महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय

शहीद भागवत जाधव व शिवसेनेचे कर्मफळ !

1966 साली मुंबईत शिवसेना जन्माला घातली ती काँग्रेस पक्षाने ! मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांचा छत्तीसचा आकडा ! मुंबई काँग्रेस म्हणजे बनिया – ब्राह्मण जोडगोळीची 1885 ची जुनी काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस म्हणजे सत्यशोधक चळवळ काँग्रेस पक्षात विसर्जित झाल्यानंतर 1930 सालानंतरच्या मराठा जातीची काँग्रेस ! आजही हा वाद कायम आहे. तर या ‘ब्राह्मण बनिया मुंबई विरुद्ध मराठा महाराष्ट्र’ अशा वादातून शिवसेना जन्माला घातली गेली. तिला वरकरणी मराठी रुपडे दिले व आतून कारखानदार मालकांशी दोस्ती करून मुंबईतील कामगार चळवळीला खिंडार पाडायला सांगितले. शिवसेनेने कृष्णा देसाई या मराठी भाषिक कामगार नेत्याचा खून केला व आपली लायकी सिद्ध केली. त्यातून दिल्लीची ब्राह्मणी लॅाबी खूष झाली. मग कारखाना मालक धार्जिणी भूमिका घेऊन संप फोडण्याच्या सुपाऱ्या घेण्याचा धंदा शिवसेनेने चालू केला. कालपरवा नवी मुंबई येथे महेश जाधव या कार्यकर्त्याने असेच चालणारे ‘मनसे’ राजकारण उघड केले. अगदी याच प्रकारे शिवसेना त्याकाळी वागत असे. म्हणून उच्चस्तरीय धाग्यादोऱ्यांनी बांधलेला प्रस्थापित धार्जिणेपणा हा शिवसेनेचा जन्मजात पिंड ! ग्रामीण भागात अन्याय- अत्याचाराची परिसीमा झाल्यामुळे व त्यांविरोधी काही करण्यास असमर्थ ठरलेल्या काँग्रेस धार्जिण्या रिपब्लिकन नेत्यांमुळे 1972 साली दलित पॅंथर शहरात जन्माला आली. पॅंथरचा जन्मजात पिंड हा आंबेडकरवादी व म्हणून सर्व प्रकारच्या प्रस्थापित विरोधी ! अशा तऱ्हेने मूळच्या दलित पॅंथर चळवळीचा पाया हा काँग्रेस विरोधी होता. पुढे पॅंथर्सचा झंझावात वाढला. या तरूण आंबेडकरवादी चळवळीकडे डावे- उजवे – मधले अशा सर्वांचे लक्ष होते. दलित पॅंथर्स म्हणजे डाव्या क्रांतीला उपयुक्त असा कच्चा माल , अशी डाव्यांची धारणा होती. त्यामुळे पॅंथर्सना हाताळायला त्यांची एक फळी कार्यरत होती. कम्युनिष्ट सुनिल दिघे व समाजवादी यदुनाथ थत्ते हे त्यांतील प्रमुख मोहरे ! पैकी सुनिल दिघे वेळप्रसंगी रस्त्यावर उतरत असे व यदुनाथ थत्ते यांनी तर राजा ढाले यांचा स्वातंत्र्य दिनावरील लेख ‘साधना’ या समाजवादी नियतकालिकांत छापून आणला होता. पॅंथर्सना अंगावर घेण्याची हिंमत उजव्यांत नव्हती. काँग्रेस व काँग्रेस धार्जिणे रिपब्लिकन नेते हे देखील पॅंथर्सच्या लोकप्रियतेमुळे बेचैन झाले होते. अशा वातावरणात 1974 साली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. ही पोटनिवडणूक आर डी भंडारे या रिपब्लिकन नेत्याच्या राजीनाम्यामुळे घ्यावी लागली. या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे रामराव आदिक उभे होते. मुळात या जागेवरून आर डी भंडारे निवडून आले होते. त्यामुळे ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही. ब्राह्मण्यवाद हा छोट्या छोट्या पाऊलांनी देखील अवकाश व्यापण्याचा प्रयत्न करतो , हे यांवरुन दिसून येते. आणखी एक अर्थ असा कि , ग्रामीण महाराष्ट्राचे रामराव आदिक मुंबईतून उभे राहणे म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई काँग्रेस कमिटीवर मात केली होती ! कम्युनिष्टांनी या निवडणुकीत रोझा देशपांडे यांना उभे केले होते. रोझा देशपांडे म्हणजे श्रीपाद अमृत डांगे या ब्राह्मण जातीय कम्युनिष्ट नेत्याच्या कन्या ! परिवारवाद डावीकडे पण आहे बरे का ! या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने अर्थातच काँग्रेसच्या रामराव आदिक यांना पाठींबा दिला होता. शिवसेना देखील कम्युनिष्ट विरोध म्हणून रामराव आदिक यांना पाठींबा देऊन मोकळी झाली होती. परंतु पॅंथर्स काय करणार ? रामराव आदिक यांना पाठींबा द्यायचा नाही , हे नक्की होते. परंतु रोझा देशपांडे यांना थेट पाठींबा देणे म्हणजे आंबेडकरवादी मते कम्युनिष्टांच्या दावणीला बांधणे ! हे देखील तत्वात बसत नव्हते. मग ‘निवडणुकीवर बहिष्कार’ असा मध्यम मार्ग पॅंथर्सच्या गळी उतरविण्यात आला. हा मार्ग कम्युनिष्टांच्या फायद्याचा होता. आंबेडकरी समाजाची जी मते एरवी काँग्रेस पक्षाला गेली असती ती बहिष्कारामुळे अलिप्त राहिली तर कम्युनिष्ट रोझा देशपांडे यांची ताकद वाढते ! थोडक्यात , निवडणुकीच्या आखाड्यात कम्युनिष्ट विरुद्ध काँग्रेस व रिपब्लिकन असा सामना रंगला होता. आंबेडकरी समाजाच्या मतांची लूटमार कोणी करायची ? यांबाबत ही रस्सीखेच चालली होती. त्याकाळी स्वतंत्र आंबेडकरवादी राजकारण ना कम्युनिष्टांना मंजूर होते ना समाजवाद्यांना ना काँग्रेसला ! आजही परिस्थितीत काही फरक पडलेला नाही ! वरळीच्या त्या सुप्रसिद्ध सभेत पॅंथर्सनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली व शिवसेनेने दंगल चालू केली. पुढे रोझा देशपांडे निवडून आल्या व झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पुढे करून दंगल वाढवली. त्याकाळात गृह राज्यमंत्री होते शरद पवार ! शिवसेनेच्या गुंडपुंडांना पोलिस गणवेश देऊन आंबेडकरी समूहावर हल्ले करण्यात येत होते व सरकार निष्क्रिय होते. याचा जाब विचारण्यासाठी 10 जानेवारी 1974 रोजी दलित पॅंथर्सनी वरळीत मोर्चा काढला होता. या मोर्चावर देखील वरळी बीडीडी चाळीच्या गच्चीवरून दगडफेक करण्यात आली. परळ येथील लक्ष्मी बिल्डींगमधून करण्यात आलेल्या दगडफेकीत भागवत जाधव हा तरूण शहीद झाला. मग मात्र पॅंथर्सनी ‘जशास तसे’ या न्यायाने प्रतिकार व मुंबईत ठिकठिकाणी प्रतिहल्ला केला आणि शिवसेनेला पळता भुई थोडी झाली. ही दंगल होण्यापूर्वी मुंबईत शिवसेनेची दहशत पसरली होती. दलित पॅंथर्सने ही दहशत यशस्वीरित्या मोडीत काढली. त्यानंतर शिवसेना कधीही थेटपणे पॅंथर्सच्या नादी लागली नाही. अशा तऱ्हेने वरळीची पॅंथर्स विरुद्ध शिवसेना ही दंगल म्हणजे कम्युनिष्ट विरुद्ध काँग्रेस यांच्या राजकीय संघर्षाची परिणती होती ! तत्कालिन दलित पॅंथर्सच्या नेतृत्वाला यांचे भान होते का ? पुढे नामांतराच्या निमित्ताने मराठवाड्यात दंगली झाल्या. तेव्हा देखील शरद पवार विरुद्ध वसंतदादा पाटील यांच्या राजकीय संघर्षात मराठवाड्यातील आंबेडकरी जनतेला दंगलीच्या खाईत लोटण्यात आले. यावेळी मराठवाड्यात शिवसेना