दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

चैत्र पौर्णिमा 🌕 सुजाताचे तथागत भगवान बुद्धांना खीरदान


चैत्र पौर्णिमा ही बौद्ध समूहाचा सण व मंगलदिन आहे. मराठी महिन्यांप्रमाणे ही वर्षारंभीची पहिली पौर्णिमा होय. या पौर्णिमेला बौद्ध धम्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या झगड्यावरुन शाक्य आणि कोलीय यांच्यात सारखे भांडण होऊ लागले. शाक्य संघाने कोलीयांबरोबर युद्ध करण्याचे ठरविले. संघाच्या निर्णयाविरुद्ध सिद्धार्थ गेला. एकमताने युद्ध करण्याचे ठरले होते. परंतु सिद्धार्थ गौतमाने युद्धाला विरोध केला. मात्र त्याच्या मताला कोणीही सहमत झाले नाही. आणि संघाने शिक्षा केल्यावरुन वयाच्या २९ व्या वर्षी आषाढी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने आपल्या सर्व ऐश्वर्याचा, परिवाराचा त्याग करून प्रवज्जा घेतली. वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमात ज्ञान संपादन करीत असता सहा वर्षे लोटून गेली. मिळालेल्या ज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही. शेवटी उरवेला येथे खडतर तपस्या करायची ठरवून डोंगर दरीत, झाडीत उपास तापास करू लागले. चार-चार सहा-सहा दिवस अन्न खात नव्हते. शरीर अस्थीपंजर झाले होते. असे करीत असता डुंगेश्वरी नावाच्या पर्वताच्या एका गुहेत (कपारीत) बसून घोर तपाचरण करू लागले. शरीर क्षीण, अशक्त झाले होते. चालता येत नव्हते. एक दिवस उठून चालले असता चक्कर येऊन पडले व शुद्धीवर आल्यावर त्यांनी ठरविले की, आपण अन्न ग्रहण केले तरच शरीर टिकेल, नाहीतर मृत्यू आपल्याला गाठेल आणि म्हणून त्यांनी ठरविले की, अन्न ग्रहण करावे. जवळच नदीच्या काठी एक वटवृक्ष होता, त्याखाली ते बसले. या नैरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ बसलेले असतांना एक विशेष अशी घटना घडून आली. या भागात सेनानी नावाचे गांव होते. त्या नगरीत सेनानी नावाचा एक श्रीमंत होता. त्याला सुजाता नावाची एक मुलगी होती. तिचे लग्न झाले होते. परंतु बराच काळ लोटला तरी तिला पुत्र प्राप्ती झाली नव्हती.परिवारात निराशा होती. सुजाताचे सासू-सासरे आपल्या मुलाचे दुसरे लग्न करण्याच्या बेतात होते. त्यामुळे सुजाता दुःखी होती. एक दिवस सुजाता आपल्या महालात रडत असतांना तिची दासी ‘पुर्णा’ महालात येते तर आपली मालकीण रडते आहे ! ते पाहून ती विचारते, ‘बाईसाहेब! आपण रडत आहात, कारण काय? मग तेव्हा सुजाता म्हणाली, ‘मला पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून माझे सासू-सासरे माझ्या पतीचा दुसरा विवाह करणार आहेत. मग माझे काय होणार?’ तेव्हा पुर्णा म्हणते, ‘बाईसाहेब! नैरंजना नदीकाठी एक वटवृक्ष आहे. त्यावर एक वनदेवता वास करते, असे म्हणतात. आणि त्या वनदेवतेला आपण नवस करावा, मागणे मागावे, पाहू तरी.’ हे ऐकून सुजाताच्या मनात नवीन आशा उत्पन्न झाली. तिने तिथे जाऊन त्या वटवृक्षाला नवस केला की, मला जर पुत्र प्राप्ती झाली तर, मी गाईच्या दुधाची खीर दान करीन आणि पुत्र प्राप्तीची आशा मनी धरुन परतली. इथे वाचकाने महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजे की, नवसाने, उपासाने किंवा देवपूजेने पुत्र होत नाही. संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, नवसे पोरे होती तर का करणे लागे पती || हे ध्यानात ठेवावे. परंतु त्यावेळच्या प्रचलित रुढी प्रमाणे सुजाताने नवस केला. निसर्ग नियमाप्रमाणे तिला मुलगा झाला. तिच्या परिवारात फार आनंद झाला. तिने आपल्या परिवारासह सुवर्णपात्रात स्वादिष्ट खीर घेऊन जाण्याचे ठरविले होते. तिने आपली दासी पुर्णाला त्या वटवृक्षाखाली साफसफाई करण्यास पाठविले. पुर्णा नदीकाठी आली असता सिद्धार्थ गौतम डुंगेश्वरी पर्वत उतरुन त्या वडाच्या झाडाखाली येवून शरीर क्षीण झालेले थकलेले अशा अवस्थेत वडाच्या झाडाला टेकून बसलेले पाहिले. पुर्णाला वाटले आपल्या मालकिणीचा नैवेद्य स्विकारण्यास वनदेवता एक आजारी, अशक्त रुपात अवतरली आहे. ही आनंदाची बातमी तिने येऊन आपली मालकीण सुजातास सांगितली. ‘बाईसाहेब, आपला नैवेद्य स्विकारण्यास वृक्ष-वन देवता आज तिथे एका माणसाच्या रुपात अवतरली आहे. ही बातमी ऐकून सुजाताला फार आनंद झाला. आणि ती म्हणाली, हे खरे असेल तर मी आजपासून तुला दास्यत्वातून मुक्त करते आणि तुला मुलीसारखे सांभाळीन. सुजाताने तिला खूप बक्षीस दिले. बाळास बरोबर घेऊन ती आपल्या परिवारासह नैरंजना नदीकाठी आली, तर खरोखर वटवृक्षाखाली बोधीसत्व सिद्धार्थ हाडांचा सापळा झालेल्या अवस्थेत बसले होते. तिने बोधीसत्वास पाहिले आणि खरोखरच वनदेवताच आहे असे तिला मनोमन वाटले. तिने प्रथम वंदन केले. बरेच दिवस अन्न न घेतल्यामुळे बोधीसत्वाचे मन स्थिर नव्हते. आपण जर अन्न घेतलेच नाही तर मृत्यूचे संकट येईल. आपण जगण्यासाठी अन्नग्रहण केलेच पाहिजे असे मनी ठरविले होते. आणि त्याच दिवशी सुजाता आपला नवस पुरा करण्यासाठी आली होती. ती बोधीसत्वासमोर आपण आणलेल्या खीरीचे सुवर्ण पात्र घेऊन बसली आणि म्हणाली – ‘हे वनदेवते, माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. मला आपल्या कृपेने पुत्र प्राती झाली आहे. त्यामुळे माझे जीवन सार्थकी लागले आहे. ही सारी तुझी कृपा आहे. तेव्हा आपणांस मी बोलल्याप्रमाणे गाईच्या दुधाची खीर नैवेद्य म्हणू आणली आहे. आपण तिचा स्वीकार करावा.अशी विनंती करते.’ हे सुजाताचे शब्द ऐकून तथागत म्हणाले –

