
काल मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या उपान्त्य सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. भारतानं एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित षटकात चार बाद ३९७ धावा केल्या. कोहलीनं सर्वाधिक ११७ तर श्रेयस अय्यर यानं १०५ धावा केल्या. शुभमन गिल ८० तर के एल राहुल ३९ धावांवर नाबाद राहिले. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनी वेगवान सुरुवात केली. चार षटकार आणि चार चौकारांच्या जोरावर ४७ धावा करून रोहित बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं ३९७ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात उपांत्य फेरीतली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे.
प्रत्युत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ मोहम्मद शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे ४९व्या षटकात ३२७ धावांवर सर्वबाद झाला. शमीनं सात तर कुलदीप यादव आणि जसप्रित बुमराहनं प्रत्येकी एक गडी बाद केला. क्रिकेट विश्वचषकाच्या कारकिर्दीत सर्वात जलद ५० बळी घेणारा शमी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, या स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज कोलकातातल्या ईडन गार्डन मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर अंतिम सामना येत्या रविवारी अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत