आहे. सर्वसामान्य माणसांच्या कर्मकांडी धर्म भावना चेतवून मतपेटीचे राजकारण केले जात असतानाच्या वर्तमान कालखंडात तर हा ग्रंथ फार मोलाचा ठरतो. सदर ग्रंथ सर्वांनी आवर्जून वाचला पाहिजे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!