“माते, मी कोणी देव नाही. देवाचा दूत नाही. तुझ्यासारखाच मानवाचा राजा शुद्धोदन आणि महामाया यांचा पुत्र आहे. मी सत्याचा शोध घेण्यासाठी, दुःखाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी, वैरभावाचा शोध घेण्यासाठी हे तपाचरण करीत आहे. माते, खरोखरच मला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी शुभेच्छा व आशिर्वाद दे आणि तुझे खीरीचे भोजन सुखदायक ठरो अशी मला अपेक्षा आहे. तुझे कल्याण होवो. मंगल होवो, अशी अपेक्षा करतो.” सुजाताने हातातील खीरीचे पात्र बोधीसत्वाच्या हाती दिले आणि म्हणाली – ‘माझे मनोरथ जसे पूर्ण झाले, तसे आपलेही मनोरथ पूर्ण होवोत. आपण शोध घेत आहात त्या ज्ञानाची आपणांस प्राप्ती होवो.’ अशी शुभकामना व्यक्त केली. सिद्धार्थ गौतम सुजातास म्हणाले – “माते, मला सत्याचा शोध घेण्यामध्ये तुझी खीर लाभदायक ठरो.” असे शुभचिंतन करून त्या खीरीचा स्वीकार केला. नैरंजना नदीकाठी जाऊन स्नान केले आणि सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर बसून त्या खीरीचे सेवन केले. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. तेव्हाच मनात एक संकल्प केला की, मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाईल. असे बोलून खीरीचे पात्र नदीत फेकले. ते पात्र बोधीसत्व बोलल्याप्रमाणे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊ लागले आणि काही अंतरावर गेल्यावर ते पात्र पाण्यात बुडाले. सिद्धार्थ गौतमाला तो घडलेला प्रसंग पाहून खूप आनंद झाला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. या स्थळी आपणांस भगवान बुद्धांची मूर्ती बसविलेली आहे व सुजाता खीरीचे पात्र हातात घेऊन समोर बसलेली आहे अशी पहावयास मिळते. या गावाला सुजाताचे गांव किंवा ‘बकरोल’ असे म्हणतात. सुजाताची खीर सेवन केल्यावर सिद्धार्थ गौतम नदीतून गया प्रांतात जात असताना स्वाथिय नावाच्या शेतक-याने गवताची पेंढी दिली. त्या प्रसंगाचे पुतळे नदीकाठी आहेत. बोधीसत्व गयेत येतात आणि पिंपळाच्या झाडाखाली पूर्वेला मुख करून ध्यानसाधना करण्यास बसतात. तिथे एक संकल्प करतात की, माझे रक्त आटले, शरीर सुकले तरी मी ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय या आसनावरुन उठणार नाही. चार आठवड्यांनी, म्हणजे वैशाखी पौर्णिमेला त्यांना संबोधी प्राप्त झाली. असे या चैत्र पौर्णिमेचे महत्व आहे. या चैत्र पौर्णिमेला बौद्ध समूहात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बुद्ध विहारात उपासक-उपासिका यांनी जमून बुद्ध पूजापाठ करावा. खीरदान करावी.

                                                                          🌈🌷*चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय कामना !* 🌷🌈

🙏🌹नमो बुद्धाय-जय भीम🌹🙏

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!