नव्हती. परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा द्वेष शिवसेनेने लपवून ठेवला नव्हता. पुढे 1986 साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा तत्कालिन मुंबई काँग्रेस पक्षाध्यक्ष मुरली देवरांशी वाद झाला. हा ‘मुंबई काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र काँग्रेस’ असाच वाद होता. या वादातून राजकीय खेळी करून त्यांनी ‘मुंबई केंद्रशासित करणार कि काय ही माहिती आपल्याकडे नाही’ अशा आशयाचे उत्तर विधानमंडळात देऊन शिवसेनेला संजीवनी दिली. मग शिवसेना प्रथम मुंबई महानगरपालिकेत प्रबळ झाली व नंतर ग्रामीण महाराष्ट्रात पसरू लागली. आजही मुंबई महानगरपालिका काँग्रेसकडे जाऊ नयें , यांबाबत शिवसेना व शरद पवार यांचे छुपे ऐक्य आहे. म्हणून मुंबईतील ब्राह्मण- बनिया लॅाबी भाजपाकडे सरकली आहे. यथावकाश पुलोदचे शरद पवार राजीव गांधींच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवासी झाले व 1989 साली त्यांचे चेले असलेल्या ‘समाजवादी’ माधव गडकरी यांनी “रिडल्स” प्रकरण उकरून काढले. शरद पवार यांच्या आयुष्यात असे योगायोग फार येतात. पुन्हा एकदा आंबेडकरी जनता विरुद्ध शंकरराव चव्हाण यांचे काँग्रेस सरकार असा सामना रंगला. शिवसेना देखील रामभक्त म्हणून मैदानात उतरली. परंतु एकत्रित आंबेडकरी शक्तीपुढे काँग्रेस व शिवसेना या दोघांनाही माघार घ्यावी लागली. इतिहासाच्या या बिंदूवर शिवसेनेला भाजपा भेटली. इथून पुढे मराठा लॅाबीच्या अंतर्गत साठमारीत वाटमारी करण्याऐवजी स्वतंत्र वाटचाल करण्याची प्रेरणा शिवसेनेला रास्व संघाकडून मिळाली व मराठा राजकारणाच्या खच्चीकरणाचा अध्याय चालू झाला. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकांत हा फरक आहे. राज ठाकरे यांना मराठा लॅाबीच्या अंतर्गत साठमारीच्या बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे मात्र महत्त्वाकांक्षी निघाले. त्यांना शिवसेनेला स्वतंत्र स्थान मिळवून द्यायचे होते. पुढे 1992 साली बाबरी मशीद पाडण्याच्या वादात दंगल झाली. यांत शिवसेनेचा सक्रिय सहभाग होता. नंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले, त्यांच्याच काळात बाँम्बस्फोट झाले व धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा घेऊन 1995 साली सेना- भाजप युतीचे सरकार आले. पुढे दोनच वर्षांत 1997 साली घाटकोपर येथील कु्प्रसिद्ध रमाई आंबेडकर नगर हत्याकांड घडले. त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते कम्युनिष्ट पक्षाचे इंद्रजित गुप्ता ! ते थेट मातोश्रीवर जाऊन बसले ! मग सत्ताधारी शिवसेना टॅंकर थिअरीची बनावट कथा छापून आपल्या महापातकांवर पांघरूण घालू लागली. परंतु आंबेडकरी जनतेचा संताप काय असतो , याची जाणीव सत्तास्थानी बसल्यावर शिवसेनेला जास्त चांगली झाली. या संतापाने सेना- भाजपा सत्ता गेली व काँग्रेस – राष्ट्रवादी यांचे आघाडी सरकार आले. अर्थात , सत्ता मिळाल्यानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीने आंबेडकरी जनतेच्या तोंडाला पुन्हा एकदा पाने पुसली. एवढेच नव्हे तर याच राजवटीत माणुसकीला काळिमा फासणारे खैरलांजी हत्याकांड घडले. तेव्हा शरद पवार यांचे लाडके आबा उर्फ आर आर पाटील हे गृहमंत्री होते ! इतिहासाचा हा धावता आढावा घेण्याचे कारण असे कि , आज ज्या भाजपाने शिवसेना व शरद पवार या दोघांनीही जेरीस आणले आहे त्याच भाजपाच्या ब्राह्मण्यवादी विचारसरणीची पाठराखण करण्यासाठी शिवसेना व शरद पवार या दोघांनीही आपले उभे आयुष्य झिजवले आहे. शिवाजी राजे , महात्मा फुले , शाहू राजे , डॉ आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे सार्वजनिक जीवन कधीही ब्राह्मण्यवादाकडे झुकले नव्हते. ते नेहमी मध्यम मार्गी व किंचित डावीकडे झुकलेले असे. शरद पवार व शिवसेना या दोघांनीही संयुक्तपणे जाणीवपूर्वक पुरोगामी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाला उजवे वळण दिले आहे. उद्याच्या इतिहासांत त्याची यथोचित नोंद होईल. एवढे करूनही आज याच उजव्या वळणाने त्यांचा राजकीय बळी देण्याची पूर्वतयारी केली आहे. हा इतिहास आजच्या पिढीला कळायला हवा. यानंतर 2014 साली पुन्हा भाजप- सेना युतीचे सरकार आले. परंतु आता परिस्थिती बदलली होती. 1995 साली धाकटा भाऊ असणारा भाजपा आता मोठा भाऊ झाला होता. 1989 पासून रास्व संघाने शिवसेना पोखरून काढायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात 1989 साली नगण्य असणारी भाजपा 2014 साली मोठी ताकद म्हणून उभारली होती. भाजपाचे हे मोठेपण स्वीकारणे शिवसेनेला जड गेले. भाजपाच्या अंतर्गत गोटातील बातमी अशी आहे कि , 2023 साली शिवसेनेत पाडलेली फूट 2014 सालीच पडणार होती. सर्व तयारी झाली होती. परंतु नव्यानेच दिल्लीत आलेल्या मोदी सरकारला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता नको होती. म्हणून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताना भाजपाला अगदी मनाविरुद्ध शिवसेनेची मनधरणी करावी लागली. याचा वचपा शिवसेनेच्या मंत्र्यांवर रास्व संघाचा कडक ‘वॅाच डॅाग’ ठेवून व स्थानिक पातळीवर शिवसेना अधिक पोखरून काढण्यात आला. 2019 साली पुन्हा एकदा मोठा भाऊ भाजपा व धाकटा भाऊ शिवसेना यांच्यात सत्तानाट्य रंगले. यांवेळी आपल्या स्थानाचा अचूक उपयोग करून उद्धव ठाकरे यांनी ‘युती धर्म’ सोडला आणि शिवसेनेची जन्मदाती काँग्रेस व ऐतिहासिक विश्वासू सहकारी शरद पवार यांच्या सहाय्याने सत्ता मिळवली. याचा सूड 2023 साली शिवसेना व राष्ट्रवादी फोडून भाजपाने पुरेपूर घेतला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांच्या नाजूक फायली नागपूर मार्गे ईडी कार्यालयात गेल्या आहेत. प्रशासनातील रास्व संघाने आपली कामगिरी चोख बजावली आहे. मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेच्या गैरकारभाराचा लेखाजोखा देखील नागपूर मार्गे ईडी कार्यालयात दाखल झाला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत तो वापरला जाईल. 52% ओबीसींच्या ‘मंडल अहवालाला बंडल अहवाल म्हणणारे’ , ‘मला लोकशाही आवडत नाही , ठोकशाही आवडते’ अशी सवंग विधाने करून हुकूमशाहीचा पुरस्कार करणारे , ब्राह्मण्यवादाने छू म्हटल्याबरोबर आंबेडकरी जनता व मुसलमान यांच्याविरुद्ध गरळ ओकणारे, नथुरामाचे