महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

अपूर्व त्याग मूर्ती “माता रमाई आंबेडकर” ……

अपूर्व त्याग मूर्ती “माता रमाई आंबेडकर” ……

साभार : पोलीस नायक न्यूज

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कारकिर्द घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची आज (दि.७ फ्रेब्रुवारी २४) १२६ वी जयंती यानिमित्त…
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईचा सिंहाचा वाटा आहे.रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली.रमाईने आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते हे नाकारता येत नाही.मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार ४ एप्रिल १९०६ रोजी रमाईचे भिवासोबत लग्न झाले.रमाईच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील.एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात रमाईला नेसायला लुगडे नव्हते.तेव्हा रमाईने बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला.गरिबीची केवढी मोठी शोकांतिका!पण रमाईच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे.रमाबाई संसारात रमल्या परंतु भीमराव पुस्तकांत.बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचनात दंग असत.एकदा जेवणाची वेळ झाली असता रमाबाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले.साहेबांचे जेवण आटोपले असेल म्हणून ताट उचलण्यासाठी त्या खोलीत जरा वेळानेच गेल्या तर ताट तसेच उघडे.न राहून रमाबाईंनी त्यातल्या एका पुस्तकाचे पान उघडले आणि म्हणाल्या या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे,कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तेवढेच मला वाचून दाखवा.बाबासाहेब म्हणतात,’अगं वेडे,नवऱ्यानं संसार कसा करायचा हे काही पुस्तकात लिहिलेल नसतं.’बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा,दु:ख,गरिबी यावर मात केली.बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही.आपल्या संसारात आदर्श पत्नी,सून,माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्यात.कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही.अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही.घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही.एका मातेसाठी तिचा मुलगा मरण पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही.रमाईची तर एकापाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून मरण पावले.म्हणूनच रमाईच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात,’रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय,जीवनाचा तो एक संपूर्ण दु:खाशय होता.’

बाबासाहेब व रमाबाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते.बाबासाहेबांनी धारवडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी रमाईला पाठविले.वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते.त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असत.दोन-चार दिवसांत रमाईला त्या लहान मुलांचा लळा लागला.दोन दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत म्हणून रमाईने काकांना विचारले.काका म्हणाले की मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत.वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही.हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून आला तत्क्षणी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या,या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा.यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही.सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली.अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता रमाईत होती.कष्ट,त्याग,संघर्ष,मातृत्व,प्रेम हे सर्व गुण रमाईत असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते.रमाईच्या त्यागाविषयी बाबासाहेब ‘बहिष्कृत भारत’मध्ये लिहितात,’आपण परदेशी असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे.मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत शेणाचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहण्यातही जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू,सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही मला घालविता येत नाही.’ बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मन हेलावून टाकते.

१९४० मध्ये लिहिलेला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ बाबासाहेबांनी रमाईला अर्पण केला आहे.अर्पणपत्रिकेत ते लिहितात,’हृदयाचा चांगुलपणा,मनाचा मोठेपणा,चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्या काळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शाविली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे.’बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले.माता रमाई व तिच्या अपूर्व त्यागाला त्रिवार अभिवादन.

संग्राहक : मिलिंद आशा तानाजी धावारे, लातूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!