उदात्तीकरण करण्यात भाजपापेक्षा दोन पाऊले पुढे असणारे शिवसेना नेतृत्व आता अडचणीत सापडले आहे. आश्चर्य म्हणजे या नेतृत्वाला आता न्याय- अन्याय यांतील फरक समजू लागला आहे. लोकशाही व्यवस्था व या व्यवस्थेतील निवडणूक आयोग व न्यायपालिका यांचे महत्त्व देखील कळू लागले आहे. परंतु जेव्हा कारखाना मालकांची बाजू घेऊन गुंडगिरीच्या जोरावर कामगारांचे न्याय्य प्रश्नावरील संप फोडले जात होते तेव्हा शिवसेनेला न्याय- अन्याय समजत नव्हता काय ? नामांतर आंदोलनाच्या वेळेस मराठी भाषिक डॉ आंबेडकर यांची बदनामी करताना शिवसेनेचे मराठी प्रेम कुठे गेले होते ? निरापराध मुसलमान जनतेविरुद्ध दंगली करताना शिवसेनेला लोकशाही का आठवली नाही ? रमाई आंबेडकर नगरातील निःशस्त्र आंबेडकरी जनतेवर गोळीबार केल्यावर त्या असहाय्य जनतेच्या आक्रोशाने स्वतःला शिवरायांचे चेले म्हणविणाऱ्यांच्या काळजाला पाझर का फुटला नाही ? खैरलांजी हत्याकांडात बळी पडलेल्या अजाण जीवांसाठी सहानुभूतीचा एक शब्दही शिवसेना नेतृत्त्वाला का उच्चारता आला नाही ? भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी पाकिस्तानात आहे कि महाराष्ट्रात ? 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईतील वरळी येथे दंगल करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडगिरीविरुद्ध दलित पॅंथर्सने लोकशाही मार्गाने मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर शिवसेनेने दगडफेक केली. परळ येथील लक्ष्मी बिल्डींगमधून झालेल्या दगडफेकीत भागवत जाधव हा तरूण प्राणंतिक जखमी होऊन शहीद झाला. त्यानंतर बरोबर अर्धशतकानंतर 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना फाटाफुटीवर निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी असल्याचा न्यायनिवाडा दिला ! मुद्दा असा कि , दलित पॅंथर्स व शहीद भागवत जाधव यांनी ज्या बौद्धवादाची बांधिलकी स्वीकारली आहे तो बौद्धवाद ना दैववाद मानतो ना नियतीचा खेळ , परंतु हा बौद्धवाद कर्मसिद्धांत मानतो. कर्मसिद्धांत म्हणजे केलेल्या कर्माचे —- मग ते वाईट असो कि चांगले—- फळ भेटतेच भेटते ! विधानसभा अध्यक्षांच्या न्यायनिवाड्याने उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे , अशी खूप जणांची भावना आहे. या भावनेशी सहमती दर्शविण्यास कोणाची हरकत नसावी. परंतु शहीद भागवत या शहीदाच्या बलिदानास 50 वर्षे होण्याच्याच दिवशी 10 जानेवारी 2024 रोजी हा न्याय पदरात पडल्यामुळे शिवसेनेच्या अन्यायी भूतकाळाच्या कर्मफळाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे का ? असा प्रश्न पडतो ! खरा कळीचा मुद्दा असा आहे कि , इथून पुढे शिवसेना आपला प्रवास कसा करणार आहे — लोकशाही मूल्यांसाठी कि ब्राह्मण्यवादी मूल्यांसाठी ? हा प्रवास लोकशाही मूल्यांसाठी झाला तर भागवत जाधव यांच्या बलिदान दिनी शिवसेनेला उपरती झाली , असे म्हणता येईल. परंतु हा प्रवास ब्राह्मण्यवादाच्या दिशेने गेला तर मात्र शिवसेनेला आपल्या भूतकाळातील कर्माचे फळ अपेक्षेहून लवकर भेटेल ! —— +++ ——

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!